क्रिकेटमधून कोट्याधीश बनलेल्या पाणीपुरीवाल्याची यशस्वी गोष्ट

०९ मे २०२३

वाचन वेळ : ५ मिनिटं


कधी काळी मुंबईतल्या आझाद मैदानाबाहेर पाणीपुरी विकावी लागलेल्या यशस्वी जयस्वाल नावाच्या गुणवंत खेळाडूने आपण लंबी रेस का घोडा असल्याचं सिद्ध केलंय. आज तो तब्बल अकरा कोटींचा मालक आहे आणि तेसुद्धा वयाच्या केवळ २१ व्या वर्षी. त्याचा झपाटा पाहिला तर नजीकच्या भविष्यात तो भारतीय टीमचा खेळाडू होईल यात शंकाच नाही.

जिद्दीला अफाट मेहनतीची जोड दिली तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही याचा अस्सल पुरावा म्हणजे युवा क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल. तो मूळचा मूळचा उत्तर प्रदेशचा. सुरिया हे त्याच्या गावाचं नाव. तिथल्या एका छोट्या दुकानदाराचा तो मुलगा.

क्रिकेटच्या वेडापायी त्याने वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी स्वप्ननगरी मुंबई गाठली. तिथं अफाट संघर्ष केला. अनेक अडथळे पार केले. आज तो यशाच्या अत्युच्य शिखरावर पोचलाय.

पाणीपुरी विकतानाही क्रिकेटचाच विचार

त्यावेळी मुंबईत यशस्वीला राहायला घरही नव्हतं. मग त्याने मुंबईतल्या आझाद मैदानालाच आपलं घर बनवलं. खरं तर मोकळं आकाश हेच त्याच्या घराचं छत होतं. असं असलं तरी क्रिकेटची उर्मी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. कारण त्याने पाहिलेलं स्वप्न नेहमीच्या चाकोरीतलं नव्हतं. त्यासाठी अपार कष्ट घ्यावे लागणार होते. त्याला त्याची कधीच ना नव्हती.

मध्यंतरी हळूहळू ओळखी वाढवून तो आझाद मैदानावर मुस्लिम युनायटेडच्या तंबूत झोपू लागला. त्या काळात त्याने पोटापाण्यासाठी आझाद मैदानाबाहेर पाणीपुरीही विकली. दिवसभर क्रिकेट खेळायचं आणि त्यानंतर पाणीपुरी विकायची, हा त्याचा दिनक्रम होता. बर्‍याचदा मैदानात सामना पाहणारी माणसं त्याला ओळखायची आणि हे काय करतो, असंही विचारायची.

त्यावेळी पोटासाठी करावं लागतं साहेब. असं तो न लाजता सांगायचा. क्रिकेट खेळायला मिळावं हा त्याचा एकमेव ध्यास होता. त्यासाठी त्याने कुठलेच काम कमी दर्जाचं मानलं नाही. पाणीपुरी विकतानाचे त्याचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले होते. पण, पाणीपुरीपेक्षाही त्याला क्रिकेटचं मैदान गाजवण्याच्या इर्ष्येने पछाडलं होतं.

हेही वाचा: भारताकडे वेगवान गोलंदाज येण्याचं कारण काय?

शालेय क्रिकेट ते वर्ल्डकप

संधी मिळेल तेव्हा मनमुराद क्रिकेट खेळताना त्याच्यातला क्रिकेटपटू जागा होऊ लागला. बॉलरच्या हातातल्या बॉलच्या चिंधड्या उडवायच्या हाच त्याचा खाक्या. त्यामुळे आक्रमक बॅटींगसाठी तो हळूहळू ओळखला जाऊ लागला. २०१५ साली त्याने गाईल्स ढाल स्पर्धेत शालेय पातळीवर ३१९ धावांची तुफानी खेळी केल्यानंतर तो सर्वात पहिल्यांदा प्रकाशात आला.

ही केवळ सुरवात होती. त्याच्या या अविरत संघर्षात त्याला प्रशिक्षक ज्वाला सिंह यांची मिळालेली साथ मोलाची आहे. त्यांनी या कच्च्या हिर्‍यावर पैलू पाडले आणि मग हा कोहिनूर मैदान गाजवू लागला. पाठोपाठ ज्वाला सिंह यांनी त्याला हक्काचा आसराही मिळवून दिला. सिंह यांचा पाठिंबा आणि मार्गदर्शनाच्या बळावर त्याने मुंबईतल्या आंतरशालेय क्रिकेटमधे पाऊल ठेवलं.

