संपन्न पंरपरा लाभलेल्या वेस्ट इंडिजच्या राजेशाही क्रिकेटला लागलेली घरघर चिंताजनक आहे. इंडिजचे खेळाडू उंचपुरे आणि बलवान असल्यामुळे त्यांना बास्केटबॉलसाठी प्रचंड मागणी आहे. युवाशक्तीला मैदानी खेळाचं आकर्षण जास्त आहे. सगळी प्रज्ञा इतर खेळांकडे वळत निघाल्याने इंडिजमधल्या क्रिकेटला वाली कोण, असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय.
संस्थान खालसा हे दोनच शब्द सध्याच्या वेस्ट इंडिज क्रिकेटचं वर्णन करण्यास पुरेसे ठरावेत. कोणीही यावं आणि टपली मारून जावं अशी या एकेकाळच्या दादा टीमची अवस्था बनलीय. नख्या काढलेला आणि आयाळ हरवलेला सिंह आयुष्याच्या उत्तरकाळात जसा उमेदीचा काळ आठवून उसासे टाकतो तसाच हाही प्रकार. अर्थात, सध्याच्या युवा खेळाडूंना त्याची कितपत कल्पना असेल हेही सांगणं कठीण.
कारण, त्यांचे प्राधान्यक्रम बदलले आहेत. याला काळाचा महिमा असंही म्हणता येईल. वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाचा ढिसाळ कारभार, मंडळाच्या तिजोरीत झालेला खडख़डाट आणि युवा खेळाडूंनी इतर खेळांत नशीब आजमावण्यासाठी सुरू केलेले तगडे प्रयत्न ही यामागची प्रमुख कारणं. गरिबी हेच गरिबीचं कारण असतं, असा एक सिद्धांत अर्थशास्त्रात मांडला जातो. इंडिज क्रिकेटचं नेमकं तसंच झालंय.
सध्याच्या तरुण रक्ताला अमेरिकेतलं बेसबॉल खुणावतंय. काहींवर आयपीएलने मोहिनी घातलीय आणि उरलेल्या बहुतांश तरुणांना उसेन बोल्टप्रमाणे अॅथलेटिक्समधे नाव कमावण्याची आस लागलीय. यातून उरलेल्या खेळाडूंमधून तिथल्या क्रिकेट मंडळाला टीम निवडावी लागतेय. आता तर वेस्ट इंडिजमधेही कॅरेबियन लीग सुरू झालीय.
त्यामुळे तिथल्या अस्सल क्रिकेटला घरघर लागलीय. ती थांबण्याचं नाव घ्यायला तयार नाही. याचा अर्थ इंडिज बेटांवर प्रतिभेची कमतरता आहे असं नाही. निसर्गतःच अफाट शारिरीक क्षमता असलेल्या खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातच आपलं करिअर करायचंय. क्रिकेटला त्यांनी सगळ्यात तळाला ठेवलंय.
म्हणजेच इतर कोणत्या खेळात नाव कमावता आलं नाही तरच क्रिकेटकडे वळायचं अशी त्यांची मनोधारणा झालीय. हे सारं स्थित्यंतर कसं होत गेलं याचं आकलन होण्यासाठी भूतकाळावर आधी नजर टाकावी लागेल. त्याशिवाय इंडिज क्रिकेटची महती कळणार नाही.
हेही वाचा: जगातल्या सगळ्यात मोठ्या दुर्गुणाविरुद्ध क्रिकेटनं एका हत्यारासारखं काम केलं
१९७५ ते १९९० हा काळ म्हणजे वेस्ट इंडिजच्या क्रिकेटमधील सोनेरी पानांची मालिका. त्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य त्यावेळी मावळत नव्हता. माल्कम मार्शल, अँडी रॉबर्ट्स, जोएल गार्नर, मायकेल होल्डिंग ही चौकडी तेव्हा आग ओकायची आणि जगभरातल्या नामांकित बॅट्समनची त्यांच्यापुढे त्रेधातिरपीट उडायची.
