प्लॅस्टिकचं संकट इतकं गहिरं झालंय की, पाण्यामधे, अन्नामधे आणि मानवी रक्तामधेही प्लॅस्टिकचे अंश सापडतायत. संशोधकांनी याबद्दल वारंवार इशारे दिलेत; मात्र प्लॅस्टिक वापर काही कमी होत नाही. आज जागतिक पर्यावरण दिन साजरा होतोय. ‘बीट प्लॅस्टिक पोल्युशन’ ही यंदाच्या पर्यावरण दिनाची संकल्पना आहे. त्यानिमित्त प्लॅस्टिकची सर्जरी कशी करायची ते ठरवायला हवं.
‘जग विनाशाच्या उंबरठ्यावर आहे. पृथ्वीवरची जीवसृष्टी वाचवायची असेल तर सर्व देशांनी प्रयत्न केले पाहिजेत’, असा सूर सर्वत्र आळवला जातो. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच नाही तर न्यूयॉर्कपर्यंत सर्वत्र हे ऐकायला मिळतं; मात्र, त्या दिशेने मनापासून प्रयत्न होताना दिसत नाहीत. यामधे विकसित देशांचं म्हणणं असतं की, ‘अविकसित आणि विकसनशील देश जास्त प्रदूषण करतात, ते त्यांनी थांबवलं पाहिजे’.
त्याचवेळी ‘निसर्गाची पर्यावरणाची ही अवस्था विकसित देशांनी केलेल्या इंधनाच्या अतिरिक्त वापरामुळे उद्भवलीय. आमची परिस्थिती अजून सुधारणं आवश्यक आहे. त्यामुळे प्रदूषण रोखण्याची जबाबदारी आमची नाही. विकसित राष्ट्रांनीच ही जबाबदारी उचलायला हवी’, असं अविकसित आणि विकसनशील राष्ट्रांचं म्हणणं असतं. त्यामुळे पर्यावरण रक्षणाबद्दल केवळ चर्चाच होतात.
हेही वाचा: ‘आरे’ला कारे केल्याने मुंबईतली एक संस्कृती हरवणार आहे!
संयुक्त राष्ट्रसंघाने मात्र याबद्दल सर्वदूर जाणीव जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. १९७२ला स्टॉकहोममधे भरलेल्या ‘कॉन्फरन्स ऑन द ह्युमन एन्वायर्नमेंट’मधे प्रथम याबद्दल चर्चा झाली. तिथंच पर्यावरणविषय आंतरराष्ट्रीय एकवाक्यता करण्यासाठी पर्यावरण दिनाची संकल्पना मांडली गेली.
त्यानंतर दोन वर्षांनी १९७४मधे ‘फक्त एक पृथ्वी’ या ब्रीदवाक्यास अनुसरून पहिला जागतिक पर्यावरण दिन साजरा झाला. तेव्हापासून दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन ५ जून रोजी साजरा करण्यात येतो. पृथ्वीवरची जीवसृष्टी वाचवण्यासाठी, पर्यावरण रक्षणासाठी जागरूकता निर्माण व्हावी, हा यामागचा मुख्य हेतू आहे.
सागरी प्रदूषण जागतिक लोकसंख्या वाढ, जागतिक तापमानवाढ, शाश्वत विकास, वन्यजीव हत्या इत्यादी विषयांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी या माध्यमातून संयुक्त राष्ट्रसंघामार्फत प्रयत्न करण्यात येतायत. या उपक्रमात १४३पेक्षा जास्त देश सहभागी होतात. या वर्षी पन्नासावा जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतोय. यंदाच्या पर्यावरण दिनाची ‘बीट प्लॅस्टिक पोल्युशन’ ही संकल्पना आहे.
या वर्षीच्या पर्यावरण दिनाचं यजमान पद दक्षिण आफ्रिकेतल्या कोटे डि’आयवोर या देशाकडे देण्यात आलंय. त्यासाठी नेदरलँड पूर्ण सहकार्य करणार आहे. नेदरलँडने प्लॅस्टिक वापराबद्दल मोठी पावलं उचलली आहेत. प्लॅस्टिकचं संकट इतकं गहिरं झालंय की, पाण्यामधे, अन्नामधे आणि मानवी रक्तामधेही प्लॅस्टिकचे अंश सापडतायत. संशोधकांनी याबद्दल यापूर्वी वारंवार इशारे दिले आहेत; मात्र प्लॅस्टिक वापर काही कमी होत नाही.