रिझवी हायस्कूलचं नाव वलयांकित करतानाच त्याने टीम इंडियाच्या अंडर १९ टीममधेही स्थान पटकावलं. त्यामुळे त्याच्यासाठी मुंबईच्या रणजी टीमचे दरवाजे सताड उघडं होणं ओघाने आलंच. अंडर १९ वर्ल्डकपमधे पाकिस्तानविरुद्ध उपांत्य लढतीत यशस्वीने ठोकलेलं घणाघाती शतक रसिकांच्या मनावर कोरलं गेलं. त्या संपूर्ण स्पर्धेत याने आपल्या दमदार बॅटींगचं प्रदर्शन करून जगभरातल्या क्रीडाप्रेमींचं लक्ष वेधलं. 

आयपीएलचा फायदा झाला

आता स्वप्नपूर्तीचा प्रत्येक टप्पा तो सर करत चालला होता. आयपीएल तर त्याच्यासाठी पर्वणीच ठरली. राजस्थान टीमने आपल्या ताफ्यात घेतलं. त्यासाठी तीन कोटींपेक्षा जास्त रक्कम मोजली. जिद्द, चिकाटी, मेहनत आणि संयम याच्या जोरावर त्याचा वारू चौफेर उधळत चाललाय.

इथं हेही सांगितलं पाहिजे की, पायजमा क्रिकेट म्हणून आयपीएलबद्दल कितीही नाक मुरडलं तरी गरीब घरातल्या अनेक गुणवंतांना या स्पर्धेने सर्वार्थाने समृद्ध केलंय. शिवाय याच स्पर्धेने भारतालासुद्धा कितीतरी नामवंत खेळाडू दिले आहेत.

यंदाच्या आयपीएलमधे त्याने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना मुंबई इंडियन्सविरुद्ध केलेली शतकी खेळी अविस्मरणीय ठरली. अवघ्या ६२ बॉलमधे त्याने १२४ धावांचा पाऊस पाडला. १६ खणखणीत फोर आणि ८ गगनचुंबी सिक्सरनी सजलेल्या या खेळीने रसिकांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं.

हेही वाचा: सगळं संपलंय, असं वाटेल तेव्हा शाहबाज नदीमची ही गोष्ट वाचा

शिस्त लागणं गरजेचं

तो सांगतो की, आव्हानांची काटेरी वाट पार करून या टप्प्यावर आल्यानंतर माझे डोळे केव्हा पाणावले हे मलाच कळलं नाही. वयाच्या अकराव्या वर्षी मी आझाद मैदानाजवळ राहत होतो. तिथून प्रकाशाची एक तिरीप यायची तेव्हा वाटायचं की, एक दिवस आपल्यालासुद्धा स्टेडियमच्या आत जायची संधी कधीतरी मिळेल. प्रेक्षकांच्या आरोळ्यांचा आवाज मला रोमांचित करायचा.

आता मी आणखी गंभीरपणे भविष्याचा विचार करतोय. स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत ठेवण्याला माझा नेहमीच अग्रक्रम असतो. प्रत्येक सामन्यातल्या दिनक्रमात मी शक्य तितकी शिस्त लावण्याचा प्रयत्न करतो. शतक ठोकताच अंगाखांद्यांवर मिरवणारे एखाद्याच अपयशानंतर आपल्या पारावरही जागा देत नाहीत हे मी मनावर पक्कं कोरून ठेवलंय.

मोठ्या खेळाडूंचे कौतुकाचे बोल

यशस्वीमधे सतत शिकत राहण्याची वृत्ती ठासून भरलीय. आयपीएलमधे तो खेळत असलेल्या राजस्थान रॉयल्स टीमसाठीच नाही, तर भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे लंबी रेस का घोडा आहे, अशा शब्दांत राजस्थान टीमचे क्रिकेट संचालक आणि श्रीलंकेचे माजी कर्णधार कुमार संगकारा यांनी त्याच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत.

पाठोपाठ भारताचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पाने तर यशस्वी हा नजीकच्या काळात भारतीय टीमचा सुपरस्टार खेळाडू असेल असं भाकित केलंय. मैदानात तो उतरतोच एखाद्या बादशहासारखा. आलेला बॉल फटकवायचा या हेतूने नाही, तर विचार करून तो फटके हाणतो. आतापर्यंत केलेली सर्व मेहनत त्याने यंदाच्या आयपीएलमधे प्रत्यक्षात उतरवलीय, असं उथप्पाचं मत आहे.

