महाराष्ट्रातल्या शाळांना एप्रिल आणि मे असे दोन महिने उन्हाळी सुट्टी असतेच. यंदा कोरोना वायरसच्या सावटाखाली जूनमधे नवं शैक्षणिक वर्ष सुरू होईल की नाही याची काळजी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना लागून राहिलीय. अनेक देशांनी लॉकडाऊनंतर शाळा सुरू केल्या. पण शाळेतून कोरोनाचा प्रसार होऊ लागल्यामुळे पुन्हा बंद कराव्या लागल्या. त्यांना आलेल्या अनुभवातून आपण बरंच काही शिकू शकतो.
‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातली सगळी शाळा, कॉलेजं बंद राहतील’ अशी बातमी १४ मार्चच्या आसपास विद्यार्थ्यांनी ऐकली तेव्हा काय आनंद झाला असेल त्यांना! कितीही झालं तरी शाळेला सुट्टी, अभ्यासाला सुट्टी याचा आनंद मुलांना होतोच. त्यानंतर परीक्षा रद्द झाल्याचा आनंदही मुलांना होताच.
महाराष्ट्रात तसंही एप्रिल आणि मे हे दोन महिने शाळा, कॉलेजला उन्हाळ्याची सुट्टी असते. त्यानंतर जूनमधे नवं शैक्षणिक वर्ष चालू होतं. आता लॉकडाऊनमुळे मुलांना जवळपास अडीच महिने उन्हाळ्याची सुट्टी मिळाली. मात्र आता नव्या शैक्षणिक वर्षाचं काय करायचं असा प्रश्न या मुलांना, पालकांना आणि शिक्षकांनाही पडलाय.
हेही वाचा : हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?
महाराष्ट्रातलाच काय पण संपूर्ण भारतातला कोरोनाचा प्रसार अजूनही कमी झालेली नाही. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू केल्या तरी मुलांमधे कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता आहे. याचं उदाहरण म्हणून फ्रान्सकडे पाहता येईल. तिथल्याही शाळा १७ मार्चपासून बंद होत्या. कोरोना वायरसचा प्रसार कमी झाल्याचं बघून फ्रान्समधे पुन्हा शाळांची घंटा वाजू लागली. पण सुरू झाल्यावर पहिल्याच आठवड्यात शाळेत जाणाऱ्या ७० मुलांना कोरोना वायरसची लागण झाल्याचं समोर आलं.
फ्रान्स२४ या वेबपोर्टलवर दिलेल्या बातमीनुसार, फ्रान्समधे पूर्वप्राथमिक शाळेतल्या एका वर्गात एकावेळी १० मुलांना शिकवायची परवानगी दिली. तर प्राथमिक आणि त्यापेक्षा वरच्या वर्गांसाठी ही मर्यादा एकावेळी १५ मुलं अशी होती. शिवाय त्यांच्यातही सगळ्या प्रकारचं शारीरिक अंतर पाळलं जात होतं. तरीही ७० मुलांना कोरोनाची लागण झालीच.
‘पुढच्यास ठेस मागचा शहाणा’ या म्हणीप्रमाणे फ्रान्समधल्या या उदाहरणावरून आपण भारतीयांनी आणि महाराष्ट्रातल्या लोकांनीही काही शिकायला हवं. शाळा पुन्हा चालू करणं गरजेचं आहेच. पण त्यासाठी योग्य पद्धत कोणती तेही समजून घ्यायला हवं. आणि त्यासाठी युनायडेट नेशन्स म्हणेजच युएननं गाईडलाईन्स म्हणजेच मार्गदर्शक तत्वं जारी केलेत. या गाईडलाईन्स आपल्याला मदत करू शकतील.
कुणी म्हणेल शाळा बंद राहिल्या तर बिघडलं कुठे? आपण ऑनलाईन क्लास चालू करू. १९ मेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ट्विट टाकून अशाच प्रकारची भूमिका मांडल्याचं दिसतं. ‘विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी चार भिंतीतली शाळा सुरू होऊ शकली नाही तर ऑनलाईन शिक्षण, डिजिटल माध्यमाच्या पर्यायाचा विचार करावाच लागेल. शहरात इंटरनेट सेवा उपलब्ध असते. त्यामुळे या ठिकाणी ऑनलाईन, वर्च्युअल क्लासरूम पर्याय वापरता येईल’ असं मुख्यमंत्री कार्यालयानं आपल्या ट्विटमधे लिहिलंय.
