क्रिकेट जगताला नेहमी नवनवे हिरो लागतात. रिंकू सिंग हे त्याच मांदियाळीतलं आणखी एक नाव. रिंकूकडे गुणवत्ता आहे आणि तो सक्षमही आहे. पण, सलग पाच षटकार खेचत त्याने आपल्याकडे वाघाचं काळीज आहे हे दाखवून दिलंय. अलिगढच्या या छोर्याचं नाव आता सातत्याने प्रकाशझोतात राहणार आहे.
एलपीजी सिलिंडर्स घरोघरी पोच करणं हा रिंकूच्या वडलांचा व्यवसाय. घरी वातावरण पहावं तर अठरा विश्व दारिद्रय. रोजंदारी केली तरच संध्याकाळी घरची चूल पेटणार, हे त्रिकालाबाधित सत्य. रिंकू १६ वर्षाखालच्या गटातून खेळत होता, त्यावेळी त्याच्या वडलांनी रिंकूला सल्ला दिला होता, ट्यूशन क्लास सुरु होण्याआधी फरशी पुसण्याचं काम कर, थोडे फार पैसे मिळतील, आपलं घर चालेल. पण, म्हणतात ना, ऐकावं जनाचं, करावं मनाचं. रिंकूने तेच केलं.
रिंकूच्या नसानसात क्रिकेट पुरतं भिनलं होतं. त्याने आपल्या मनाचं ऐकलं. ना फरशा पुसल्या, ना कधी अशी छोटी छोटी कामं केली. त्यानं पूर्ण वेळ स्वतः ला क्रिकेटप्रती समर्पित केलं आणि आता मागच्या आठवड्यात ५ चेंडूंवर सलग ५ षटकार खेचत त्याने केकेआरला एकहाती, स्वप्नवत विजय मिळवून दिल्यानंतर वेळ अशी आली आहे की, अवघ्या क्रिकेट विश्वातून एकच प्रश्न विचारला जातोय, कौन है ये रिंकू.
क्रिकेट जगताला नेहमी नवनवे हिरो लागतात. रिंकू सिंग हे त्याच मांदियाळीतलं आणखी एक नाव. वास्तविक, अलीगढ हे देशातल्या महत्त्वाच्या सांस्कृतिक केंद्रापैकी एक. १४८ वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात या शहराने अनेक दिग्गज घडवले.
एकापेक्षा एक अव्वल दर्जाचे लेखक, कवी, साहित्यिक, कित्येक बुद्धिवंत, विद्वान या शहराने दिले. अगदी मेजर ध्यानचंद आणि लाला अमरनाथ हे देखील मूळचे अलिगढचेच. क्रीडा विश्वात ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते माजी भारतीय हॉकी कर्णधार जफर इक्बाल हेही याच शहराची देन. योगायोग म्हणजे रिंकूही याच भूमीत घडला आहे.
घरची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची. एकूण सात जणांचं कुटुंब. रिंकूसह एकुण पाच भावंड आणि त्यांचे पालक असा मोठा लवाजमा. आश्चर्य वाटेल, पण, रिंकूसह सर्व भावंड लहान असताना खानचंद यांच्या जीवावर सर्व कुटुंब चालायचं.
खानचंद एलपीजी सिलिंडर्सचं घरोघरी वितरण करायचे. नंतर रिंकूसह सर्व मुलं मोठी होऊ लागली आणि ज्यावेळी वडलांना आणखी एखाद्या कामासाठी बाहेर जावं लागायचं, त्यावेळी सिलिंडर वितरणाची जबाबदारी त्यांच्या या पाच मुलांवर असायची.
हेही वाचाः अपघाताने जन्माला आलेल्या वनडे क्रिकेटची आज पन्नाशी
मुळात अवजड एलपीजी सिलिंडरची ने आण करण्यासाठी, ते उचलून एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी पोचवण्यासाठी मोठी ताकद लागते. शरीर धष्टपुष्ट, काटक असावं लागतं.
वडील एखाद वेळेस नसल्यास त्यांच्या ऐवजी रिंकू आणि त्याचे भाऊ दुचाकीवरुन सिलिंडरचं घरोघरी, हॉटेल्सवर वितरण करायचे. अशा या प्रतिकूल परिस्थितीत रिंकूचं क्रिकेट खेळणं त्याच्या वडलांना वेळ वाया घालवण्यासारखं वाटायचं. पाच मुलांपैकी कोणी सिलिंडर पोचते करायला नकार दिला तर वडलांचा मार मिळणं निश्चित असायचं.
जोवर सिलिंडर पोचते करुन परतत नाही, तोवर वडील हातात काठी घेउन दारात बसलेले असायचे. कधी कुठल्या मुलाने जर यात कंटाळा केला तर छडी बसायचीच. रिंकू या आठवणीला उजाळा देताना एकदा म्हणाला होता, पापा से हम पाँचो भाईयोंको बहोत मार पडी है!
रिंकू अभ्यासही करत नाही, कामात मदतही करत नाही, आणि जे करायचे ते सोडून क्रिकेट खेळत बसतो, हे त्याच्या वडलांना अजिबात रुचत नसे. या पार्श्वभूमीवर, रिंकूला क्रिकेट खेळण्यासाठी मार खावा लागणं केव्हा थांबलं, ते ही रंजक आहे.
