दर्जेदार खेळी करणार्या ऋतुराज गायकवाडला भारतीय टीममधे मोठी स्पर्धा आहे. क्रिकेटमधली त्याची प्रगती समाधानकारक राहिलीय. हल्ली आयपीएल हेच मुलांचं उद्दिष्ट होऊ लागलंय. ज्यांचं खेळावर प्रेम आहे आणि जे देशाकडून खेळण्याचं महत्त्व मानतात, ते यात अडकून पडत नाहीत. ऋतुराजसुद्धा भारतीय टीममधलं आपलं स्थान महत्त्वाचं मानतो हे त्याच्या एकूण खेळावरून स्पष्ट होतं.
एक दर्जेदार अशी खेळी आयपीएलमधल्या मॅचमधे ऋतुराज गायकवाडने केली. बलवान मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंगचे धडाधड गडी बाद करायला सुरवात केली होती. पण सलामीला आलेला ऋतुराज शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने ८८ धावा काढताना टीमला बर्यापैकी धावसंख्या उभारून दिली होती. ती खूपच मोठी ठरली, जेव्हा मुंबईचे बॅट्समन सपशेल ढेर झाले. साहजिकच ऋतुराज सामनावीर ठरला.
हेही वाचा: स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं
त्याच्या या खेळीचं कौतुक दिलीप वेंगसरकर यांनी उत्स्फूर्तपणे नंतर केलं. ते म्हणाले, 'मला ही खेळी खूप आवडली. एक तर त्याने जे फटके मारले ते सगळे व्यवस्थित होते. उंच फटकेही त्याने विशेष ताकद न लावता मारले होते. फिल्डर काही करू शकत नव्हते असे हे फटके होते. मी त्याला म्हणालो होतो, तुला आता ४० ते ५० धावा काढून चालणार नाही. तू लगेच बिनधास्त होतोस आणि विकेट फेकतोस. तसं करू नकोस. तू सलामीवीर आहेस तर पूर्ण २० ओवर उभा राहा. अधिक धावा जमतील असं बघ.'
तसा तो खेळला. मुख्य म्हणजे समोर पडझड चालूच होती. त्यामुळे तो विचलित झाला नाही. असं तो सातत्याने खेळला तर नक्की पुढे जाईल. या खेळीचं नेमकं विश्लेषण वेंगसरकर यांनी केलंय यात शंका नाही. विशेष म्हणजे वेंगसरकर यांच्याच पुण्याच्या अकॅडमीमधून ऋतुराज तयार झालाय. पण म्हणून वेंगसरकर भरभरून बोलले असे नाही.
ती खेळीच सहजसुंदर होती. अशा खेळी बॅट्समनचा आत्मविश्वास वाढवतात. त्याने बुमराह, बोल्ट यांची बोलती बंद करणारे फटके शेवटच्या ओवरमधे मारले. इथे त्याने त्याचा दर्जा सिद्ध केला. आता उरलेल्या मॅचमधे त्याला सातत्य दाखवावं लागेल. कारण ऋतुराजला भारतीय टीममधे येऊन टिकण्यासाठी मोठी स्पर्धा आहे.
के. राहुल सगळ्याच प्रकारात आता परिपक्व होतोय असे संकेत देऊ लागलाय. त्यामुळे रोहित शर्मा बरोबर सध्या तरी तो कायम होणार आहे. तरीही तिसरा सलामीवीर टीममधे ठेवला जातो. याचं कारण कुणी ऐनवेळी उपलब्ध नसेल तर काय करायचं? आणि त्यादृष्टीने सध्या पृथ्वी शॉ आणि देवदत्त पद्दिकलसुद्धा चर्चेत आहेत. ऋतुराजला यांच्याशी टक्कर द्यावी लागणार आहे.
हे तिघेही साधारण एकाच वयाचे आहेत. त्यामुळे जो दर्जा दाखवेल, तो पुढे जाणार आहे. सध्या निवड समितीकडे भरपूर पर्याय असल्याने विश्रांतीचं कारण देत सगळ्यांना संधी मिळेल असं बघते. ही एक दिलासादायक गोष्ट आहे. ऋतुराजला श्रीलंका दौरा त्यामुळे मिळाला. त्याचं भारताकडून खेळण्याचं स्वप्न माफक स्वरूपात का होईना पूर्ण झालं. आता जेव्हा केव्हा संधी मिळते तेव्हा ती साधणं गरजेचं आहे.
हेही वाचा: आयपीएलच्या तपाची कहाणी : थोडी मिठी, जास्त खट्टी
ऋतुराजने याची काळजी घ्यायची आहे. त्याला रोहित शर्मा आवडतो. तो स्वतःही रोहितसारखा आधी मधल्या फळीत खेळणारा होता. सलामीवीर झाल्यावर काय पथ्यं पाळायची याची त्याला आता कल्पना आलीय. सुरवातीला बॉलर भरात असतात. ताजेतवाने असतात. खेळपट्टीसुद्धा बॉलरला मदत करणारी असते. अशा वेळी मोठे फटके म्यान करावे लागतात.
ऋतुराज सध्या तरी मर्यादित ओवरच्या प्रकारासाठी विचाराधीन राहणार आहे. तरीसुद्धा त्याला घाईघाईत हाणामारी सुरवातीलाच करणं महाग ठरू शकतं. हे त्याला नेहमीच लक्षात ठेवावं लागेल. त्याने संयम राखत पण आक्रमक धोरण ठेवलं तर तो आपला हक्क अधिक प्रभावीपणे सांगू शकेल.