मात्र, इंटरनेट सोडाच ८-९ तास लोडशेडिंग असणाऱ्या खेडेगावतल्या मुलांचं काय करायचं याबद्दल मुख्यमंत्र्यांनी काहीही सांगितलं नाही. परीघावरच्या समाजातली मुलं शाळेपासून जितकी दूर राहतील तितकी ती पुन्हा शाळेत येण्याची शक्यता धुसर होत जाते. गरीब घरातल्या मुलांवर तर त्याचा फार वाईट परिणाम होतो, असा धोका यूएननं आपल्या गाईडलाईन्समधे बोलून दाखवलाय.
शाळा बंद राहिल्याचा परिणाम देशातल्या आणि पर्यायाने महाराष्ट्रातल्या मुलींवरही होईल. शाळेतली गळती म्हणजे शाळा मधेच सोडणाऱ्या मुलामुलींची विशेषतः मुलींची संख्या वाढेल. त्यातून बालविवाह, लैंगिक शोषण, लहान वयातलं गरोदरपण, कुपोषित मुलं, कौटुंबिक हिंसा, गुन्हेगारी अशा कितीतरी गोष्टी वाढत जातील, असंही यूएननं म्हटलंय. शिवाय, सरकारी शाळा बंद राहिल्याने शाळेतून मिळणारं पोषक अन्न बंद होईल. त्याचा परिणाम त्या मुलांच्या मानसिक, शारीरिक आरोग्यावर होईल.
हेही वाचा : टोमॅटो फ्रिजमधे ठेवणं योग्य नाही, असं शास्त्रज्ञ का म्हणतात?
या सगळ्यांचा विचार करता शाळा सुरू होणं किती गरजेचं आहे, हे आपल्या लक्षात येईल. पण त्या सुरू करताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे. यूएननं त्यासाठी सहा सूत्रं सांगितलीत: योजना, आर्थिक पुरवठा, शिकवण्याची पद्धत, सुरक्षित कार्यपद्धती, सगळ्या परिघावरच्या मुलांपर्यंत पोचण्याची क्षमता आणि संरक्षण.
शाळा सुरू करण्याआधी देशाकडे एक चांगलं धोरण तयार असायला हवं, असं युएनचं म्हणणं आहे. कोरोनापासून मुलांचं संरक्षण करायचं असेल तर अगोदर शाळांमधे चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी शाळांना आर्थिक मदत करायला हवी. उदाहरणार्थ, शाळेत दररोज सॅनिटायझर किंवा हात धुण्याची सोय करणं. त्यासाठी सगळ्या शाळांमधे २४ तास पाणी, साबण, सॅनिटायझर, मास्क यात पैसा गुंतवायला हवा.
शिवाय, शाळेत रोजच्या व्यवहारात गरजेनुसार कोणते बदल करायचे आणि त्यांची अंमलबजावणी कशी करायची हेही ठरवायला हवं. एका बाकावर किती मुलांनी बसायचं वगैरे गोष्टी ठरवाव्या लागतील. परीघावरच्या अगदी छोट्यातल्या छोट्या खेड्यातल्या मुलांपर्यंत पोचण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करायला हवेत. शाळा सुरू होतील तेव्हा कुणीही शिक्षणापासून, शाळेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
मुलांच्या सुरक्षेचा विचार करून सरकारनं या सगळ्या योजना बनवाव्यात अशा काही मार्गदर्शक सूचना यूएननं दिल्यात. याशिवाय, भारतात केंद्र सरकारकडून शाळांसाठी आणि यूजीसी म्हणजे युनिवर्सिटी ग्रॅंट्स कमिशनकडून कॉलेज आणि युनिवर्सिटीसाठी अशाच प्रकारच्या सूचना जाहीर केल्या जाणार आहेत.
