भारताला मिळणार का ऑलिम्पिक आयोजनाची संधी?

०९ मार्च २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या यशस्वी संयोजनामुळे भारत सध्या क्रीडा क्षेत्रातली मोठी सत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. आता ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाही आयोजित करण्याची क्षमता आमच्याकडे आहे, हे भारतीय क्रीडा संघटकांना जगाला दाखवून द्यायचंय. त्यादृष्टीनेच २०३०च्या ऑलिम्पिक युवा स्पर्धा आणि २०३६च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या संयोजनासाठी भारत प्रमुख दावेदार मानला जातोय.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं म्हणजेच आयओसीचं वार्षिक अधिवेशन पुढच्या वर्षी भारतात आयोजित केलं जाणार आहे. सामान्य वाचकांसाठी कदाचित ही छोटीशी बातमी असेल, पण ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या चाहत्यांसाठी या बातमीचा मतितार्थ खूप महत्त्वपूर्ण आहे. विशेषतः भारताच्या क्रीडा इतिहासात ती एक महत्त्वपूर्ण घटना असणार आहे. भारतात नजीकच्या काळात होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी ती नांदीच असणार आहे.

आयओसीचं वार्षिक अधिवेशन

आयओसीचं अधिवेशन दरवर्षी आयोजित केलं जातं. त्यामधे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांबद्दल वेगवेगळ्या नियमावलीमधे बदल आणि सुधारणा करणं, आयओसी सदस्य आणि पदाधिकारी निवडणं तसंच ऑलिम्पिकच्या यजमान शहराची निवड करणं यासारख्या ऑलिम्पिक चळवळीविषयी असणार्‍या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली जाते आणि भविष्यकाळातले वेगवेगळे महत्त्वपूर्ण निर्णयही घेतले जातात.

भारतात यापूर्वी १९८३मधे या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं. अधिवेशनाचं ठिकाण ठरवण्यासाठीही रीतसर मतदान होतं. भारताकडून पुढच्या वर्षीच्या अधिवेशनाच्या संयोजनासाठी जो प्रस्ताव मांडण्यात आला, त्याला ९९ टक्के सदस्यांनी भारताच्या बाजूने कौल दिला. भारताच्या द़ृष्टीने हा एक ऐतिहासिक विजयच आहे.

भारतीय शिष्टमंडळाचं सादरीकरण

त्याचं श्रेय आयओसीवर प्रतिनिधित्व करणार्‍या भारताच्या एकमेव महिला सदस्य श्रीमती नीता अंबानी, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नरिंदर बात्रा, युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुरागसिंग ठाकूर, भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते अभिनव बिंद्रा यांचा समावेश असलेल्या भारतीय शिष्टमंडळाकडे जातं.

बीजिंगमधे हिवाळी ऑलिम्पिकबरोबर आयोजित केलेल्या आयओसीच्या सत्रादरम्यान या शिष्टमंडळाने अधिवेशनाच्या संयोजन पदाबद्दल एक अत्यंत प्रभावी आणि पटवून देणारं सादरीकरण केलं. टोकियोत गेल्यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आणि त्यानंतर झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धांमधे भारतीय खेळाडूंनी घवघवीत यश मिळवलं, त्याचाही अप्रत्यक्ष परिणाम भारताच्या बाजूने निर्णय मिळवण्यासाठी झाला.

भारतात आयोजित केल्या जाणार्‍या अधिवेशनाला खूप सारे कंगोरे आहेत. ऑलिम्पिक युवा क्रीडा स्पर्धा आणि ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचं भारतीय क्रीडा संघटकांचं स्वप्न आहे. त्याशिवाय जगभर लोकप्रिय असलेल्या क्रिकेटचा समावेश ऑलिम्पिक स्पर्धांमधे होण्यासाठीही क्रिकेट संघटक उत्सुक आहेत.

याबद्दल या अधिवेशनात निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. तसेच आयओसीच्या वेगवेगळ्या समित्या असतात, त्या समित्यांवर भारतीय क्रीडा संघटकांना स्थान मिळवून देण्यासाठीही हे अधिवेशन उपयुक्त ठरणार आहे. क्रीडा क्षेत्रामधे अनेक वेळेला वेगवेगळे प्रयोग भारतामधे केले जातात आणि कालांतराने इतर देशांमधेही त्याचं अनुकरण केलं जातं.

हेही वाचा: फूटबॉलपटूच्या किकने बदलला मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन

क्रीडाक्षेत्रातलं सक्षम करियर

ऑलिम्पिक क्रीडा प्रवाहापासून भारतीय खेळाडू खूपच दूर आहेत, असं आपण नेहमी म्हणतो. पण गेल्या पाच-सहा वर्षांमधे भारतीय क्रीडा क्षेत्रात खूपच सकारात्मक वातावरण निर्माण झालंय. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमधे यश मिळवण्यासाठीच प्रत्येक खेळाडू स्वप्न पाहत असतो आणि त्याचं हे स्वप्न साकारण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनासह सर्वच संबंधित घटकांचंही त्याला सहकार्य मिळतंय.

वैद्यकीय खर्चावर होणार्‍या आर्थिक गुंतवणुकीऐवजी जर वेगवेगळे क्रीडा प्रकार आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी गुंतवणूक केली गेली, तर आर्थिक बचत जास्त होते. जीवन निरोगी होण्यासाठीही खेळांची मदत होत असते हे लोकांना आता कळू लागलंय. निरोगी भारत चळवळीअंतर्गत नियमित व्यायाम करण्यासाठी लोक वेळ देतायत. आपल्या मुलांना क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यासाठीही प्रोत्साहन देतायत. क्रीडाक्षेत्र हे सक्षम आणि चांगलं उत्पन्न देणारं करियर होऊ लागलंय, याची जाणीव सर्वांनाच होतेय.