प्लॅस्टिकचा शोध अलेक्झांडर पार्क यांनी १८५५मधे लावला. पुढे त्याला जास्त चांगल्या आणि उपयुक्त रूपात लिओ बेकलँड यांनी आणले. तेव्हापासून प्लॅस्टिकचं उत्पादन सुरु झालं आणि होतंय. खेळण्यांपासून विमानापर्यंत सर्वत्र प्लॅस्टिक वापरलं जातं. तेल, पेट्रोलियम पदार्थ आणि इतर खनिज तेलांपासून प्लॅस्टिकचं उत्पादन करण्यात येतं.
प्लॅस्टिक वजनाने हलकं आहे. प्लॅस्टिकचा उत्पादन खर्च कमी असल्याने स्वस्त मिळतं. प्लॅस्टिकचा आकार बदलतो. त्याला कोणत्याही आकारात बदलता येतं. प्लॅस्टिक पदार्थांची तन्यता जास्त असते. ते टिकाऊ आहे. वजन पेलण्याची चांगली क्षमता आहे. ते जलरोधक, रसायनरोधक आहे. पारदर्शक आहे. विद्युतरोधक असल्याने विद्युत वाहक तारांभोवती प्लॅस्टिकचं विद्युतरोधक आवरण बसवण्यात येतं. या गुणधर्मांमुळे प्लॅस्टिक सर्वव्यापी बनलंय.
प्लॅस्टिकमुळे जीवन सोपं आणि अधिक आनंददायी बनलंय. मात्र प्लॅस्टिक लवकर विघटित होत नाही. जमिनीवर किंवा पाण्यामधे त्याचं विघटन होत नाही. उष्णतेचा प्लॅस्टिकवर परिणाम होऊन त्याचं विघटन होत नाही. ते हजारो वर्षं टिकून राहतं. एक मिलीमीटर जाडीचं प्लॅस्टिक पूर्ण विघटित होण्यास ५००० वर्षं लागतात. हाच प्लॅस्टिकला मिळालेला शाप आहे आणि त्यामुळेच प्लॅस्टिक वरदान न बनता एक समस्या बनलंय.
हेही वाचा: दिल क्यों पुकारे आरे आरे?
प्लॅस्टिक ही समस्या आहे हे कळत असूनही त्याचा वापर कमी न होता वाढतच आहे. प्लॅस्टिकचं दोन प्रकारचं उत्पादन होतं. एकल वापर करता येणार्या प्लॅस्टिकचा पुनर्वापर करता येत नाही. दुसर्या प्रकारच्या प्लॅस्टिकचा पुनर्वापर करता येतो. दरवर्षी ४००० टन प्लॅस्टिकचं उत्पादन होतं. त्यापैकी ५० टक्के प्लॅस्टिक पुनर्वापरायोग्य आहे. त्यातलं केवळ १० टक्क्यांपेक्षा कमी प्लॅस्टिक पुनर्वापरासाठी वापरलं जातं.
उरलेलं प्लॅस्टिक फेकून देण्यात येतं. ते गटारामधे, नद्यांमधे, उकिरड्यात, मातीत आणि समुद्रामधे जातं. हळूहळू त्याचं विघटन होत जातं. त्यामधून विषारी आणि घातक पदार्थ बाहेर पडतात आणि ते पृथ्वीवरच्या जीवसृष्टीसाठी सर्वात मोठा धोका बनतंय. ते सजीवसृष्टीतल्या विविध जीवांमधे हळूहळू भिनणारं एक विष आहे.
जमिनीवरच्या आणि पाण्यातल्या प्लॅस्टिकचं विघटन होताना त्याचे अंश मातीत आणि पाण्यात उतरतात. चार्यात अडकलेलं प्लॅस्टिक जनावरांच्या पोटामधे जातं. तसंच अनेक हॉटेलमधून अन्न प्लॅस्टिक पिशव्यांमधून दिलं जातं. यातलं शिल्लक अन्न त्याच पिशव्यांमधून बाहेर फेकलं जातं.
अन्नाच्या वासाने अनेकदा जनावरं प्लॅस्टिक पिशव्यांसह ते खातात. ते त्यांच्या विष्ठेतून बाहेर पडत नाही. यामधे अनेकदा जनावरं मृत्यूमुखी पडतात. पाळीव जनावरं असतील आणि मालकाच्या लक्षात आलं तर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येते. जनावरांच्या पोटातून किलोने प्लॅस्टिक बाहेर काढलं जातं.
प्लॅस्टिकमधून आणखी मोठा धोका वाढतोय तो मायक्रोप्लॅस्टिकचा. हे मायक्रोप्लॅस्टिक अन्नामधे, पाण्यामधे सहज मिसळतं. आता तर ऐतिहासिक जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेल्या लोणार सरोवरातही सोळा प्रकारच्या मायक्रोप्लॅस्टिकचे अंश सापडले आहेत.
