गुरुनाथ नाईक : वाचकप्रियतेचे विक्रम घडवणारे कादंबरीकार

०६ नोव्हेंबर २०२१

वाचन वेळ : ७ मिनिटं


रहस्य कादंबरीकार गुरुनाथ नाईक यांचं नुकतंच निधन झालं. सर्वसाधारण लेखक आपली सर्व पुस्तकांची मिळून १२०० पानं छापून आली तरी समाधानी असतो. नाईकांनी तर १२०८ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांचं आयुष्य त्यांच्या कादंबऱ्यांपेक्षाही चढउतारांनी भरलेलं होतं. त्यांच्या या आयुष्याविषयी २०१४ मधे पणजीतल्या त्यांच्या घरी भेटून लिहिलेला लेख.

त्यांच्या साहित्यावर कुठे परिसंवाद होताना दिसणार नाही. कुठल्या वाङ्मयीन म्हणवणार्‍या नियतकालिकांत त्यांच्यावर लेख छापून आलेले नाहीत. पेपरच्या रविवार पुरवण्यांनी त्यांच्या कादंबर्‍यांची कधी फारशी दखल घेतलेली नाही. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरही ते कधी दिसलेले नाहीत.

मोठमोठ्या समीक्षकांना त्यांच्या लिखाणावर लिहावं असं कधी वाटलेलं नाही. त्यांच्या विक्रमी साहित्यावर कुणाला संशोधन करून पीएचडी मिळवाविशी वाटली नाही. कुणी त्यावर शोधनिबंधही लिहिलेले नाहीत. एवढंच काय पहिल्या फळीचे प्रकाशकही त्यांच्या वाटेला कधी गेलेले दिसत नाहीत. तरीही मराठी पुस्तकं असलेल्या कोणत्याही लायब्ररीत गेलात तर वाचकांनी आणून दिलेल्या आणि घेऊन जाणार्‍या ‘वाहत्या’ पुस्तकात त्यांचं नाव असतंच.

त्यांची पुस्तकं लायब्रर्‍यांमधल्या कपाटांमधे धूळ खात राहत नाहीत. त्यांच्या कादंबर्‍यांना गेली चाळीस वर्षं सतत वाचकप्रियता मिळतेय. सर्वसामान्य वाचकांना रोजच्या कटकटींतून दोन घटका हमखास मनोरंजन देणार्‍या त्यांच्या कादंबर्‍या मराठीतल्या खर्‍या ‘बेस्ट सेलर’ आहेत. अशा एक दोन नाही तर एक हजार दोनशे आठ कादंबर्‍या लिहिणारे हे विक्रमी कादंबरीकार म्हणजे गुरुनाथ नाईक.

हेही वाचा: व्यवस्थेनं झोप उडवली असताना ‘निद्रानाश’ अटळ आहे!

अद्भूत कादंबरीकार

गुरुनाथ नाईकांच्या कादंबर्‍यांनी करमणूक झालेले शेकडोजण पाटो पणजी पुलावरून रोज जात असतील. त्यातल्या क्वचितच कुणाला पाटो गव्हमेंट कॉलनीत नाईक राहतात हे माहीत असेल. गोवा सरकारने त्यांना दोन वर्षांपूर्वी हा फ्लॅट राहण्यासाठी दिला. ते, त्यांच्या पत्नी आणि मुलगा असे तिघं तिथे राहतात.

गेल्याच वर्षी त्यांनी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलीय. आठवड्याभरापूर्वीच ते शिरोडा आयुर्वेदिक हॉस्पिटलातून घरी आलेले. त्यांचं आजारपण आणि पुस्तकांच्या बाजारातल्या सध्याच्या मंदीमुळे थांबलेलं उत्पन्न यामुळे आलेली हलाखी त्या घरात सगळीकडे दिसत राहते.

