तथागत: बुद्धाला भेटण्याचा, भेटवण्याचा प्रामाणिक प्रयत्न

०१ एप्रिल २०२२

वाचन वेळ : ४ मिनिटं


लेखक, कवी समर यांची ‘तथागत’ ही बुद्धजीवनावरची एक नितांतसुंदर कादंबरी आहे. सध्याच्या कोलाहलयुक्त भोवतालात आजची पिढी किती असोशीने बुद्धाला भेटू पाहते आहे, किंबहुना, बुद्धाला भेटत राहणं, त्याच्यापासून प्रेरित होत राहणं किती अगत्याचं आहे, याचं अधोरेखन ‘तथागत’ ही कादंबरी करते.

तथागत भगवान बुद्ध यांचं तत्त्वज्ञान अखिल सृष्टीच्या मूलगामी अस्तित्वशोधातून जन्माला आलेलं. जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधल्या जीवनप्रवासाचं चिंतन करणारं. मानवी जीवनाचाच नाही, तर सृष्टीचा हा प्रवास कसा सुखकर, आनंदमयी होईल, या दृष्टीने समग्र जगण्याचं भान देणारं आणि हे जगणं आणि मरण या दोन्ही गोष्टी सुंदर करणं, या भोवती आणि यासाठी हे तत्त्वज्ञान माणसाला प्रेरित करणारं.

त्याच्या आगे आणि मागे जे काही दृष्टीच्या आणि महत्त्वाचं म्हणजे अनुभूतीच्या पलिकडलं आहे, त्याविषयी तथागत मौन बाळगतात. त्या मौनातून अनुभूतीहीन गोष्टींमधला फोलपणा दर्शवतात. विज्ञानवाद हा बुद्धतत्त्वज्ञानाचा गाभा आहे, तो त्यामुळंच. कारण ज्याची अनुभूती घेता येते, त्याच तथ्यांना विज्ञानात स्थान असतं.

बुद्धाच्या तत्त्वज्ञानातही अनुभूतीचं तेच स्थान आहे. त्याचप्रमाणं बुद्ध आपल्या तत्त्वज्ञानालाही काळानुरुप बदलण्याचं स्वातंत्र बहाल करतो- मात्र ती सुद्धा या वैज्ञानिक मार्गांनीच. हे याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य.

बुद्धाचं पंचशील आणि अष्टांगमार्ग

जीवनात दुःख आहे, त्या दुःखावर मात करता येणं शक्य आहे आणि ते दुःख निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्न करता येणं शक्य आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या विकारांपासून दूर राहणं त्यासाठी आवश्यकच आणि पंचशील आणि अष्टांगमार्ग हे त्यासाठीचे प्रमुख मार्ग.

अहिंसा, अचौर्य, अव्यभिचार, सत्यवदन आणि अपेयपान त्याग हे पंचशील, तर सम्यकदृष्टि, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक जिविका, सम्यक प्रयत्न, सम्यक स्मृति आणि सम्यक समाधि हे अष्टांग. या मूलभूत गोष्टींचा अंगिकार केला तर मनुष्याचं जीवन सुखी आणि आनंदी होऊन जाईल.

हेही वाचा: गोड ऊस तोडणाऱ्या कामगाराचं कटू वास्तव मांडणारं पत्र

बुद्ध तत्त्वज्ञानाचं नीट आकलन

बुद्ध तत्त्वज्ञानाचं स्मरण होण्याचं कारण म्हणजे नुकतीच लेखक, कवी समर यांची ‘तथागत’ ही बुद्धजीवनावरची एक नितांतसुंदर कादंबरी वाचून पूर्ण झाली. विशी-पंचविशीच्या आतबाहेरच्या एका तरुण संवेदनशील लेखकाला बुद्धाच्या चरित्राला भेटावंसं वाटणं आणि त्यापुढे जाऊन त्याचं सहजसोप्या भाषेत निरुपण करावं, अशा पद्धतीनं बुद्ध मांडावासा वाटणं, हीच गोष्ट माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची आहे.

आजची पिढी बुद्धाचा साकल्यानं विचार करू पाहते आहे, त्याला भेटू पाहतेय, त्याच्यापासून काही घेऊ आणि समाजाला देऊ पाहते आहे, ही केवढी महत्त्वाची गोष्ट आहे. त्याहून अधिक महत्त्वाचं म्हणजे ही वर्णनात्मक स्वरुपाची कादंबरी नाही, तर प्रथमपुरूषी निवेदनाच्या स्वरुपात ती साकारलेली आहे. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाच्या बाबतीत म्हटलं तर ही गोष्ट सोपी आणि म्हटलं तर त्याहून अवघड आहे. कारण प्रथमपुरूषी निवेदनाचे जसे लाभ आहेत, तशा मर्यादाही आहेत.

पौराणिक कथापुरूषांच्या बाबतीत निवेदन लेखकाच्या कल्पनांप्रमाणे फुलवता येऊ शकतं. बुद्धासारख्या ऐतिहासिक व्यक्तीरेखेच्या संदर्भात मात्र अत्यंत चिकित्सकपणानं वाक्यरचना करावी लागते. त्याच्या तत्त्वज्ञानाचं उपयुक्त आकलन करून घेणं ही त्यासाठीची पूर्वअट आहे. आणि यात समर पूर्णांशाने यशस्वी ठरलेले आहेत.