याच काळात भारतीय क्रिकेटमधे फिरकीचं युग धुमाकूळ घालत होतं. नाही म्हणायला लान्स गिब्जसारखा गुणवंत फिरकीपटू त्यांना मिळाला. तो केवळ अपवाद ठरला. कारण, हळूवार बॉल टाकणं हे तिथल्या खेळाडूंच्या रक्तातच नव्हतं. एरवी भन्नाट वेगाने बॉल समोरच्या बॅट्समनवर सोडायचा हेच बाळकडू तिथल्या प्रत्येक बॉलरला मिळालं होतं.
१९८३चा वर्ल्डकप आठवा. त्यावेळी मायकेल होल्डिंग सीमारेषेजवळून धावत येऊन बॉलिंग करत असल्याचं जुन्या पिढीतल्या अनेकांनी पाहिलं असेल. जर बॉलिंगचा रनअपच असा लांबलचक असेल तर बॉलच्या वेगाची आपण केवळ कल्पनाच करू शकतो.
तोच वारसा नंतर वेन डॅनियल विन्स्टन डेविस, पॅट्रिक पॅटरसन, इयान बिशप अशांनी पुढे नेला. त्यावर कळस चढवला तो कोर्टनी वॉल्श आणि कर्टली अँब्रोज या जोडगोळीने. त्यानंतर मात्र, इंडिजमधला वेगवान मारा खंगत गेला आणि आता तर भूतकाळातल्या रम्य आठवणींमधे रमणं एवढंच काय ते उरलंय.
बॅटींगमधे सर ह्युबर्ट सटक्लिफ हे नाव कोणीच विसरणार नाही. त्यानंतर महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स, रोहन कन्हाय, क्लाईव लॉईड, विवियन रिचर्ड्स, गॉडर्न ग्रीनिज, डेस्मंड हेन्स, रिची रिचर्डसन अशी किती तरी नावं सांगता येतील. हा वारसा ब्रायन लाराने पुढे नेला. मात्र, सध्याच्या टीममधे तसे बेडर बॅट्समन दिसत नाहीत.
या टीमने लॉईडच्या नेतृत्वाखाली १९७५ आणि १९७९मधे पाठोपाठ वर्ल्डकप जिंकले. १९८३मधे भारताने त्यांच्यावर आश्चर्यकारक विजय मिळवला. त्याचं चित्रण आजही आपल्याला युट्यूबवर पाहायला मिळतं. त्यानंतरही वेस्ट इंडिजचा टीमचा जगभरात बोलबाला राहिला.
नामवंत खेळाडू निवृत्त होत गेल्यानंतर तेवढ्या ताकदीचे खेळाडू इंडिजला मिळाले नाहीत. नाही म्हणायला २००४मधे इंडिज टीमने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. शिवाय २०१२ आणि २०१६मधे टी-ट्वेंटी विजेतेपद पटकावलं. हे अपवाद सोडले तर क्रिकेटच्या तिन्ही विभागांत म्हणजे कसोटी, वनडे आणि टी-ट्वेंटीमधे ही टीम सध्या जवळपास तळाला आहे.
हेही वाचा: क्रिकेटचे लघुउद्योग सुटलेत सुसाट
वेस्ट इंडिज हा एकसंध देश नाही हे आधी जाणून घेतलं पाहिजे. कॅरेबियन समुद्रातल्या अनेक बेटांवरच्या समूहातून ही टीम निवडली जाते. या प्रत्येक देशाचं म्हणजेच बेटाचं स्वतंत्र चलन आहे. प्रत्येकाचं वेगळे राष्ट्रगीत आहे. प्रत्येक बेटाचा आकार छोटा आहे. निसर्गसौंदर्यामुळे जगभरातले पर्यटक या बेटांना आवर्जून भेट देतात. त्यामुळे पर्यटन हाच तिथल्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत. कोरोनाकाळात या पर्यटनाचेही बारा वाजले.