तिथे सगळी श्रीमंती आहे एका अंधार्‍या कोनाड्यात. नाईक दरवाजामागचं एक डुगडुगतं कपाट उघडून दाखवतात. वरपासून खालपर्यंत पुस्तकंच पुस्तकं. एकाच पुस्तकाची एकच प्रत. तरीही सगळं कपाट गच्च भरलेलं. काही पुस्तकं समोर उभी केलेली. त्यांची तेवढी दिसणारी कवर.

‘ऑपरेशन ईगल’, ‘पहिला घाव’, ‘जहाजाचे पिशाच्च’, ‘रक्तरंजित सिंहासन’, ‘अज्ञान ग्रहावरून’, ‘भ्रमिष्ट सुंदरी’, ‘माणूस खाणारे यंत्र’, ‘खुनी जलसा’, ‘सोनेरी गरुड’ अशी एकापेक्षा एक अद्भूत नावं असलेल्या कादंबर्‍या. त्यात वेगळी वाटणारी दोन तीन पुस्तकं. एक ‘रणनिपुण छत्रपती शिवराय’ हे महाराजांवरचं पुस्तक. दुसरी दोन, ‘अल कैदा’ आणि ‘इस्लामी ड्रॅगन’ ही ओसामाविषयीची पुस्तकं.

फरफट लहानपणापासूनच

‘मी साखळीचा. जन्म १९३८. मी चार वर्षांचा असताना माझ्या वडलांनी पोर्तुगिजांविरुद्ध बंड केलं. त्यांचं नाव विष्णू नाईक. त्यांना विष्णू नावानं कुणीच ओळखायचं नाही. सगळे त्यांना पोको म्हणायचे. ते, कुर्टी फोंड्याचे सहकारी आणि सदाशिवगडचे देसाई असे तिघे मित्र होते. त्यांनी बंडासाठी बंदुकी गोळा केली होती. पोलिसांनी धाड घातली. सगळंच फिसकटलं आणि आम्ही गोवा सोडून बेळगावजवळ लोंढ्याला आलो.'

‘वर्नाक्युरल फायनल’ म्हणजे सातवीपर्यंतचं माझं सगळं शिक्षण तिथेच झालं. वडिलांनी आधी धारवाडला काताचा कारखाना सुरू केला. पण भागीदारांनी फसवलं. नंतर रेल्वेचं कँटिन चालवायला घेतलं. अर्धांगवायूचा झटका आला. पुन्हा फरफट सुरू. लग्नाच्या तीन बहिणी होत्या. आम्हाला काम करण्यावाचून गत्यंतर नव्हतं. मोठा भाऊ मिलिटरीत गेला आणि मी बेळगावात मिळेल ती छोटी मोठी कामं करू लागलो.’ नाईक आपल्या बालपणाविषयी सांगतात.

लहानपणापासून सुरू झालीेली ही फरफट आजवर थांबलेली नाही. त्यात अधूनमधून आनंदाचे दिवस दिले ते पुस्तकांनीच. बेळगावात त्यांनी लोकांच्या घरचं पाणी भरण्यापासून कामं केली. इथे तिथे कामं करताना छापखान्यातल्या कामात मन रमलं. रंगभूमीवर तोंडाला रंग लागली की जसा निघत नाही तसाच छापखान्याची शाई हाताला लागली की निघत नाही म्हणतात. ते नाईकांच्या बाबतीत खरं असावं.

हेही वाचा: ‘जेजुरी’ समजवणाऱ्या एका दुर्लक्षित पुस्तकाची पंचविशी

पत्रकारितेतही फरफट

बेळगावच्या मराठा हायस्कूलात शिकत असतानाच ते बाबूराव ठाकूरांच्या ‘तरुण भारत’ या पाक्षिकासाठी बातमीदारी करत. तिथून ते १९५७ला पुण्याला गेले. नागपूरचा ‘तरुण भारत‘ पुण्याहून निघणार होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी होतीच. ग. वि. केतकरांसारख्या भक्कम संपादकाच्या हाताखाली ते तयार झाले. पण फार काळ तिथे टिकले नाहीत.