डीपीएस अलिगढने शालेय वर्ल्डकप नावाची स्पर्धा आयोजित केली होती आणि रिंकूला त्यात मालिकावीराचा पुरस्कार लाभला. आश्चर्य म्हणजे, त्यावेळी प्रथमच रिंकूचा खेळ पाहण्यासाठी त्याचे वडील थेट स्टेडियमवर आले होते. रिंकूला त्यांच्या समोरच मालिकावीरासाठी दिली जाणारी मोटरबाईक प्रदान करण्यात आली आणि रिंकूला त्यानंतर त्याच्या वडलांकडून कधीही मार खावा लागला नाही.
रिंकू खेळत असताना इंटर कॉलनी किंवा क्लब मॅचेस खेळण्यासाठी लेदर चेंडू विकत घ्यावा लागत असे आणि आश्चर्य म्हणजे रिंकूकडे यासाठीही पैसे नसायचे. एकदा तर रिंकूला कानपूरला खेळण्यासाठी जायचे होते, त्यावेळी त्याच्या आईने जवळच्या एका किराणा दुकानदाराकडून एक हजार रुपये उसने घेतले आणि रिंकूला कानपूरला पाठवले.
हेही वाचाः क्रिकेटच्या देवानेही विल्यम्सनला कॅप्टन म्हणून निवडलं, कारण
रिंकूला आपल्या क्रिकेट कारकिर्दीतही अनेक चढउतार पहावे लागले आहेत. बर्याचदा त्याच्या पदरी निराशाही आली. पण, तो क्षणिक अपयशाने ना कधी खचला, ना कधी निराश झाला.
उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेच्या १६ वर्षाखालच्या वयोगटात त्याच्याकडे दोनवेळा दुर्लक्ष करण्यात आलं होतं. पण, २०१२ मधे त्याने विजय मर्चंट चषक स्पर्धेतल्या पदार्पणाच्या सामन्यात १५४ धावांची शानदार खेळी साकारली आणि आपण इलाईट क्रिकेट खेळू शकतो, हा विश्वास त्याला मिळाला. पुढे दोनएक वर्षातच त्याची १९ वर्षाखालच्या गटात वर्णी लागली आणि नंतर थेट उत्तर प्रदेश वनडे टीममधे एन्ट्री झाली. त्यानंतर रिंकूला अजिबात मागे वळून पहावं लागलं नाही.
मध्यंतरी २०२१ प्रथमश्रेणी हंगामात रिंकूला दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात गुडघ्याची गंभीर दुखापत झाली होती. ही दुखापत इतकी गंभीर होती की, त्याच्या वडलांनीही ते खूप मनाला लावून घेतलं होतं. काही दिवस तर त्यांनी जेवणखाणही बंद केलं. पण, रिंकू यातून सावरला आणि त्याने आपल्या वडलांना समजावून सांगितलं की, अशा दुखापती या कोणत्याही व्यावसायिक खेळाडूसाठी खेळाचा एक अविभाज्य घटकच असतात.
एकदा व्यावसायिक क्रिकेट खेळायला सुरवात केल्यानंतर अनेक प्रकारचे त्याग करावे लागतात. अनेक गोष्टी सोडून द्याव्या लागतात. रिंकूने असे बरेच त्याग केलेत. आपल्या आजवरच्या वाटचालीत बालपणापासूनचे प्रशिक्षक मसूद अमिनी, मोहम्मद झिशान, अर्जुन सिंग फकिरा, नील सिंग, स्वप्नील जैन यांनी आपल्याला वेळोवेळी बरीच मदत केली, याचाही तो सातत्याने उल्लेख करतो.
रिंकूचे प्रशिक्षक अमिनी अभिमानाने सांगतात की, रिंकूमध्ये एक्स फॅक्टर आहे. हा एक्स फॅक्टरच त्याला नवनव्या उंचीवर घेउन जाईल. त्याची आक्रमकता त्याला उत्तम कसोटीपटू बनवेल, अगदी आघाडीचा, स्फोटक सलामीवीरही बनवेल.
मागच्या तीन वर्षात आयपीएलमुळे रिंकूचं आयुष्य बरंच बदललंय. अगदी अभिमानाने तो सांगतो, सारी दिक्कते दूर हो गयी है! मागच्या रविवारी आयपीएलमधे शेवटच्या षटकातल्या शेवटच्या पाच चेंडूंवर सलग ५ षटकार खेचत त्याने हे दाखवून दिलं की, लाखभर लोकांच्या साक्षीने, सारे अनामिक दडपण झुगारुन, प्रतिस्पर्धी संघाला पुरते नेस्तनाबूत करण्यासाठी जे वाघाचे काळीज लागते, ते काळीज देखील त्याच्याकडे आहे. असेल रिंकू तर नक्की जिंकू हा विश्वास देखील या रिंकूने दिलाय.
रिंकूने सलग पाच षटकारांचा विक्रम नोंदवला, त्यावेळी इयान बिशप समालोचन करत होते. रिंकूचे लागोपाठ ५ षटकार, त्याने खेचून आणलेला दुर्दम्य विजय, याचं वर्णन करता करता बिशप सहजपणे बोलून गेले. रिंकू सिंग, रिमेम्बर द नेम. खरं आहे ते. अलिगढच्या या छोर्याचं नाव आता सातत्याने प्रकाशझोतात राहणार आहे.
हेही वाचाः
वेस्ट इंडिजची 'त्रिमूर्ती' टी ट्वेन्टी वर्ल्डकपमधे धडकी भरवणार!
स्वर्गातल्या वडलांना येस पप्पा म्हणणाऱ्या जॉनी बिअरस्टोची गोष्ट
सगळं संपलंय, असं वाटेल तेव्हा शाहबाज नदीमची ही गोष्ट वाचा
शिवाजी पार्कचा श्रेयस अय्यर तर विराटच्या ‘नक्शे कदम पर’ चाललाय!