क्रिकेटमधे मुळातच पैसा कमी. तशातच तिथलं क्रिकेट मंडळ आर्थिकदृष्ट्या संपन्न नाही. आजसुद्धा मानधनावरून मंडळ आणि खेळाडू यांच्यातील वाद शिगेला पोचल्याचं दिसून येतं. शिवाय एवढा वेळ रक्त आटवून खेळलं तरी तुटपुंज्या मानधनात कुटुंब कसं चालवायचं याची विवंचना खेळाडूंना आहे. बेसबॉल किंवा अॅथलेटिक्समधे असलेला प्रचंड पैसा कॅरेबियन बेटांवरच्या गुणवंत खेळाडूंना आकर्षित करत असेल तर त्याल नवल ते कसलं.
त्यामुळे क्रिकेटला कोणीही वाली उरलेला नाही. आजकाल कसोटी क्रिकेटला प्रेक्षकांची फारशी उपस्थिती लाभत नाही. पाच दिवस चालणार्या सामन्यांपेक्षा वनडे किंवा टी-ट्वेंटी सामन्यांवर प्रेक्षक तुटून पडत असल्याचं दिसतं. कोणत्याही व्यावसायिक खेळाडूची कारकीर्द दीर्घ काळासाठी नसतेच. उमेदीच्या काळातच त्याला पैसा कमवायचा असतो.
क्रिकेटमधे याची काहीही शाश्वती नाही. इंडिजमधे तर नाहीच नाही. १९८०च्या दशकात इंडिजच्या कसोटी टीममधून खेळलेल्या अनेक क्रिकेटपटूंची अवस्था सध्या दयनीय आहे. इच्छा असूनही तिथलं क्रिकेट मंडळ या खेळाडूंसाठी काहीही करू शकत नाही. कारण, या मंडळाकडे माजी खेळाडूंची काळजी घेण्यासाठी पुरेसा पैसाच नाही.
सध्याच्या खेळाडूंनी हे सगळं चित्र जवळून पाहिलंय. त्यामुळेच त्यांनी हमखास बक्कळ पैसा देणार्या इतर खेळांचा रस्ता धरल्याचं दिसून येतं. अमेरिकन बास्केटबॉल म्हणजेच एनबीएमधे अक्षरशः पैशाचा पूर वाहत असतो. वेस्ट इंडिजचे खेळाडू उंचपुरे आणि बलवान असल्यामुळे त्यांना तिथं प्रचंड मागणी आहे.
अॅथलेटिक्समधे उसेन बोल्ट कसा अब्जाधीश झाला हेही युवा खेळाडूंनी पाहिलंय. परिणामी या युवाशक्तीला मैदानी खेळांबद्दल आकर्षण निर्माण झालंय. त्यातही प्रचंड पैसा आहे. ही सगळी प्रज्ञा इतर खेळांकडे वळत चालल्याने वेस्ट इंडिजमधील क्रिकेटला वाली कोण, असा मूलभूत प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय.
नामांकित खेळाडूंना त्यांच्या अ, ब आणि क या श्रेणीनुसार दोन ते तीन कोटी रुपये वार्षिक मानधन मिळत असलं तरी कधी टीममधून डच्चू दिला जाईल याची शाश्वती नसते. म्हणजे सातत्याने प्रत्येकाच्या डोक्यावर टांगती तलवार. याच्या उलट बास्केटबॉल किंवा बेसबॉलमधे साधारणपणे एक अथवा दोन तासांत सामना संपतो. तिथं आपल्या अंगभूत ऊर्जेचा पूर्ण क्षमतेने वापरही करता येतो.
पैशाचं म्हणाल तर क्रिकेटच्या कित्येक पटीने अर्थार्जन या दोन्ही खेळांत होत जातं. शिवाय एकदा नाव झालं की, मग जाहिरातींमधूनही अफाट पैसा मिळतो. कारकीर्द संपल्यानंतर समालोचक किंवा प्रशिक्षक म्हणूनही काम करण्याची संधी मिळते. मात्र, त्यासाठी आधी पाया भक्कम असणं गरजेचं आहे. त्याचीच वानवा इंडिज क्रिकेटमधे दिसून येते.