कोरोनाविरोधात लढण्याचं आदर्श मॉडेल म्हणून दक्षिण कोरियाकडे पाहिलं जातं. दक्षिण कोरियानं लॉकडाऊन न करता कोरोनाला नियंत्रणात आणलं. जराशी शंका आली तरी लगेचच त्या माणसाची कोविड टेस्ट करायची, असं त्यांचं धोरण होतं. त्यामुळेच साथरोगाच्या सुरवातीलाच त्याची लागण झालेल्या देशातल्या सगळ्या नागरिकांना ओळखता आलं आणि त्यांच्याकडून होणारा प्रसार थांबवता आला.
दक्षिण कोरियामधे लॉकडाऊन नसला तरी शाळा बंद ठेवल्या होत्या. लोकांनी एकत्र येण्यावरही तिथं काही प्रमाणात बंधनं होती. काल २० मेला तिथल्या शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्यात.
ब्लूमबर्गवर या न्यूज एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कोरियातल्या शाळांचं दुसरं सत्र साधारण मार्च महिन्यात सुरू होतं. मात्र, यंदा कोरोनामुळे काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्या. एप्रिल महिन्यापासून या शाळेतल्या मुलांचे ऑनलाईन क्लास चालू झाले. त्यानंतर चारवेळा शाळा चालू करण्याचा निर्णय झाला. पण काही कारणास्तव तो पुढे ढकलण्यात येत होता.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?
कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?
हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?
साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं
आपल्याला घरात थांबायचं इतकं टेन्शन का आलंय?
कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
१३ मेला दक्षिण कोरियामधल्या शाळा सुरू होतील असं सांगण्यात आलं होतं. त्यासाठी शाळा प्रशासनाने शाळेची सगळी साफसफाई करून ठेवली. संपूर्ण शाळेचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं. दोन बाकांमधे अंतर राहील याची काळजी घेत मुलांच्या बाकांची नवी मांडणी केली.
शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलासाठी फेस मास्क आणि सॅनिटायझरची बॉटल उपलब्ध आहे की नाही याचीही खातरजमा करण्यात आली. शिवाय, कुणाला कोरोनाची लागण झाल्याची शंका आली तर त्या मुलासाठी विलगीकरण कक्षही तयार ठेवलालं. थर्मल कॅमेरेही दक्षिण कोरियाच्या शाळेत बसवण्यात आले.
मात्र, नाईटक्लबमधे गेलेल्या एका माणसामुळे तिथल्या १५० जणांना कोरोनाची लागण झाल्याचं लक्षात आलं. त्यामुळे शाळा चालू करण्याचा निर्णय आठवडाभरानं पुढे ढकलण्यात आला. काल २० मेला शेवटी हायस्कूलमधे शिकणाऱ्या मुलांच्या शाळा सुरू झाल्या. तेव्हाही आधी केलेल्या तयारीसोबत मुलांचं स्वागत करण्यात आलं.
इतकंच नाही, तर आता या मुलांच्या बेंचवर एक प्लॅस्टिकचं आवरणही बसवण्यात आलंय. शाळेत शिरण्यापूर्वी सगळ्या मुलामुलींची थर्मल टेस्ट करणं आणि त्यांना सॅनिटायझरने हात धुणं सक्तीचं करण्यात आलंय. मुलांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवता यावं, यासाठी शाळेचं एकच दार उघडण्यात आलंय. शरीराचं तापमान जास्त आलेल्या अनेक मुलांना दारातूनच घरी पाठवल्याच्याही घटना तिथं घडल्या, असं सांगितलं जातंय.
दक्षिण कोरियातल्या शाळांनी असा एकदम कडक बंदोबस्त केला असला तरी तिथल्या काही गोष्टींमुळे मुलं आणि शिक्षक नाराज आहेत. बाथरूममधे गर्दी होऊ नये म्हणून मुलांनी लघवीला कधी जायचं याची एक वेळ ठरवून देण्यात आलीय. ही वेळ पाळणं मुलांना शक्य होत नाहीय, अशी तक्रार शिक्षक करत होते. जेवणाच्या सुट्टीतले नियमही अतिशय कडक आहेत. शिवाय, शाळा आणि अभ्यासक्रम सोडला तर इतर कोणतेही अभ्यासेतर उपक्रम शाळेत होणार नाहीत.
