रावण : वैदिक संस्कृतीच्या विरोधाचं प्रतीक

१५ ऑक्टोबर २०२२

वाचन वेळ : ९ मिनिटं


रावण हा द्राविडी संस्कृतीचं प्रतीक समजलं जातं. आपल्याकडे कालौघात पुरातन साहित्यात या ना त्या कारणाने घालघुसड करण्याची प्रवृत्ती असल्यामुळे रामायणाची मूळ कथा नेमकी काय असावी याचा केवळ तर्क करावा लागतो. त्यामुळेच रावणाचं मूळ चारित्र्य आणि त्याच्या जन्माचा इतिहासही काय होता हे सुद्धा आपल्याला माहित नाही.

रामायण आणि महाभारत या महाकाव्यांचा भारतीय जनमानसावर प्रचंड प्रभाव आहे. किंबहुना भारतीयांचं नैतिक जीवन या महाकाव्यांमधल्या पात्रांच्या वर्तन आणि विचारांनी प्रभावित झालेलं आहे असं आपल्याला दिसून येईल. महाभारताची जटिलता, व्यामिश्रता रामायणात नाही. राम हा दैवी अवतार तर रावण ही खलप्रवृत्तीची व्यक्तिरेखा यांच्यात झालेला संघर्ष याभोवती मुख्य रामकथा फिरते.

रामकथा ही मुळची वीरकाव्य स्वरूपात असून सामान्य लोकांमधे ती आधीच प्रिय होती. याच मुळच्या कथाबीजावर संस्कार करत त्याचा कालौघात झालेला महाकाव्यमय आविष्कार म्हणजे आज उपलब्ध असलेलं वाल्मिकी रामायण अशी मान्यता आहे. सात कांडांचं हे रामायणसुद्धा मुळात पाचच कांडांचं होतं. पुढे अनेक शतकांनंतर मूळ संहितेला कोणा अनामिकाने लिहिलेलं बालकांड आणि उत्तरकांड जोडण्यात आलं.

आपल्याकडे कालौघात पुरातन साहित्यात या ना त्या कारणाने घालघुसड करण्याची प्रवृत्ती असल्यामुळे रामायणाची मूळ कथा नेमकी काय असावी याचा केवळ तर्क करावा लागतो. रावणाचं मूळ चारित्र्य आणि त्याच्या जन्माचा इतिहासही काय होता हे सुद्धा आपल्याला माहित नाही.

रावणाचं वेगळं चित्रण

सध्या जनमानसात पसरलेल्या अनेक रामकथांतून आपल्या समोर अवतरणारा रावण सीताहरणामुळे स्त्रीलंपट म्हणून बदनाम आणि दुर्गुणांचा पुतळा म्हणून उभा रहात असला तरी मूळ वाल्मिकी रामायणाचंच परीक्षण केलं तर मात्र रावणाचं एक उदात्त चित्र उभं राहतं. राम-रावण युद्धाचं तात्कालिक कारण सीताहरण असलं तरी त्या युद्धामागे दोन भिन्न संस्कृतींमधला संघर्ष हे कारण प्रधान होतं हेही सहज लक्षात येण्यासारखं आहे.

याशिवाय रामायणाची अनेक सांप्रदायिक आणि प्रादेशिक संस्करणं आहेत. त्यातला राम आणि रावण वेगळेच आहेत. जैन रामायनाची अनेक संस्करणं प्रसिद्ध असून यात रावण जैनांतल्या विशेष शक्ती असलेला विद्याधर श्रेणीचा त्रिखंडावर राज्य करणारा प्रतापी राजा आहे. तो तापसी तर आहेच पण शाकाहारीसुद्धा आहे. या रामायणानुसार रावणाची हत्या रामाहातून नाही तर लक्ष्मणाहातून झाली. रामाला मदत करणारे वानर प्राणी नाही तर सभ्य माणसंच होती तर वानरमुख हे त्यांचं ध्वजावरचं चिन्ह होतं. एकंदरीत रावणाचं एक वेगळंच सांप्रदायिक चित्रण जैन रामकथांमधे आलेलं आहे.

