मस्ती पचवू न शकणाऱ्या पैलवानाचा सुशील कुमार होतो

२५ मे २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


सुशील कुमार हा खरंतर कुस्तीगीरांचा आयडल. सगळीकडे त्याचं कौतुक व्हायचं. पण ज्युनिअर मल्लाच्या हत्येचा आरोप झाल्यामुळे २० दिवस तो फरार होता. छत्रसाल स्टेडियमवर आपलं वर्चस्व राहवं या उद्देशाने त्याने परिसरात कायम आपला दरारा ठेवला. अनेकांना, अगदी तिथं सरावाला येणाऱ्या मल्लांनाही त्याने पिस्तुलने धमकावलं. कायम वर्चस्ववादी भूमिकेत वावरत आला. शेवटी याच वागण्यातून त्याच्याकडून गुन्हा घडला असावा.

भारतासाठी दोन ऑलिम्पिकची पदकं त्याने अपार लढून आणली. देशातल्या प्रत्येक कुस्तीगीराचा तो आयडल ठरला. होय, सुशील कुमार. त्याला देशानं बक्षिसानं मढवलं. सरकारनं मान, सन्मानाने पुरस्कार दिले. आज त्याच सुशील कुमारवर दिल्ली पोलिसांनी बक्षिस लावलंय. का? तर एका ज्युनिअर मल्लाच्या हत्येचा आरोप त्याच्यावर आहे म्हणून.

गेल्या वीस दिवसापासून सुशील कुमार फरार होता. दिल्ली पोलिस त्याच्या मागावर होते. तो परदेशी पळून जाऊ नये म्हणून त्याचा पासपोर्टही गोठवला गेला. त्याची माहिती देणाऱ्याला पोलिसांनी बक्षिस जाहीर केलं. किती मोठ्ठं दुर्दैव आणि नामुष्की म्हणावी लागेल ही? हे कधी ना कधी घडणारच होतं. सुशीलचं अती करणं त्याला भोवणारच होतं.

कुस्ती शिकवली, मूल्यं हरवली

काल जागतिक कुस्ती दिवस. अनेकांचे शुभेच्छांचे मेसेज येत होते. तोपर्यंत बंदुकधाऱ्या पोलिसांच्या गराड्यात टॉवेलने तोंड झाकून ताब्यात घेतलेला सुशीलकुमार दिसला. लाजिरवाणं वाटलं. संतापही वाटला. कुस्तीनं बळ, मान, सन्मान ऐश्वर्य दिलं आणि त्याने त्याची माती केली.

सुशीलच्या खेळाबद्दल, त्याच्या गुणवत्तेवर शंका नाही. त्याची खेळातली आक्रमकता, बचावात्मकता, त्याची डावबाजी आणि कित्येक वर्ष त्याचं खेळातलं सातत्य या जोरावरच त्यानं सगळं यश आपलंसं केलं. सतपालसारख्या खूप जाणत्या वस्तादाचा तो पठ्ठा. त्यांनी त्याला जावईही करुन घेतला. सतपालांनी सुशीलला मनगटाने घडवलं खरं. पण आदर्श मूल्यांची सक्ती मात्र त्यांनी अलिकडे सैल केली. इथंच सुरू झाला वर्चस्वशाली, दबंग, धतिंग करणाऱ्या सुशीलकुमारचा प्रवास.

अलीकडच्या दशकात आपल्याला माध्यमात दिसणारा सुशील कुमार शांत, आदर्श, नम्र, सोज्वळ नव्हताच मुळी. छत्रसाल स्टेडियमवर आपलं वर्चस्व राहवं या उद्देशाने त्याने परिसरात कायम आपला दरारा ठेवला. अनेकांना, अगदी तिथं सरावाला येणाऱ्या मल्लांनाही त्याने पिस्तुलने धमकावलं. त्याच्या या सगळ्या वागण्याला गुरु, सासरे यांची मुकसंमती होतीच. म्हणूनच तो या वर्चस्वशाली भूमिकेत वावरत आला. शेवटी याच वागण्यातून त्याच्याकडून हा गुन्हा घडला असावा.