ऋतुराज आहे मूळचा सासवडचा. त्याच्या पुढची आव्हानं मोठी आहेत. मुख्य अडथळा राजकारणाचा. मुंबईबाहेरचे, पण महाराष्ट्रामधे होते असे मोजकेच क्रिकेटपटू मोठे झाले, असा इतिहास आहे. अजिंक्य रहाणे नगरचा. झहीर खान ही तिथला. हे मुंबईत येऊन मोठे झाले. केदार जाधव हा शेवटचा मुंबईबाहेरचा खेळाडू, जो काही काळ भारतीय टीममधे राहिला.
त्याआधी राजू भालेकर, सुरेंद्र भावे, संतोष जेधे, शंतनू सुगवेकर, मिलिंद गुंजाळ, श्रीकांत कल्याणी आणि अर्थात पांडुरंग साळगावकर गुणवत्ता असूनही मागे राहिले. महाराष्ट्राचं क्रिकेट मुंबई आणि पुण्यापुरतं मर्यादित राहिलं. विदर्भने अलीकडे दोनदा रणजी करंडक जिंकला. तरीही त्यांचा दबदबा नाही. आता तर मुंबईचासुद्धा राहिलेला नाही.
काय चुकतं या इथल्या युवकांचं? एक तर गरीब नाही तर मध्यम वर्गातली मुलं अधिक क्रिकेटकडे ओढली जातात. त्यांना कष्ट करून यश मिळालं नाही की नाउमेद व्हायला होतं. ईर्षा कमी झाली की माणूस कुठेही मागे पडतो. ही गोष्ट टाळली पाहिजे.
हेही वाचा: क्रिकेटचे लघुउद्योग सुटलेत सुसाट
अलीकडे कॅप्टनच्या विश्वासाला महत्त्व आलंय. पूर्वी कॅप्टन आपल्या विभगातला कुणी घुसवायचा. आता आयपीएल टीममधे जो बरोबर, त्याची तो पाठराखण करतो. या खेळाडूंना आपलं नाणं सतत खणखणीतरीत्या वाजवता यायला हवं. यादृष्टीने शार्दुल ठाकूरचं उदाहरण देता येईल. तोसुद्धा पालघरमधून पुढे आलाय. त्याला कॅप्टन विशेष किंमत देत नव्हता. पण जेव्हा संधी मिळायची तेव्हा तो उपयुक्तता दाखवत गेला. त्याने खांदे कधी पाडले नाहीत.
आज राजकारण असं खेळवलं जातंय की, एखाद्याचा काटा काढण्यासाठी त्याचा आत्मविश्वास कमजोर करायचे प्रयत्न होतात. कुलदीप यादव आणि अगदी आश्विनसुद्धा यात भरडले गेलेत. आणि अजिंक्य रहाणे कॅप्टन म्हणून भारी ठरेल, असं वाटू लागल्यावर त्याला योजनाबद्धरीत्या संपवायचे डावपेच खेळले जाताहेत.
ऋतुराजवर आज धोनी खूश आहे. ही चांगली गोष्ट आहे. पण धोनी आता निवृत्त आहे. भारतीय टीम व्यवस्थापन आणि कॅप्टन प्रशिक्षक यांना आपला पर्याय राहील आणि आपल्यालाच पसंती मिळेल हे बघितलं पाहिजे. ऋतुराजला मोठी संधी आहे. पिंपरी-चिंचवड भागातला तो पहिला आहे, जो भारताकडून खेळला आणि खेळणार आहे. या आधी राजू मोटवानी रणजी खेळला होता.
अवघा अकरा वर्षांचा असल्यापासून ऋतुराज क्रिकेट खेळतोय. त्याचे आई-वडील त्याला प्रोत्साहन देत आहेत. त्याचे वडील दशरथ 'डिफेन्स रिसर्च डेवलपमेंट ऑफिसर' तर आई शिक्षिका. ज्युनिअर स्तरावर त्याने छाप पाडली आणि अठरा वर्षाचा होत नाही तोच तो रणजीसाठी निवडला गेला आणि मग दोन वर्षांत आयपीएलमधे तो खेळायला लागला. त्याची ही प्रगती समाधानकारक राहिली आहे.
हल्ली आयपीएल हेच मुलांचं उद्दिष्ट होऊ लागलंय. पैसा मिळून स्थैर्य आणून देणारा हा एक मार्ग त्यांना वाटतो. पण ज्यांचं खरं खेळावर प्रेम आहे आणि जे देशाकडून खेळण्यात महत्त्व मानतात, ते मात्र यात अडकून पडत नाहीत.
ऋतुराजला भारतीय टीममधे महत्त्वाचं स्थान आहे हे त्याच्या एकूण खेळावरून स्पष्ट होतं. त्याला यावर आता लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. मध्यंतरी तो कपिल शर्मा शोमधे आला होता. त्याने त्याच्या साधेपणानं सगळ्यांची मनं जिंकली होती. ऋतुराजने संयमितरीत्या मैदानावर आणि मैदानाबाहेर वागावं. याच्यासाठी प्रत्येक पुढचा ऋतू बरवा राहणार आहे हे नक्की.
हेही वाचा:
महेंद्र सिंग धोनी: वनडेतला ‘ग्रेट फिनिशर’
मेजर ध्यानचंद यांनी हिटलरचा प्रस्तावही नाकारला
(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)