याउलट दशरथ जातकात येणा-या बौद्ध रामकथेचे आहे. या कथेतील दशरथ हा अयोध्येचा नव्हे तर बनारसचा राजा होता. रामपंडित आणि लक्ष्मणपंडित यांना वनवासात पाठवले गेले ते हिमालयात. या रामकथेत लंका नाही किंवा रावणही नाही. म्हणजेच सीताहरणही नाही.

हेही वाचा: प्रभू रामचंद्रः महान सांस्कृतिक संघर्षाचा यशस्वी नायक

राम-रावण व्यक्तिरेखा

एकाच भूमीत निर्माण झालेल्या या मुख्य तीन संस्करणात एवढं अंतर का असावं या प्रश्नावर विद्वानांनी बरीच चर्चा केलेली आहे. रामकथेचा वापर आपापल्या धर्मप्रचारासाठी करायचा असल्यामुळे मुळ कथेत सोयीस्कर बदल केले गेले असावेत असं एकंदरीत मत व्यक्त झालेलं आहे.

या तीनही संस्करणामागे सांप्रदायिक भावना प्रेरित असल्या तरी या कथेमागे मुळचा असा कोणतातरी स्त्रोत असला पाहिजे हे निश्चित. अर्थात तो आपल्याला आज ज्ञात नाही. त्यामुळे राम आणि रावण या व्यक्तिरेखांचं विश्लेषण उपलब्ध साधनांवरूनच करणं भाग पडतं.

एवढंच नाही तर रामकथा मुळात भारतात घडली की पूर्व इराणमधे, लंका म्हणजे आजची श्रीलंका की रावणाची लंका छत्तीसगढ, ओडीशात होती यावर रामायणाचाच आधार घेऊन विद्वानांत हिरिरीने चर्चा होत असते. रामकथा खरंच होऊन गेली असं मानणारे भाविक जसे आहेत तसंच ही कथा काल्पनिक आहे असे मानणारा वर्गही आहे. या कथेतून सांस्कृतिक इतिहास आणि संघर्ष शोधणारे विद्वानही कमी नाहीत.

सुष्ट-दुष्ट शक्ती संघर्ष

सध्याच्या रामायणातला राम-रावण संघर्ष हा आर्य आणि दक्षिणेतल्या अनार्यांमधला संघर्ष होय असं प्रतिपादित करणारा वर्ग जसा अस्तित्वात आहे तसाच रामाचं दक्षिणेत जाणं आणि रावणाशी युद्ध करणं म्हणजे आर्य संस्कृतीचे दक्षिणेतल्या द्रविड संकृतीवर झालेलं आक्रमण असंही प्रतिपादित करणारे विद्वान आहेत.

अनेक साहित्यिकसुद्धा अलीकडे रामायणातल्या पात्राचे आपल्या आकलनानुसार नवे अन्वयार्थ लावत आहेत. रावण आणि मन्दोदरीही राम सीतेप्रमाणेच कादंबरीकारांचे आवडीचे मुख्य पात्र बनले असल्याचं आपल्या लक्षात येईल. रावणावर लिहिल्या गेलेल्या कादंबऱ्या विक्रीचे उच्चांक मोडत आहेत. डॉ. वि. भि. कोलते यांनी तर पूर्वी 'महात्मा रावण' हा ग्रंथ लिहून रावण हा रामापेक्षा कसा श्रेष्ठ होता हे वाल्मिकी रामायणाच्याच आधारे दाखवून दिलं होतं.