हेही वाचा: कोरोनाशी धर्माचा संबंध लावणाऱ्यांचं काय करायचं बरं?

महाराष्ट्राच्या मल्लांवर अन्याय

सतपालचं मार्गदर्शन मिळेल, सुशीलकुमारही तिथंच प्रशिक्षण देतोय या जमेच्या गोष्टींसाठी महाराष्ट्रातल्या अनेक तरुण मल्लांनी दिल्लीचं छत्रसाल स्टेडियम गाठलं. पण त्यांना तिथं कायम दुय्यम आणि दबावाखालची वागणूक मिळाली. महाराष्ट्राचा मल्ल त्यांनी नेहमी अन्यायी भूमिकेनं वागवला. नरसिंग यादवला डोपिंगमधे अडकवलं. त्यावर कशा पद्धतीने अन्याय केला गेला हे तर सगळ्यांना माहीतच आहे.

महाराष्ट्राच्या कुस्ती शौकींनांनी चांगल्या मल्लांची नेहमी कदर केली. सुशीलचे गुरू आणि सासरे सतपाल यांना महाराष्ट्राने खूप प्रेम, मान, सन्मान, धनही दिलं. अगदी पाकिस्तानच्या मल्लांनाही मोठ्या मनाने सांभाळणारी माणसं महाराष्ट्रात आहेत. पण उत्तर भारताने राष्ट्रीय आणि आंतराराष्ट्रीय नियोजनाच्या कुस्तीवर आपलं वर्चस्व ठेवत महाराष्ट्राच्या अनेक गुणवंत मल्लांवर अन्याय केल्याची ताजी उदाहरणं आहे.

सतपालच्या कुस्तीचा आदर्श समोर ठेवून महाराष्ट्रातल्या अनेक बापांनी आपल्या पोरांचं नाव 'सतपाल' असं ठेवलं. का तर हा पोरगा पण तसाच मोठ्ठा पैलवान घडावा म्हणून. पण सतपाल नावाची कपटी वृत्ती महाराष्ट्राला नेहमी मारक ठरली.

पैलवानकीची आचारसंहिता

पैलवान अशा हिसेंकडे, गुन्ह्याकडे का वळतात? तर यामागे मानसशास्त्रीय, आर्थिक तशीच राजकीय कारणं दडलीयत. पैलवान गुंडगिरी करतात, ते उर्मट असतात, मंदबुध्दी असतात असे अनेक आरोप सामान्यांकडून केले जातात. आता सुशीलने घातलेल्या घोळामुळे या प्रश्नांना अधिकच फुंकर घातली जातेय.

त्यासाठी पहिल्यांदा हे क्षेत्र समजून घेणं गरजेचं आहे. कुस्ती हा कष्ट आणि बळावर आधारलेला खेळ. मग या खेळाला बुद्धीची गरज नाही का? तर असं मुळीच नाही. जो चाणाक्ष आणि बुद्धिमान तोच खरा पैलवान. पैलवान हा एकमेव प्राणी आहे जो विजेच्या चपळाईने हालचाल करतो. मग मल्लांमधे आडमुठेपणाचा शिरकाव कसा होतो?

तर पैलवानकीची विशिष्ट अशी आचारसंहिता आहे. तालमीच्या बाहेर न पडता फक्त कुस्ती हेच सर्वस्व मानणं. याच काळात त्याचा समाजाशी, अगदी कुटुंबाशीही काही प्रमाणात बंध तुटतो. त्यात शिक्षणाचा अभाव. यामुळे त्यांची सामाजिक जडणघडण थांबते. त्याची कुस्ती, तालीम सुटते तेव्हा पुढंचं काही भवितव्य उरलेलं नसतं. तेव्हा राजकारणी त्याला हेरतात. स्वतःच्या फायद्यासाठी, पाठबळासाठी त्याचं पद्धतशीर शोषण करतात. पैलवान म्हणून मिळत असलेल्या मानापानाला तो वर्चस्व समजायला लागतो आणि तिथेच त्याची वाट गंभीर गुन्ह्यांकडे वळते.