पुण्याहून नाशिक. दादासाहेब पोतनीसांचा ‘गावकरी. त्यांनीच औरंगाबादला ‘अजिंठा’ सुरू केला. त्याच्या पायाच्या दगडांमधे नाईक प्रमुख होते. पण तेवढ्यात मायभूमीची हाक आली. गोव्यात ‘गोमंतक’ सुरू झाला. बा. द. सातोस्करांचं बोलावणं आलं. द्वा. भ. कर्णिक ‘नवप्रभे’त आले. त्यांनी बोलावून घेतलं. ‘तेव्हाची पत्रकारिताच वेगळी होती. आज वाचकांना वेळ नाही. तेव्हाचे वाचक बरेच रिकामे होते. तेव्हा वाचक तर नवीन होते पण पत्रकारही नवीन होते. सगळेच चाचपडत होते.'

'सातोस्करांसारखा माणूस खूप विद्वान. त्यांना दैनिकाचा अनुभव नव्हता. ते अग्रलेख लिहिला की मोकळे व्हायचे. पण तेव्हा पत्रकारिता हे व्रत होतं. त्यात प्रामाणिकपणा होता. त्या काळात आम्ही घडलो. त्यामुळे खूप कमी पैसे मिळूनही पत्रकारितेशी बेईमानी करण्याचा विचारही कधी आला नाही.'

मूल्यांशी इमान राखलं

'एका वर्तमानपत्राचा कार्यकारी संपादक असताना एक मोठा राजकारणी माझ्याकडे आला. एक बातमी छापू नका, तीस हजार रुपये देतो म्हणाला. मी शांत राहिलो. तो गेल्यावर मी सांगितलं आतल्या पानावरची त्याच्या विरोधातली बातमी पहिल्या पानावर मोठ्या पॉइंटात छापा. दुसर्‍या दिवशी तो बोंबलत आला. मी त्याला सांगितलं, इथे पत्रकार विकले जात नाहीत.’

हे सगळं वाचायला बरं वाटत असलं तरी त्यांना पत्रकारितेतून पैसा मिळाला नाहीच. त्या काळात पगार तुटपुंजे होते. जास्त पगारासाठी त्यांनी पेपर बदलले असावेत. तरीही बरा पगार कधी हाती आला नाही.

हेही वाचा: राजस्थानातल्या पुष्करच्या वाळूत उमटलेल्या घोड्यांच्या टापांची गोष्ट

कादंबरी लिखाणाला सुरवात

‘नवप्रभा’मधे असताना पुण्याला एक नवा पेपर काढण्याची तयारी सुरू झाली होती. त्यासाठी ते पुण्याला गेले. पण तो पेपर निघालाच नाही. पुन्हा जुन्याच पेपरांत काम करून जुनाच पगार त्यांना नको होता, ‘मी प्रेसलाईनला कंटाळलो होतो. पुण्याला प्रकाशकांना भेटलो. ‘सदानंद प्रकाशन’चे सदानंद खाडिलकर म्हणून होते. त्यांनी मला सांगितलं दोन कादंबर्‍या लिहून दे. मी देतो म्हणालो, पण काहीच सुचत नव्हतं.'

'सिनेमा लागला होता, ‘किस द गर्ल अँड मेक देम डाय’. ती एका शास्त्रज्ञाची आणि गुप्तहेराची कथा होती. मी तो सिनेमा अर्धाच बघितला. बाहेर आलो आणि लिहायला सुरवात केली. ‘मृत्यूकडे नेणारे चुंबन’ आणि ‘शास्त्रज्ञाच्या मृत्यूचे गूढ’ अशा दोन कादंबर्‍या दोन दिवसांत लिहून दिल्या. काही काम नव्हतं म्हणून बेळगावला घरी आलो. मागोमाग प्रकाशकाचं पत्र आलं, कादंबर्‍या वाचून गरगरलो आहे. लगेच पुण्याला या. एका कादंबरीत मजकूर कमी पडत आहे.’

ते १९७५ साल होतं. प्रकाशकाने रोख पैसे हातात दिले. दोन्ही कादंबर्‍या बाजारात आल्या आणि तुफान चालल्या. त्यानंतर नाईकांनी खरंच मागे वळून काय डोकं वर काढूनही बघितलं नसावं.