पण भाविकांच्या दृष्टीने पाहिलं तर सृष्ट आणि दुष्ट शक्तीमधला संघर्ष म्हणजे रामायण. राम हा सृष्ट भावनांचं प्रतीक तर रावण हे दुष्ट भावनांचं प्रतीक. दसऱ्याला रावण दहन केलं जातं. सृष्टाचा दुष्टावरचा विजयोत्सव साजरा केला जातो. जनमानसासाठी हे ठिकही असेल कारण प्रकाश आणि अंधार, पवित्र आणि अपवित्र या द्वंद्वाने सर्वच मानवजातीला व्यापलेलं असून मंगलाचाच विजय व्हावा अशी भावना असणं अस्वाभाविक मानता येणार नाही. पण रावणाला अमंगल का मानावं असा प्रश्न विचारला तर समर्पक न्याय्य असं उत्तर कोणाकडे नसतं हे सुद्धा एक वास्तव आहे.

हेही वाचा: रामायण, महाभारताचं स्वागत करायला काय हरकत?

सांस्कृतिक संघर्षातला रावण

आज आहे त्या वाल्मिकी रामायणातल्या रावणाची व्यक्तिरेखा अंतता: खलस्वरूपी दाखवली गेली असली तरी तिला अनेक पैलू आहेत. म्हणजे ती सर्वस्वी काळ्याकुट्ट रंगात रंगवली गेलेली नाही. या कथेनुसार रावण पित्याच्या बाजूने ब्राह्मण आहे तर आईच्या बाजूने राक्षस आहे. ऐतिहासिक वास्तव पाहता असुर, राक्षस, यक्ष, नागादी संस्कृती भारतात सर्वत्र पसरलेल्या होत्या. वैदिक आर्य संस्कृतीहून या संस्कृती सर्वस्वी भिन्न होत्या. त्यांच्यात धर्मवर्चस्वासाठी युद्धही होत असत.

वाल्मिकी रामायणातला राम हा वैदिक संस्कृतीचा रक्षक म्हणून समोर येतो तर रावण हा राक्षस संस्कृतीचा प्रतिनिधी आहे. मुळात आज 'राक्षस', 'असुर' हे शब्दच बदनाम झालेले असले तरी या शब्दांचे मुळचे अर्थ वेगळे होते. ‘रक्षति इति राक्षसा:’ म्हणजे रक्षण करतो तो राक्षस तर असुर म्हणजे प्राणवान वीर्यवान. पण ते आर्यांचे शत्रू असल्याने त्यांना स्वाभाविकपणे काळ्या रंगात रंगवले गेले. मूळ संबोधनांचा अर्थही उलटापालटा झाला.

रावण याच सांस्कृतिक संघर्षातून दुष्ट स्वरूपात रंगवला गेला. त्यामुळेच पद्मपुराणाने रावण आणि कुंभकर्ण विष्णूचे पूर्वीचे शत्रू हिरण्याक्ष आणि हिरण्याकश्यपू या असुरांचे अवतार असल्याचं मानलेलं आहे. पण आज उपलब्ध नसलेल्या मुळ रामकथेत राम हा आर्य संस्कृतीचा प्रतिनिधी असावा असं दिसत नाही कारण वाल्मिकी रामायणातल्या रामकथेतच अनेक विसंगती आहेत.

अनेक विसंगत कथा

रामायणाच्या उपोद्घातातच, एकदा नारदमुनी भेटायला आले असता वाल्मीकी त्यांना विचारतात कि, 'हे मुनिश्रेष्ठा, सांप्रत पृथ्वीवर गुणवान, पराक्रमी, धर्मज्ञ, सत्यवचनी आणि कोपला असता देवांतही भिती उत्पन्न करणारा असा गुणसंपन्न पुरुष कोण आहे?' यावर नारदमुनी म्हणतात, 'इक्ष्वाकू वंशात जन्मलेला राम हा तुम्ही विचारता तसा आदर्श पुरुष आहे.'

वाल्मीकींच्या विनंतीवरुन नारदाने रामचरित्र सांगितलं. नंतर क्रौंचवधाची घटना घडली आणि आदिकाव्य जन्माला आलं. ब्रह्मदेवाच्या आज्ञेने वाल्मीकीने रामकथा लिहायला घेतली. यावरून एक गोष्ट दिसते ती अशी की वाल्मीकीला नारदाने सांगेपर्यंत रामकथा माहितच नव्हती. पण प्रत्यक्ष रामायणात मात्र वाल्मीकी हेही एक प्रत्यक्ष घटनांत भाग घेणारे पात्र आहे.