दुसरी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे अशावेळी लेखक संदर्भसाधनं कोणती वापरतो? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ यांसह अनेक अधिकृत संदर्भसाधनांचा अतिशय योग्य पद्धतीने वापर करत ही कादंबरी साकारली आहे. बुद्धाच्या धम्माचं आधुनिक स्वरुप जगाला दाखवून देणाऱ्या बाबासाहेबांनाच ही कादंबरी लेखकाने अर्पण केली आहे.

बुद्धाविषयी लिहीण्याच्या प्रेरणेचं मूळ

‘तथागतांनी मानवी मनाचा, अस्तित्वाचा आणि वैश्विक दुःखाचा सखोल अभ्यास करून एक मनुष्यनिष्ठ तत्त्वज्ञान मांडलं. हा प्रवास अद्भुत आहे. तो ऐकून, वाचून त्याबद्दल लिहीण्याचा मोह कुणालाही होईल. तसा मलाही झाला. त्यातूनच ‘तथागत’ कादंबरी साकार झाली’, अशी भूमिका लेखकाने मांडली आहे.

बुद्धाविषयी लिहीण्याची प्रेरणा त्या तत्त्वज्ञानाच्या ताकदीइतकीच लेखकाच्या संवेदनशीलतेमधूनही आलेली आहे, हे मात्र आवर्जून सांगावंसं वाटतं. तथागतांनी केवळ विचार मांडले नाहीत, तर सामाजिक क्रांतीही केली. ते केवळ उपदेश करत बसले नाहीत, तर त्यांनी समाजही बदलला. तथागतांच्या या क्रांतीकारी कार्याचं प्रतिबिंब उमटविण्यामध्ये ही कादंबरी निश्चितपणे यशस्वी झालेली आहे.

हेही वाचा: मनोरंजन ब्यापारी: रिक्षा चालवत ते जगप्रसिद्ध लेखक बनलेत

कादंबरीची आत्मनिवेदनपर शैली

कादंबरीसाठी ज्येष्ठ विचारवंत प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांचं मार्गदर्शन समर यांनी घेतलेलं आहे. स्वतःच्या साहित्यकृतीला वाचकांना सादर करण्यापूर्वी सर्व कसोट्यांवर ती जास्तीतजास्त निर्दोष करण्याचा लेखकाचा प्रयत्न स्तुत्य आहे. कादंबरी या फॉर्मचा आधार घेत असताना वास्तवाशी जास्तीत जास्त प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करणं, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मला सर्वाधिक भावली ती हीच गोष्ट.

आत्मनिवेदनपर शैलीत साकारलेली ‘तथागत’ ही ५०२ पानांची कादंबरी आहे. यात स्वतः बुद्ध सिद्धार्थ, बोधिसत्त्व सिद्धार्थ, गौतम बुद्ध आणि तथागत या चार विविध अवस्थांमधे संवाद साधतात. त्यांच्याशिवाय पत्नी यशोधरा, पिता शुद्धोधन, ब्रह्म सहंपती, शिष्य सारिपुत्त आणि शिष्या भिक्खुणी खेमा अशा सहा जणांच्या तोंडून बुद्धचरित्राचे विविध टप्पे अतिशय अलगद उलगडत जाते.

या पात्रनियोजनातून सुद्धा कादंबरीकाराच्या कौशल्याची आणि दांडग्या अभ्यासाची प्रचिती येते. अत्यंत विचारपूर्वक ही योजना केलेली आहे. त्यासाठी समर यांना दाद द्यावीशी वाटते. त्याशिवाय ज्या ओघवत्या शब्दांमधे बुद्धाच्या तोंडून त्याचं तत्त्वज्ञान स्रवतं, मला वाटतं, अलिकडच्या काळात इतक्या सोप्या भाषेत बुद्ध तत्त्वज्ञान आलेलंच नाही.

सहजसोप्या भाषेतला बुद्ध

तत्कालीन पाली या लोकभाषेत ते लोकांना कसे भिडले, भावले असावे, हे लेखकाच्या साध्या सोप्या मराठीतून समजतं. नाहीतर सहजसोप्या बुद्धाला अवघड करून सांगणारे विद्वतजनच सभोवतालात अधिक दिसतात. या मध्यस्थांमुळे बुद्ध लोकांना अवघड वाटतो. त्यापेक्षा लोकांनी बुद्धाला थेट भेटणं कधीही चांगलं. ते किती योग्य आहे, हे कादंबरी वाचताना जाणवल्याशिवाय राहात नाही.

सध्याच्या कोलाहलयुक्त भोवतालात आजची पिढी किती असोशीने बुद्धाला भेटू पाहते आहे, किंबहुना, बुद्धाला भेटत राहणं, त्याच्यापासून प्रेरित होत राहणं किती अगत्याचं आहे, याचं अधोरेखन ‘तथागत’ ही कादंबरी करते. यात बुद्धाचं जीवनचरित्र, बुद्धाचं कार्य आहेच, पण त्यापलिकडे त्याची सार्वकालिक प्रस्तुतताही दृगोच्चर होते. हेच या कादंबरीचं आणि कादंबरीकाराचं योगदान आहे.

पुस्तक: तथागत
लेखक: समर
प्रकाशक: समर प्रकाशन, पुणे
पानं: ५०२
किंमत: ५००/-

हेही वाचा: 

दिवाळी स्पेशल कथा : ‘ब्याव’

कथागत: अल्पसंख्यांकांच्या अस्वस्थ वर्तमानाच्या कथा

बाहेरच्या झगमगाटात काळजात कँडल पेटवते ग्लुकची कविता

आर्या बॅनर्जी : आयुष्याचा टोकाला जाऊन शोध घेणारी मुसाफिर