कादंबर्‍यांना तुफान प्रतिसाद

सकाळी साडेपाचला लिहायला सुरवात करायची. रात्री उशिरापर्यंत लिहित राहायचं, असा क्रम सुरू झाला. दोन तीन दिवसाला एकेक कादंबरी लिहिणं सुरू झालं. तेव्हा बाबूराव अर्नाळकरांचे काळा पहाड सारखे नायक गाजत होते. अकराशे कादंबर्‍या लिहिणार्‍या अर्नाळकरांशी स्पर्धा करणं सोपं नव्हतं. अशाच प्रकारच्या प्रणयरम्य कादंबर्‍या लिहिणारे एस. एम. काशीकरही गाजत होते.

सुहास शिरवळकर आणि बाबा कदम यांच्या कादंबर्‍याही हातोहात खपत होत्या. या स्पर्धेत नाईक फक्त तगलेच नाहीत तर गाजलेही. अर्नाळकरांसारखे नाईकांचेही नायक गाजले. ‘कॅप्टन दिप’, ‘गोलंदाज’, ‘शिलेदार’, ‘शब्दवेधी’ अशा त्यांच्या नायकांच्या कादंबर्‍या बाजारात आल्या की लोकांच्या उड्या पडायच्या.

हेही वाचा: कथागत: अल्पसंख्यांकांच्या अस्वस्थ वर्तमानाच्या कथा

बिल्डिंगमधेच पोस्ट ऑफिस आलं

एका महिन्यात अशा सात सात मालिकांच्या कादंबर्‍या बाजारात यायला लागल्या. पण प्रकाशकांच्या हातून पैसे मिळत नव्हते. त्यांच्या दादागिरीला कंटाळून ‘शिलेदार प्रकाशन’चा जन्म झाला. अल्तिनोच्या अकबर अली बिल्डिंगमधे राहत्या घरून प्रकाशनाचं काम चालायचं.

रोज व्हीपीचे गठ्ठे महाराष्ट्रात जायला लागले. पण पणजीच्या पोस्ट ऑफिसातल्या लोकांना इतकं काम करायची सवय नव्हती. ते व्हीपी स्वीकारायचे नाहीत. मुंबईला तक्रार केली. नाईक राहत असलेल्या इमारतीत त्यांच्यासाठीचं खास पोस्ट ऑफिस सुरू झालं. पुढे नाईकांनी गोवा सोडल्यावर ते पोस्ट ऑफिस सांत इनेजला हलवण्यात आलं.

कफल्लक झाले, पुन्हा सुरवातही

पैसा भरपूर येत होता. पण स्वभाव व्यवहारी नव्हता. आधी नातेवाईकांनी त्यांच्या पैशांवर इमले बांधले. मग कर्ज काढून वेलिंग साको इथे सुरू केलेला अत्याधुनिक प्रिटिंग प्रेस बंद करावा लागला. गोव्यातून कफल्लक होऊन त्यांनी मुंबई गाठली. वसईला पुन्हा कादंबर्‍या लिहिणं सुरू झालं. त्यात माधव गडकरींच्या मैत्रीमुळे ‘लोकसत्ते’चं कामही मिळालं.

वसईत ठीकठाक सुरु असताना ‘अजिंठ्या’चं बोलावणं आलं. पुन्हा औरंगाबाद. दोन वर्ष तिथे चांगलं सुरू होतं. तेवढ्यात ‘लोकमत’ औरंगाबादेत आलं. ‘लोकमत’ने ‘अजिंठ्या’ची सगळी माणसं आपल्याकडे ओढली. नाईक एकटे उरले. पोतनीसांनी ‘अजिंठा’ बंद केला. तेवढ्यात आमदार विलासराव खरातांनी जालना जिल्ह्यातल्या अंबड इथं नवं दैनिक सुरू करत होते, ‘दुनियादारी’. याच नावाने नाईकांनी सुहास शिरवळकरांच्या एका कादंबरीचं बारसं केलं. तिने पुढे इतिहास रचला.