वाल्मीकीला राम माहितच आहे. असं असतानाही उपोद्घातातल्या कथा ही मोठी विसंगती आहे. मुळच्या वाल्मीकी रामायणातही फार मोठे फेरबदल केले आहेत याचेही ही विसंगती म्हणजे निदर्शक आहे. वैदिक संस्कृतीच्या प्रसाराचे साधन म्हणून रामाचा वापर करण्याच्या नादात अनेक विसंगत कथा निर्माण केल्या गेलेल्या आहेत असं आपल्याला दिसतं.

हेही वाचा: गुढीपाडवा FAQs: आपल्या मनात असणाऱ्या प्रश्नांची साधीसरळ उत्तरं

विसंगतीचं उदाहरण

जर रामायण हा आर्य अनार्यांतला संस्कृती संघर्ष होता असं मानलं तर एक राक्षसी कैकशी आणि वैदिक ऋषी विश्रवा यांचा विवाह कसा होऊ शकला असता हा प्रश्न मौलिक आहे. एक तर हा विवाह सांकृतिक सम्मिश्रनाचं प्रतीक मानावं लागेल किंवा ही कथा प्रक्षिप्त आहे असं मानावं लागेल. शिवाय वैदिक स्मृतीन्नुसार अपत्याला जर पित्याचाच वर्ण मिळत असेल तर रावणाला राक्षस म्हणता येणार नाही.

ज्याअर्थी तो राक्षस म्हटला गेला आहे, राक्षसांचाच राजा आहे आणि जर त्याचा सावत्र बंधू कुबेर यक्षांचा अधिपती आहे तर त्याचा पिता विश्रवा वैदिक ऋषी नव्हे तर तोसुद्धा यक्ष, राक्षस संस्कृतीचाच असला पाहिजे. मग त्याचा जन्म वैदिक-राक्षस संकरातून झाला हा वृत्तांत शंकास्पद बनून जातो. कारण राक्षस हे यज्ञविरोधीच नाही तर यज्ञविध्वंसक असल्याचं सध्याच्या रामायणानेच नोंदलेलं आहे. रामाने या यज्ञविध्वंसक राक्षसांशी युद्धंही केलेली आहेत. खरं तर रावण वेदवेत्ता असता तर तोही यज्ञांचा रक्षक असायला हवा होता, पण ते तसं नाही.

रावण वेदवेत्ताही आहे हे रामायण सांगत असतांना तो परमशिवभक्त आहे हे गौरवाने सांगते. शिवही स्मरारी म्हणजे यज्ञविध्वंसक आहे. रावणाला शिवतांडव स्तोत्राचा लेखक मानलं जातं. रावणाचं मुख्य वर्णन म्हणजे तो तंत्रशास्त्रांचा ज्ञाता आहे. तंत्रे प्राय: वेद्विरोधी असून तंत्रांचा निर्माता शिव मानला जातो. शिव ही अवैदिक देवता मानली जाते. रावण या अवैदिक शैव संस्कृतीचा प्रतिनिधी आहे. असे असतांना त्याची जी जन्मकथा दिली गेली आहे ती नंतरची विसंगतीपूर्ण भेसळ आहे हे उघड आहे.

त्यामुळे राम-रावण युद्ध हा मुळात भिन्न संस्कृतींमधला संघर्ष होता हे विद्वत्मत ग्राह्य धरावं लागतं. किंबहुना राम-रावण युद्ध होण्यामागे जे तात्कालिक कारण निर्माण झालं ते या संस्कृतींमधला विचार नितीकल्पनात असलेल्या भिन्न धारणांमुळे.