दक्षिण कोरियाचे शिक्षण मंत्री यो युन हाई यांनी शाळा उघडण्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली आहेत. ‘आमच्या मुलांच्या सुरक्षेबाबत आम्हाला अजुनही काळजी वाटते. पण कोरोनाच्या प्रसारावर सरकारनं चांगलं नियंत्रण मिळवलंय. देशाचं सरकार, विद्यार्थी, पालक यांनी सगळ्यांनी एकत्र मिळून काम केलं तर आम्ही यशस्वीपणे शाळा सुरू करू शकू,’ असं दक्षिण कोरियाचे पंतप्रधान चंग स्ये क्यून यांनी ब्लूमबर्गशी बोलताना सांगितलं.
हेही वाचा : कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!
खरंतर, लहान मुलांमार्फत कोरोना वायरस पसरण्याचं प्रमाण अगदी कमी आहे, असं समोर आलंय. सायन्समॅग या वेबसाईटवर आलेल्या एका लेखानुसार, ब्रिटनमधे ९ वर्षांच्या एका मुलाला कोरोनाची लागण झाली होती. पण त्याला अगदी सौम्य लक्षण दिसत होती. त्यामुळे त्याचं निदान होण्याआधी तो शाळेत जात होता.
पण आश्चर्य म्हणजे, त्याच्यासोबत शाळेत दररोज असणाऱ्या, फिरणाऱ्या, शिकणाऱ्या ७२ मुलांची आणि लोकांची टेस्ट केली असता त्यातल्या एकाचीही टेस्ट पॉझिटिव आली नाही. इतकंच काय, या मुलाला दोन भावंड आहेत. त्यांनाही कोरोना वायरसची लागण झाली नाही. १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कोरोनाची लागण झाली तरी त्या मुलामुळे इतर कुणालाही लागण होत नसल्याचं आतापर्यंतच्या अभ्यासात आढळून आल्याचं या लेखात सांगण्यात आलंय.
कारण, लहान मुलांची प्रतिकारक शक्ती मोठ्या माणसांइतकी विकसित झालेली नसते. वायरस शरीरात आला तरी त्याविरूद्ध ती जोरजोरात लढणं चालू करत नाही. त्यामुळेच शरीरात वायरस आला तरी दुसऱ्यांपर्यंत पोचत नाही. असं असलं, तरी या संशोधनावर अजून शिक्कामोर्तब झालेलं नाही.
आता महाराष्ट्रात शाळा सुरू करायच्या झाल्या तर गरजेच्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. दक्षिण कोरियाशी तुलना करता भारतात आणि महाराष्ट्रात शाळा सुरू करण्यासाठी कुठल्या कुठल्या पातळ्यांवर काम करावं लागेल याची कल्पना आपल्याला येईल. लसीचं संशोधन पूर्ण होऊन ती समाजातल्या सगळ्या लोकांपर्यंत पोचवल्यावरच शाळा सुरू करायच्या की शिक्षण क्षेत्रात जास्तीत जास्त पैसा खर्च करून मुलांचं भवितव्य घडवायचं, यातून महाराष्ट्र सरकार कोणता मार्ग काढतं हे आपल्याला लवकरच कळेल.
हेही वाचा :
वाचा मटका किंग रतन खत्रीची सगळी कुंडली
लठ्ठ माणसांपेक्षाही कोरोना जास्त वजनदार का बनलाय?
संत कोरोना आणि कोरोना वायरसचा काही संबंध आहे का?
चक्रीवादळाचं नाव कसं ठरवतात? बंगाल, ओडिशाला अम्फानचा धोका
डब्ल्यूएचओनं आधीचं कोरोनाचा इशारा दिला, तरीही ब्लेमगेम का सुरूय?
मध्यम वर्गाला आर्थिक पॅकेज नाही, तर थाळी वाजवण्याचा टास्क पाहिजे
कर्ज खिरापतीनं २००८ मधे जगाला आर्थिक संकटात ढकललं, त्याची गोष्ट