हेही वाचा: लेजंड धोनीचा अखेरचा 'षटकार'
अलीकडे तर तिथल्या क्रिकेट मंडळाची दादागिरीही वाढत चाललीय. सात वर्षांपूर्वी मंडळ आणि खेळाडू यांच्यातल्या तणावाने टोक गाठलं होतं. जर खेळाडूंनी करारावर सही केली नाही तर करारच रद्द करण्याची धमकी तेव्हा मंडळाने दिली होती. दिवसेंदिवस इंडिज क्रिकेटमधे वशिलेबाजीही बोकाळत चाललीय. त्यामुळे गुणवंत खेळाडूंना आपली कदर होत नसल्याची सल लागून राहिलीय.
केवळ पैसा हेच इंडिजमधल्या क्रिकेटच्या दैन्यावस्थेचं एकमेव कारण नाही. त्याच्या जोडीला इतर अनेक घटकही तेवढेच कारणीभूत आहेत. पंधरा देशांची टीम वेस्ट इंडिज म्हणून खेळते तेव्हा काही प्रमाणात भांड्याला भांडं लागणं स्वाभाविक म्हटलं पाहिजे. मात्र, गेल्या वीस वर्षांपासून या भांड्यांचा खणखणाट वाढत चाललाय. ही धोक्याची घंटा म्हटली पाहिजे.
यावर उपाय म्हणजे आमूलाग्र बदल. त्यासाठी तिथल्या मंडळालाच पुढाकार घेण्याशिवाय गत्यंतर नाही. खेळाडूंना सर्वप्रथम पुरेसं मानधन आणि तेसुद्धा ठरलेल्या वेळेत मिळेल याची खबरदारी घेणं हे मंडळाचं काम आहे. त्यासाठी मंडळाने नवनवे आर्थिक स्त्रोत शोधायला हवेत. इथं एकच उदाहरण पुरेसं आहे.
भारतीय क्रिकेट मंडळाला संपन्न करण्यात जगमोहन दालमिया आणि इंदरजीत सिंग बिंद्र यांनी सिंहाचा वाटा उचलला होता. जसं की, दालमिया यांनी मैदानावरची सीमारेषासुद्धा जाहिरातदारांना विकली. बॉल जेव्हा सीमापार जातो तेव्हा सीमारेषेवरही आपल्याला विविध उत्पादनांच्या जाहिराती तिथं झळकताना दिसतात.
यासारख्या उपायांतूनच आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळ जगातली सर्वात श्रीमंत संस्था बनलीय. तसाच मार्ग इंडिजच्या क्रिकेट मंडळाने अनुसरणं गरजेचं आहे. त्याशिवाय मरणपंथाला लागलेल्या स्थानिक क्रिकेटला उभारी देणं आणि क्रिकेटचं काही प्रमाणात तरी व्यावसायिकीकरण करणं हे काही उपाय असू शकतात.
क्रिकेट हीच आजही वेस्ट इंडिजची ओळख आहे. त्यातला इंडिज हा शब्द तर आपल्यालाही त्यांच्याशी भावनिकदृष्ट्याही जवळ आणतो. संपन्न पंरपरा लाभलेल्या इंडिजच्या राजेशाही क्रिकेटला लागलेली घरघर चिंताजनक आहे. प्रबळ इच्छाशक्ती दाखवली तर त्यातूनही मार्ग निघू शकतो. नाहीतर वेस्ट इंडिज क्रिकेट इतिहासजमा व्हायला फारसा वेळ लागणार नाही.
हेही वाचा:
आयपीएलच्या तपाची कहाणी : थोडी मिठी, जास्त खट्टी
सचिन, आम्ही तुला हृदयातून रिटायर्ड करू शकत नाही
स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं
कमीत कमी सोयीसुविधा, तरीही अपंगाच्या भारतीय क्रिकेट टीमचं मोठं यश