रामकथेतलं निर्णायक वळण

राम आणि रावणात शत्रुत्व निर्माण झालं ते शुर्पनखेमुळे. शुर्पनखा ज्या पद्धतीने राम आणि लक्ष्मणाला आपल्याशी विवाह करण्याचं साकडं घालते ती पद्धत स्त्री-स्वातंत्र्य असलेल्या मुक्त समाजातच शक्य आहे. राम आणि लक्ष्मण हे दुसऱ्या बंदिस्त संस्कृतीचे प्रतिनिधी असल्याने त्यांच्या नैतिक धारणा अर्थात वेगळ्या आहेत. त्यामुळे ते काममोहित झालेल्या शुर्पनखेला नुसता नकार देत नाहीत तर तिची कुचेष्टा करत तिला विद्रूप बनवतात.

स्त्रीचं वर्तन कसं असावं याबद्दलच्या मान्यता वेगवेगळ्या संस्कृतीत वेगळ्या असतात. त्यामुळे तसं पाहता शूर्पणखेचं वर्तन जसं तिच्या संस्कृतीच्या दृष्टीने न्याय्य आहे तसंच राम-लक्ष्मणाचं वर्तनही त्यांच्या सांस्कृतिक परिप्रेक्षात न्याय्य आहे. रामाने सीतेची अग्निपरीक्षाही घेतली ती त्याच्या संस्कृतीच्या मान्यतांच्या परिप्रेक्षात. पण शूर्पणखेला ती तिच्या संस्कृतीने दिलेलं व्यक्तिस्वातंत्र्य पाळत असतानाही मायावी रूप देवून तिचं चरित्र काळ्या रंगात रंगवलं आहे.

शुर्पनखा हा रामकथेतला निर्णायक वळण घेणारा हा टप्पा होता यात वाद नाही. तिला विद्रूप केल्याने रावण क्रोधीत झाला. त्याने राम-लक्ष्मणावर हल्ला करून सूड उगवण्याऐवजी सीतेचंच अपहरण केलं. सीतेने आपल्याला वश व्हावं म्हणून प्रयत्नही केले. पण केवळ सुडासाठी तिच्यावर अत्याचार केले नाही किंवा तिला विद्रूप बनवण्याचा प्रयत्नही केला नाही. खरं तर या वैराची सुरवात रावणाने केलेली नाही. पण राम आणि रावणातलं युद्ध शुर्पनखा प्रकरण आणि सीताहरण यामुळे अटळ झालं एवढं मात्र खरं. यात विचार केला तर दोषी बाजू कोणती हे ठरवणं आपापल्या नैतिक मान्यतांवर अवलंबून असेल हे उघड आहे.

हेही वाचा: संत तुकाराम, महात्मा गांधी आणि कोरोनाची साथ

रावणाचा मुख्य दुर्गुण

रामायणकर्त्यांना याची जाणीव असावी. त्यामुळे का होईना रावणाचं चारित्र्य त्यांनी फक्त काळ्याकुट्ट रंगात रंगवलेलं नाही. त्याचं महापराक्रमी असणं, परमशिवभक्त असणं, त्याची दहा मुखं त्याच्या दहा प्रकारच्या ज्ञानाची प्रतीकं असणं, उद्धट असला तरी महान राजनितीद्न्य असणं असे गुण मुक्तकंठाने गायले आहेत. त्याने लंका बळजबरीने आपल्या ताब्यात घेतलेली असली तरी त्याच्या शासनकाळात लंका ही वैभवाच्या शिखरावर पोचली होती हेही मान्य केलेलं आहे. हनुमानाने रावणाच्या दरबारात प्रवश केला तेव्हा हनुमान रावणाबद्द्ल आदराने उद्गारतो,

'अहो रूपमहो धैर्यमहोत्सवमहो द्युति:।
अहो राक्षसराजस्य सर्वलक्षणयुक्तता॥'

रामही पुढे जेव्हा रावणाला पाहतो तेव्हा तो मुग्ध होऊन म्हणतो, 'रूप, सौंदर्य, कांती, धैर्य अशा सर्व लक्षनांनी युक्त रावणातला 'अधर्म' बलवान नसता तर तो देवलोकांचाही स्वामी बनला असता.'

