अज्ञान आणि परंपरेची कुल्पं उघडणाऱ्या 'चाव्या'

१९ मे २०२२

वाचन वेळ : ७ मिनिटं


दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या 'चाव्या' या पुस्तकाची नवी आवृत्ती सुमतीबाई लांडे यांच्या शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलीय. जागतिक संस्कृतीव्यवहार पाहून, अनुभवून, सूक्ष्म चिंतनातून सुचलेलं महाराष्ट्राविषयीचं हे प्रकट चिंतन आहे. आपली झापडं उघडून घेण्यासाठी आणि डोळस होण्यासाठी प्रत्येक मराठी माणसानं ते वाचायलाच हवं. या पुस्तकावर ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांनी लिहिलेली ही फेसबुक पोस्ट.

दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचं चाव्या नावाचं भन्नाट पुस्तक वाचलं. तसं ते ४० वर्षांपूर्वी पहिल्यांदा प्रकाशित झालं तेव्हाही वाचलं होतच, पण तेव्हा मी एक भाबडा वाचक होतो आणि चित्रे यांचा एकमेव कवितासंग्रह तेव्हा प्रकाशित झालेला होता. त्यातल्या कविता मला अजिबात समजल्या नव्हत्या. त्यामुळे तेव्हाचं माझं या पुस्तकाचं वाचन म्हणजे पालथ्या घड्यावर ओतलेलं पाणी होतं.

नंतर चित्रे यांच्या समग्र कवितांचे खंड प्रकाशित झाले. आणि महत्त्वाचं म्हणजे पुन्हा तुकाराम या पुस्तकामुळे आणि त्या पुस्तकाच्या इंग्रजी अवतारामुळे चित्रे आणि तुकाराम यांना दिगंत कीर्ती मिळाली. अर्थात हे पुस्तक प्रकाशित झाल्या झाल्या मी विकत घेऊन वाचलं होतं. परभणीत त्याच्या दहा प्रती मागवल्या होत्या. तोपर्यंत त्याचा गाजावाजा झालेला नव्हता. पुढं चित्रे यांची ओळख आणि भेटही झाली. माझ्या 'आम्ही काबाडाचे धनी' या दीर्घकवितेला त्यांची मनमुराद दादही मिळाली.

चित्रेंचं चाळीशीतलं 'चाव्या'

चाव्या पुस्तक हाती आलं ते परवा वाल्मीक वाघमारे या औरंगाबादच्या मित्राच्या दुकानात पुस्तकं विकत घेताना. ही नवी आवृत्ती सुमतीबाई लांडे यांच्या शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलेली आहे. पहिली आवृत्ती अशोक शहाणे यांच्या प्रास प्रकाशनाने पुस्तिकेच्या स्वरूपात काढली होती.

चित्रे यांची कविता आणि तुकाराम वगळता बहुतेक पुस्तकं अत्यंत चांगल्या स्वरूपात सुमतीबाई यांनीच प्रकाशित केलेली आहेत. त्यात ऑर्फीयस हा कथासंग्रह आहे. अगतीकांचे जागतिकीकरण, तुकोबांचे वैकुंठगमन, तिरकस आणि चौकस, प्रत्येय आणि व्यत्यय ही वैचारिक पुस्तकं आहेत. साहित्य आणि अस्तित्वभान या समीक्षाग्रंथाचे दोन खंड आहेत. या सगळ्या कामासाठी मराठी वाचक सुमती बाईंचे कायम ऋणी राहील.

चाव्या या पुस्तकाचं लेखन केलं तेव्हा चित्रे चाळीशीत होते, याचा पुरावा या लेखनातच मिळतो. तोपर्यंत सगळं जग फिरून आपल्या बुद्धी कौशल्याच्या बळावर युरोपीयनांसाठी लेखनाच्या कार्यशाळा घेऊन, तिथे जगभरातल्या प्रतिभावंतांसोबत काम करून ते महाराष्ट्रात परत आलेले होते.