हेही वाचा: अपघाताने जन्माला आलेल्या वनडे क्रिकेटची आज पन्नाशी 

लंबी रेस का घोडा

या गुणवंत खेळाडूने आपण लंबी रेस का घोडा असल्याचं सिद्ध केलंय. आज तो तब्बल अकरा कोटींचा मालक आहे. मुख्य म्हणजे कोणाचीही नक्कल करायच्या फंदात यशस्वी कधीच पडला नाही. हेच त्याच्या यशाचं रहस्य असावं.

महेंद्रसिंग धोनीचा हेलिकॉप्टर शॉट आजही जागतिक क्रिकेटमधे विस्मयकारक मानला जातो. यशस्वीने तसा फटका मारण्याचा मोह टाळलाय. तरीसुद्धा आजच्या घडीला तो सिक्सर किंग म्हणून ओळखला जातो. बॉलरच्या हातून सुटलेल्या बॉलवर तो घारीसारखी नजर ठेवून असतो. त्यामुळे इतर बॅट्समनच्या तुलनेत त्याला बॉलचा अंदाज काकणभर आधीच येतो.

सध्या तो अवघ्या २१ वर्षांचा असला तरी त्याच्या बॅटींगमधे कुठेतरी वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांचा बेडरपणा दिसून येतो. चांगल्या बॉलचा सन्मान आणि खराब बॉलला थेट सीमारेषा दाखवणं हे आपल्या बॅटींगचं तंत्र त्याने वर्षानुवर्षे घोटवलंय. अगदी कमी वयात तो झपाट्याने परिपक्व होत चाललाय.

यातली कौतुकाची आणि आवर्जून दखल घ्यावी अशी गोष्ट म्हणजे यशाच्या पायर्‍या वेगाने सर करत चालला असला तरी त्याने आपले पाय घट्टपणे जमिनीवरच ठेवले आहेत. यशाने हुरळून जायचं नाही आणि टीकेमुळे व्यथित व्हायचं नाही अशा महत्त्वाच्या गोष्टी त्याने स्वतःच्या मेंदूवर कोरून ठेवल्या आहेत. त्याच्या अफलातून बॅटींगच्या सामर्थ्याची भुरळ रोहित शर्मासारख्या धडाकेबाज खेळाडूलाही पडली यातच सर्व काही आलं.

भारतीय टीमचं भविष्य

आज यशस्वी एक-एक शिखर सर करत चाललाय. त्याचा आवाका लक्षात घेतला तर नजीकच्या भविष्यात तो भारतीय टीमचा सदस्य होईल, यात शंका बाळगण्याचं कारण नाही. यशस्वीने २०२०मधे आयपीएलमधे पदार्पण केलं. मात्र, पदार्पणात त्याला फारशी चमक दाखविता आली नाही. तीन सामन्यांत ३४ धावा ही कामगिरी लक्षवेधी नव्हती.

मात्र, नंतरच्या प्रत्येक हंगामात त्याची बॅटींग बहरत गेली. आयपीएलमधे ३२ सामन्यांत १४५ च्या स्ट्राईक रेटने त्याने ९७५ धावा कुटल्या आहेत. यात सहा अर्धशतकं आणि एका शतकाचा समावेश आहे. ४० सिक्सर आणि ११८ फोर हे त्याचे दे दणादण फटके होत. रणजीमधे यशस्वी मुंबई टीमकडून खेळलाय. शिवाय तो टीम इंडियाच्या ब टीमचा सदस्य आहे.

प्रथम दर्जाच्या क्रिकेटमधे त्याने १५ सामन्यांमधल्या २६ डावांत तब्बल ८० च्या सरासरीने १८४५ धावा फटकावल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमधे ३२ डावांत त्याच्या नावापुढे १५११ धावा लागल्या आहेत. हे कमी म्हणून की काय लेगब्रेक बॉलिंग करून सात बळीही त्याने मटकावले आहेत. आज घडीला त्याच्या नावावर १४ शतके आणि ९ अर्धशतके लागली आहेत.

हेही वाचा: 

लेजंड धोनीचा अखेरचा 'षटकार'

मानसिक आरोग्य नीट राहिलं तरच खेळाडू यश मिळवतील

स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

अथर्व अंकोलेकरः शेवटच्या ओवरमधेही विकेट काढणारा जिद्दी बॉलर