विघटन प्रक्रियेत मायक्रोप्लॅस्टिकचे अंश पसरतात आणि अन्न, पाणी आणि हवेतून मानवाच्या आणि पशूंच्या शरीरात जातं. वनस्पतींमधेही मायक्रोप्लॅस्टिकचे अंश आढळतात. मानवाच्या आणि प्राण्यांच्या शरीरात जाणारं प्लॅस्टिक घातक असतं. प्लॅस्टिकमुळे हार्मोनशी निगडित समस्या प्रामुख्याने उद्भवतात. अजूनही मायक्रोप्लॅस्टिकबद्दल पुरेसं संशोधन झालेलं नाही.
मायक्रोप्लॅस्टिकमुळे अनेक घातक रोग होतात. प्रामुख्याने वंध्यत्व, ऑटिझम हे आजार होतात. मज्जारज्जूंची कार्यक्षमता घटते. कर्करोगाची शक्यता मोठी राहते. कॅडमियमसारख्या मूलद्रव्यांमुळे सांधेदुखीचा त्रास सुरु होतो. पारा हा अत्यंत विषारी घटकही प्लॅस्टिकमुळे अन्न, पाणी आणि हवेत मिसळतो. दम्याची समस्याही निर्माण होते.
हेही वाचा: अमेझॉनचं जंगल कसं आहे? आणि तिथले आदिवासी कसे राहतात?
प्लॅस्टिकची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनतेय. प्लॅस्टिक कचरा वाढतच आहे. यातून समस्त जीवसृष्टीला धोका निर्माण होतोय. पशूंचं जीवन कठीण होत चाललंय. हा परिणाम हळूहळू घडतो. त्यामुळे कोणीही याकडे गंभीरपणे पाहत नाही. याचं गांभीर्य सर्वसामान्यांच्या लक्षात यावं, या उद्देशाने या वर्षीचा पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी प्लॅस्टिक समस्या चर्चेत यावी, असं संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केलंय.
जगभर यासाठी ५ जून रोजी कार्यक्रम आयोजित करावेत, असं अपेक्षित आहे. प्लॅस्टिकचा कचरा कमी व्हावा, प्लॅस्टिकचं विघटन करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रयत्न करावेत, असं अपेक्षित आहे. आजवर या दिशेने मोठे संशोधन झालंय; मात्र, अजून म्हणावं तसं यश आलेलं नाही.
प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे थांबवणं शक्य नाही, असा सर्वदूर समज आहे. मात्र २०१६पासून अँटिग्वा, बर्म्युडा या देशांनी प्लॅस्टिकवर बंदी घातलीय. २०१७पासून चीनने बंदी घातलीय. २०१६ ते २०१८ या काळात कोंलंबिया, सोमालिया, सेनेगल, रवांडा, दक्षिण कोरिया, झिंबाब्वे, ट्युनिशिया, बांग्लादेश, कॅमेरून, अल्बानिया आणि जॉर्जिया या देशांमधे प्लॅस्टिकवर पूर्णत: बंदी घालण्यात आलीय.
भारतातही ऑक्टोबर २०१९पासून एकल प्लॅस्टिकवर बंदी घातलीय. मात्र भारतात आजही बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक वापरलं जातं. स्थानिक स्वराज्य संस्था अधूनमधून अशा लोकांवर कार्यवाही करतात. मात्र हे प्रयत्न पुरेसे नाहीत.
एकल वापरायोग्य प्लॅस्टिकचं उत्पादन पूर्णत: थांबवलं पाहिजे, ही आजघडीची सर्वात मोठी गरज आहे. यासाठी कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे. प्लॅस्टिकचे नेमके दुष्परिणाम काय आहेत, याची समाजातल्या सर्व घटकांना जाणीव करून देण्याची, जनजागृती करण्याची गरज आहे.
प्लॅस्टिक वातावरणात जाळणं पूर्णत: थांबलं पाहिजे. प्लॅस्टिक पाण्यामधे आणि मातीमधे मिसळू देणंही पूर्णत: थांबवायला हवं. पुनर्वापरायोग्य प्लॅस्टिक पुनर्वापरासाठी कसं जाईल, यासाठी सर्वंकष धोरण आखण्याची गरज आहे. कठोर उपाययोजना केल्याखेरीज प्लॅस्टिकच्या संकटापासून जीवसृष्टी वाचू शकणार नाही. हीच योग्य वेळ आहे, प्लॅस्टिकमुक्त होण्याची!
हेही वाचा:
जंगलातून मेट्रो धावताना जंगल उरेलच कसं?
`आरे, ऐका ना` हा हॅशटॅग ट्रेंड होण्यामागे अशी गडबड सुरूय
कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी धावणारे आपण गडचिरोलीकडे दुर्लक्ष का करतो?
अमेझॉनच्या जंगलातली आग विझवण्यासाठी ब्राझीलने चक्क मिलिट्री पाठवली