याचाच अर्थ वाल्मिकी रामायण रावणाचा मुख्य दुर्गुण तो अधर्मी असणं हा मानते. याचं कारण स्पष्ट आहे आणि ते म्हणजे रावणाने अनेक वैदिक यज्ञांचा विध्वंस केला. तो एका अर्थाने वैदिक धर्माचा विरोधक होता म्हणून वाल्मिकीने त्याला अधर्मी म्हणणं स्वाभाविक आहे. वाल्मिकीच्या दृष्टीने राम आणि लक्ष्मणाने शुर्पनखेशी जे वर्तन केलं ते मात्र अधर्मी नाही कारण त्यांच्या नैतिक मान्यता ते ज्या रामाला उपास्य मानतात त्या संस्कृतीशी निगडीत आहेत.

दुसरं म्हणजे, वाल्मिकीने मंदोदरीच्या तोंडून रावणाचा सांगितलेला मोठा दोष म्हणजे त्याची स्त्रीलंपटता. त्याला मंदोदरीसहित अनेक पत्नी असल्या तरी त्याचा जनानखाना पळवून आणलेल्या किंवा जिंकलेल्या स्त्रियांनी भरलेला होता. पण वास्तव हे आहे की तत्कालीन आर्य असोत की अनार्य, सर्वच राजे बहुपत्नीकत्व पाळत असत. जनानखाने बाळगणं ही अठराव्या शतकापर्यंतची साधारण गोष्ट होती.

संस्कृती संघर्ष

जर जैन रामायण गृहीत धरलं तर रामाच्याही चार भार्या होत्या. देवादिकांच्या लंपटपणाने अनेक पुराणकथा सजलेल्या आहेत. त्यामुळे हा आरोप रावणाला नीतीभ्रष्ट ठरवायला पुरेसा नाही. बरे, रावण खरेच लंपट असता तरी सीतेचे हरण केल्यानंतर तिलाही जनानखान्यात डांबले असते पण रावण तसे करत नाही. रावणाला ज्या कारणांनी दुर्गुणांचा पुतळा मानलं जातं त्यातलं खरं तर एकही कारण समर्थनीय नाही.

मूळ कथेत फेरफार करताना अनेकदा विसंगती निर्माण होतात आणि त्या दूर करण्यासाठी नव्या स्पष्टीकरण कथा बनवाव्या लागतात. वाल्मिकी रामायणही त्याला अपवाद नाही. मूळ राम हा वैदिक संस्कृतीचा प्रतिनिधी होता असं दिसत नाही. पण राम-कृष्ण हे विष्णूचे अवतार ठरवले गेल्यानंतर मूळ एकाच संस्कृतीत झालेल्या संघर्षाला अत्यंत वेगळे असं आर्य-अनार्य रूप दिलं गेलं. सध्याचं रामायण राम हा भगवंताचाच अवतार आहे अशी धारणा दृढ केल्यानंतरच्या काळात अंतिम स्वरूपात नेण्यात आलं आणि रावणाचं खलनायकत्व स्वाभाविकपणे दृढ झालं असं रिचमनसारखे अनेक विद्वान म्हणतात

एका अनामिक संस्कृत कवीने म्हटलंय की,

'लंकापते: संकुचितं यशो यत, यत्कीर्तीपात्रंरघुराज पुत्रंI
सर्वं तदेवादिकावे: प्रभावात, न निन्दनिया: कवया: क्षितींद्रे:II'

याचा अर्थ असा कि राम कीर्तीशिखरावर चढला आहे आणि लंकाधिपतीचं  यश इतकं कमी झालंय की, त्याला कारण आदिकवीचं सामर्थ्य. म्हणून कवीला कधी हिणवू नये कारण कवी मनात आणतील तर सामान्यालाही असामान्य बनवून टाकतील किंवा थोर पुरुषांची कीर्ती धुळीला मिळवतील. म्हणजे या संघर्षात रावण खलपुरूष आहे अशी भावना सर्व काळात अस्तित्वात नव्हती. फक्त ‘रावणायन’ लिहिणारा कोणी वाल्मिकीन्च्या सामर्थ्याचा कवी पुढे आला नाही.