जालन्यातल्या दोन वर्षानंतर विलासराव देशमुखांच्या 'एकमत'मधे जाणं झालं. ज्येष्ठ पत्रकार तुकाराम कोकजे तिथे कार्यकारी संपादक होते. त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांनी हट्ट धरून नाईकांना 'एकमत'मधे आणलं. पुढे १४ वर्षं ते लातूरचे बनले. ‘कोकजे असेपर्यंत सहसंपादक आणि नंतर कार्यकारी संपादक होतो. मला पगार होता फक्त साडेचार हजार. विनंत्या करूनही ते ऐकले नाहीत.'

'एकदा कंटाळून मी कोल्हापुरात ‘पुढारी’ला आलो. तिथेही विलासरावांनी फोन केला, माझा कार्यकारी संपादक का पळवलात? ‘पुढारी’च्या मालकांनी स्वतःची गाडी करून मला लातूरला पाठवलं. पण पगार काही वाढवला नाही.’

हेही वाचा: तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध

गळत्या छतात कादंबऱ्यांचं लिखाण

लातूरला असताना त्यांना मणक्याचा त्रास सुरू झाला. स्थिरस्थावर झालेलं आयुष्य पुन्हा रसातळाला गेलं. दोन वर्षं स्वतःच्या पायावर उभं राहता येत नव्हतं. विलासरावांनी काहीच मदत केली नाही. दोन वर्षांच्या औषधोपचारांत जमा केलेली सगळी पुंजी संपली. पुन्हा वसई गाठली.

पुन्हा उपचार सुरू ठेवले. कुठेच यश लाभलं नाही. शेवटी अ‍ॅक्युपंक्चरनं कसंबसं बरं वाटलं. वसईत राहणं परवडत नव्हतंच. त्यामुळे पुण्याजवळ मुळशीला एका पत्र्याची झोपडी भाड्याने घेतली. तिथे पुन्हा लिहिणं सुरू. चारही बाजूंनी गळत्या छतामधे बसून पुन्हा कादंबर्‍या लिहिणं सुरू झालं.

संघर्षाच्या नायकाची वार्‍याशी झुंज

‘तिथे मला एक मित्र शोधत शोधत आला. बीडला एक पेपर सुरू करायचा होता. सगळा सेटअप तयार होता. माणसांना सहा महिने पगार दिला जात होता. पण पेपर सुरू करण्याची कुणाची हिंमत होत नव्हती. मी तिथे गेलो. तिसर्‍या दिवशी पेपर सुरू केला. ‘लोकाशा’ नावाचं दैनिक तिथे दोन वर्षं रुजवलं. पण तेवढ्यात पुन्हा नष्टचर्य सुरू झालं.’

२००४ सालची ‘लोकाशा’ ही त्यांची अखेरची नोकरी ठरली. ते पुण्यात एका कामानिमित्त गेले असताना मेंदूला एका बाजूने होणारा रक्तपुरवठाच मंदावला. त्यामुळे स्वतःची ओळखच ते विसरून गेले. त्यांच्या पत्नीने त्यांना कसंबसं शोधलं.

पुन्हा उपचार सुरू झाले. पुन्हा हॉस्पिटल सुरू झालं. सगळी पुंजी संपली. गोव्यात डोक्यावर छत तरी मिळालं. आता सगळं थांबलं आहे. कादंबरीत शोभाव्या अशा संघर्षाचा हा नायक वार्‍याशी झुंज देतो आहे.

हेही वाचा: 

एक कवी दुसऱ्या कवीला पत्र लिहितो तेव्हा

'लाल श्याम शाह' हे पुस्तक मी का लिहिलं?

नदीष्ट : माणूस आणि नदी यांचा समांतर प्रवास

गांधी का मरत नाही: खरा इतिहास बघण्याचा चष्मा!

आगळ ही कादंबरी गाव आणि शहर यांच्यातला संवादसेतू

(२०१४ मधे दैनिक गोवादूतमधे प्रकाशित)