स्पर्धा आयोजनाचा इतिहास

आशियाई क्रीडा स्पर्धांच्या इतिहासातली पहिली आशियाई स्पर्धा १९५१मधे भारतात आयोजित केली गेली होती. त्यावेळी ही स्पर्धा आशियाई अजिंक्यपद स्पर्धा म्हणून आयोजित केली गेली होती. कालांतराने आशियाई ऑलिम्पिक समितीकडून आशियाई क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला गेला आणि त्याची पहिली स्पर्धा नवी दिल्लीत १९८२मधे आयोजित केली गेली. तेव्हापासूनच खर्‍या अर्थानं आपल्या देशात क्रीडा क्षेत्राला चालना मिळाली.

भारतीय लोक आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय दिमाखात क्रीडा स्पर्धांचं आयोजन करतात, हे त्यानिमित्ताने सिद्ध झालं. त्यानंतर २००८ची राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा, २०१०ची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा तसंच जागतिक स्तरावरच्या अनेक खेळांच्या स्पर्धा, फ्रो-आशियाई क्रीडा स्पर्धा अशा यशस्वी संयोजनामुळे भारत हा क्रीडा क्षेत्रातला मोठी सत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. क्रिकेट, हॉकी, फुटबॉलच्या जागतिक स्पर्धाही कशा मोठ्या दिमाखात आयोजित केल्या जाऊ शकतात, हे भारतीय क्रीडा संघटकांनी दाखवून दिलंय.

हेही वाचा: मेजर ध्यानचंद यांनी हिटलरचा प्रस्तावही नाकारला

ऑलिम्पिकसाठी अंबानी समूहाची मदत

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाही आयोजित करण्याची क्षमता आमच्याकडे आहे, हे भारतीय क्रीडा संघटकांना जगाला दाखवून द्यायचंय. त्यादृष्टीनेच २०३०च्या ऑलिम्पिक युवा स्पर्धा आणि २०३६च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या संयोजनासाठी भारत प्रमुख दावेदार मानला जातोय. नवी दिल्लीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने जागतिक दर्जाची क्रीडा संकुले आणि सुविधा निर्माण झाल्या आहेत.

त्याशिवाय अहमदाबादमधे मोठं क्रीडा संकुल निर्माण केलं जातंय. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचं संयोजकपद मिळवण्यासाठीच अहमदाबादचे प्रयत्न सुरु आहेत. सुदैवाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांबद्दल ते नेहमीच सकारात्मक विचार करत असतात.

टोकियोत झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा आणि पॅरालिम्पिक स्पर्धांमधे सहभागी झालेल्या आणि त्यानंतर पदक जिंकणार्‍या प्रत्येक खेळाडूबरोबर त्यांनी वैयक्तिकरीत्या संवाद साधला होता. ऑलिम्पिक स्पर्धांसाठी त्यांनी दिलेल्या शुभेच्छा म्हणजे आपल्यावर पदक मिळवण्याची मोठी जबाबदारीच आहे, असं ओळखूनच प्रत्येक खेळाडूने प्रयत्न केले होते. त्यामुळेच या स्पर्धांमधे भारताला ऐतिहासिक यश मिळालं होतं.

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या संयोजनासाठी मोदी स्वतः जातीने लक्ष घालून निश्चितच प्रयत्न करतील, ही अपेक्षा आहेच. या स्पर्धांच्या संयोजनासाठी लागेल तेवढी आर्थिक तरतूद ते करतील, अशी भारतीय क्रीडा संघटकांनाही खात्री आहे. वेळ पडलीच तर, स्वतंत्ररीत्या या स्पर्धांच्या संयोजनाची जबाबदारी तांत्रिक आणि आर्थिकद़ृष्ट्या घेण्याचीही ताकद अंबानी समूहाकडे आहे.

क्रिकेटचा ऑलिम्पिकमधे समावेश

क्रिकेट हा भारतीयांसाठी श्वास किंवा धर्म मानला जातो. आशियाई क्रीडा स्पर्धांमधे यापूर्वीच क्रिकेटला स्थान मिळालंय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ या स्पर्धांबद्दल गांभीर्याने विचार करत नाही. पण स्वतः नीता अंबानी मुंबई इंडियन्स या आयपीएल टीमच्या सर्वेसर्वा मानल्या जातात. जर क्रिकेटचा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत समावेश झाला, तर निश्चितपणे भारतीय संघाचं एक पदक निश्चित होईल.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतही भारतीय संघटकांना महत्त्वाचं स्थान असतं. क्रिकेटच्या समावेशामुळे ऑलिम्पिकमधे भारतीय क्रिकेट संघटकांनाही हुकुमत गाजवता येईल. ऑलिम्पिक समितीच्या अधिवेशनाकडे अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर हे अधिवेशन भारतात खर्‍या अर्थानं ‘ऑलिम्पिक पर्व’ निर्माण होण्याची नांदी आहे, असं म्हणावं लागेल.

हेही वाचा: 

दंगल आणि लीगपेक्षा तर राणादादाने कुस्तीला ग्लॅमर दिलं

मानसिक आरोग्य नीट राहीलं तरच खेळाडू यश मिळवतील

ऑलम्पिकमधे उत्तेजक घेऊन खेळणाऱ्या खेळाडूंचं काय करायचं?

जगातल्या सगळ्यात मोठ्या दुर्गुणाविरुद्ध क्रिकेटनं एका हत्यारासारखं काम केलं

(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)