हेही वाचा: गांधीजींचा राम आज समजून घ्यावाच लागेल

वेगवेगळ्या संस्कृतींचे प्रतिनिधी

वाल्मिकी रामायणावरूनच पाहिलं तरी ज्याचा पुतळा जाळला पाहिजे एवढा काही रावण दुष्ट नव्हता. पण आर्य किंवा वैदिक संस्कृती आणि राक्षस संस्कृतीतल्या समाजधारणा अत्यंत टोकाच्या विरुद्ध असल्याने आणि हे दोन्ही नायक आपापल्या संस्कृतीशी प्रामाणिक असल्याने हा संघर्ष झाला. रामाला उपास्य मानणाऱ्या वाल्मिकीन्नाही त्याची पुरेपूर जाण असल्याचं दिसतं.

रावण अधर्मी असल्याचं सांगत त्याला निंदत असतानाही जिथं शक्य आहे तिथं त्यांनी रावणाची मुक्तहस्ते प्रशंसा केल्याचं दिसतं. त्या अर्थाने पाहता सध्या उपलब्ध असलेल्या रामायणाचे राम आणि रावण हे दोन वेगवेगळ्या संस्कृतींचं प्रतिनिधित्व करणारे नायकच आहेत. त्यात खलनायक कोणाला म्हणायचं हे ज्याच्या त्याच्या सांस्कृतिक धारणांवर सोडून द्यायला पाहिजे.

वैदिक संस्कृतीच्या विरोधाचं प्रतीक

भारतात रावणाची किमान सात मंदिरं आहेत. तिथं रावणाची नित्य पूजा केली जाते. महाराष्ट्रासहित अनेक राज्यात रावण आडनाव असणारी कुटुंब आहेत. रावण आपला मुळ पुरुष आहे असं उतर भारतातल्या गोंडादि अनेक आदिवासी जमाती तर मानतातच पण गुजरातेतले साचोरा ब्राह्मणही त्याला आपला पूर्वज मानतात. कनौजी ब्राह्मणही आपला रक्षणकर्ता म्हणून त्याची नित्य पूजा करतात.

श्रीलंकेतले सिंहली आणि तमिळ लोक रावणाला महायोद्धा, कुशल प्रशासक आणि आदर्श पुरुष म्हणून गौरवतात. श्रीलंकेत कोन्नेश्वरम इथंही रावणाचं मंदिर आहे. म्हणजे रावण हा खलपुरुष आहे ही मान्यताही सार्वत्रिक नाही. अनेकांसाठी रावण पूजनीय आहे. त्यांचा पूर्वज आहे. आणि आजच्या सांस्कृतिक कोलाहलाच्या काळात अनेक विचारवंतांसाठी तो एक वैदिक संस्कृतीच्या विरोधासाठीचं प्रतीकही बनला आहे. एका सांस्कृतिक संघर्षातून निर्माण झालेली रामकथा आधुनिक युगातही वेगळे संदर्भ धारण करत आहे. रावणाच्या व्यक्तीत्वाकडे नव्या दृष्टीनं पाहिलं जातंय.

रामायणावरूनच पाहिलं तर रावणाचं चारित्र्य मिश्र स्वरूपात रंगवलं गेलं असलं तरी स्व-संस्कृतीशी असलेली त्याची निष्ठा ठायी ठायी प्रतीत होते. लोकाच्या दृष्टीने तो खलपुरूष असला तरी नेहमीच तसा राहील असं नाही.

हेही वाचा: 

जुने फोटो आणि रामायणः दोन पिढ्यांचा नॉस्टॅल्जिक ट्रेंड

अयोध्येत भव्य मंदिर महात्मा गांधींना का नकोसं वाटलं असतं?

युधिष्ठिर शक ते शिवशक, जाणून घेऊया महाराष्ट्राच्या कालगणनेचा प्रवास

गुढीपाडव्याला गुढीपाडवाच राहू दे, त्याला हिंदू नववर्ष कशाला बनवताय?