पुढे सत्ता वर्चस्वाच्या वादातून शेवटही वाईट होतो. याची उदाहरणं पश्चिम महाराष्ट्राने पाहिलीयत. वाळू व्यवसाय, रिअल इस्टेट, बाजारपेठा, सुरक्षा अशा अनेक ठिकाणी माजी मल्लांनी आपली ठेकेदारी सुरु केलीय. हा व्यवसाय करताना अनेकांनी आपल्या बळाचा वापर केलाय, हे स्पष्ट आहे. त्यांना ते भोगावंही लागतं. शेवटी कायद्यापुढे कुणीच मोठा नाही.

हेही वाचा: कोरोनाशी पंगा घेणारी बाईः हॉस्पिटलमधे न जाता कोरोना केला बरा

मूल्यं पाळतो तोच खरा पैलवान

आता सगळ्याच मल्लांना या रांगेत बसवणं चुकीचं ठरेल. माझ्या घरातली उदाहरण. माझं घरदार, माझं मामाकडचं घरदार जातीवंत पैलवानांचं घराणं. मामा अस्लम काझी यांनी महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कुस्ती क्षेत्रावर सलग बारा वर्ष अधिराज्य गाजवलं. लाखो कुस्तीप्रेमींच्या तोंडी अस्लम काझी हे नाव आहे. त्यांनी ५१ चांदीच्या गदा जिंकत एक विक्रम केला. पण मी त्यांना कधी कुणावर दादागिरी करताना पाहिलं नाही. त्यामुळेच त्यांना महाराष्ट्र मानतो.

मी, भाऊ कित्येक वर्ष पैलवानकीत होतो. महाराष्ट्रभर फिरणं असायचं पण कुणावर हात उगारणं लांबच कुणाला शिवीही दिल्याचं, भांडण केल्याचं आठवत नाही. मल्लविद्या ही नम्रता, नीतिमत्ता, विवेक, प्रामाणिकता, कष्ट, संघर्ष शिकवते. जो व्यक्ती हे सूत्र शेवट प्रयत्न पाळतो तोच खरा पैलवान.

संस्कारक्षम मल्ल घडवण्याचं आव्हान

पैलवान ही माणूस आहे. त्याला राग, सणक आहे. सहसा तो कुणाच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न करत नाही. पण त्याला कोणी डिवचलं तर पुढं त्याचं वेगळं रूप असतं, हेही खरं आहे. भारतीय स्वातंत्र्यात पैलवानांचं योगदान मोठं राहिलंय. 'चले जाव' ही स्वातंत्र चळवळीला मल्लांचं खूप मोठ बळ होतं. त्यांच्या विद्रोहाची रुपं अनेक आहेत. अलीकडच्या मल्लविद्येच्या गुरुकुल पद्धतीत वस्ताद मल्ल घडवताना मनगटाबरोबर मनाची मशागत करण्यात कमी पडतायत. सध्या संस्कारक्षम मल्ल घडवण्याचं मोठं आव्हान आहे.

अंगातली मस्ती वाईट असते. ती कायम गुरगुरते आणि हिंसेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. जो पैलवान ती मस्ती पचवतो तोच खरा आदर्श मल्ल म्हणुन समाजात वावरतो. अथवा असाच अनेकांचा सुशील कुमार होतो.

बाकी सुशीलकुमार आपलं सगळं राजकीय वजन वापरून या गुन्ह्यातून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करेल. पण त्याच्यावर चार्जशीट फाईल होताच त्याची सगळी पदकं, सन्मान, पुरस्कार काढून घ्यायला हवीत. तरच त्या हिंसेच्या वाट्याला न जाण्याचा धडा अनेकांना मिळेल.

हेही वाचा:  

भारत कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजमधे गेलाय, म्हणजे धोका किती वाढलाय?

विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, मुंबईची पत्रकार सांगतेय स्वानुभव

जय शेंडुरे: कोरोना आणि ट्रम्प प्रशासनाला पुरुन उरणारा रांगडा कोल्हापूरकर

लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं जगभर होतंय कौतूक

(लेखक मुक्त पत्रकार आणि व्यावसायिक कुस्तीपटू आहेत)