मराठी लेखकात समग्र कलांची जाण असलेला आणि जगभरात मान्यता मिळवलेला, सर्व कलाक्षेत्रात निर्मितीचा हस्तक्षेप केलेला दुसरा प्रतिभावंत नाही. भारतीय पातळीवर विचार केला तर केवळ रवींद्रनाथ टागोर हे एकच नाव पुढे येतं. चित्रे टागोरांपेक्षाही चित्रपट कलेत एक पाऊल पुढे होते. अर्थात तो त्यांच्या काळाचा महिमा होता.

महाराष्ट्राविषयीचं प्रकट चिंतन

मराठी वाङ्मयव्यवहारावर टीका करणाऱ्या भालचंद्र नेमाडे आणि अशोक शहाणे यांच्यापेक्षाही चित्रे जास्त दाहक आहेत. पण त्यांच्या या लेखनाची फारशी चर्चा झालेली नाही. महाराष्ट्राच्या जीवन, समाज, वाङ्मय, संस्कृती, संगीत, नाट्य, चित्रपट या सर्व कला व्यवहारावर चित्रे यांनी या पुस्तकात टीका टिप्पणी करताना भल्याभल्यांना पासलं पाडलेलं आहे. हे सगळं त्यांना जागतिक संस्कृतीव्यवहार पाहून, अनुभवून, सूक्ष्म चिंतनातून सुचलेलं महाराष्ट्राविषयीचं प्रकट चिंतन आहे.

या मजकुराच्या लेखनावेळी चित्रे ज्ञानदेवांच्या कवितेनं आणि कर्तृत्वानं भारावलेले दिसतात. पुढं त्यांच्या आयुष्यात ती जागा तुकारामानं घेतल्याचं दिसतं. अर्थात तुकारामावरच्या त्यांच्या कामाला प्रकाशक मिळाला आणि ते नावाजलंही गेलं. पण अमृतानुभवाचं त्यांनी केलेलं सभाष्य चिंतन, संपादन अजूनही अप्रकाशित आहे. त्याला प्रकाशक मिळाला नाही.

दि. पू. चित्रे यांचा मराठी वाङ्मयाचं आणि जागतिक वाङ्मयाचं वाचन अफाट आहे. आणि त्यांचा स्वतःचा एक विशेष दृष्टिकोन आहे. त्यामुळे त्यांची इथली निरीक्षणं वाचताना सतत वाटत राहतं की चित्रे हे अफाट सागरातला नीरक्षीरविवेकी राजहंस आहेत आणि आपण मात्र डबक्यातल्या पानकवड्या आहोत.

कवी, कथाकार आणि समीक्षकही

चित्रे यांनी उच्च दर्जाची चित्रं काढलेली आहेत.पंडित आरोलकर यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतलेले आहेत. संगीत गुरुही त्यांनी चिकित्सा करूनच निवडलेला आहे. त्यांचे ते गुरु निवडीचे निकष वाचताना भारतीय संगीतातले तमाम महान गायक तोकडे वाटायला लागतात.

भाऊ पाध्ये यांच्या कथेवर आधारित, धनगरांचं आदिम जगणं चित्रित करणारा, चित्रे यांनी काढलेला गोदाम हा चित्रपट जागतिक ख्याती मिळवून गेला. त्याचं दिग्दर्शन आणि संगीत दिग्दर्शनही चित्रे यांनीच केलेलं होतं.

त्यांच्या अध्यात्मिक जाणिवा आणि अनुभूती कोणाही विभूतीपेक्षा कमी नव्हती. आणि ते मराठीतले सर्वश्रेष्ठ कवीही होते. प्रयोगशील कथाकार होते आणि विलक्षण दृष्टी असलेले समीक्षक होते. म्हणूनच मी वर म्हटलं आहे की चित्रे यांच्याइतका चतुरश्र मराठीत इतर कोणी नाही.

चित्रेंना कळलेली मुंबई

चित्रे यांचा 'मराठी लेखकांची मुंबई' हा लेख वाचताना कळतं की चित्रे यांनी मुंबईचा आणि मराठी साहित्याचा किती सखोल अभ्यास केलेला आहे. चित्रे यांना जेवढी मुंबई कळलेली आहे तितकी ती इतर कुणाला कळली असेल असं वाटत नाही. याच्या कारणांचा शोध घेतला तर याच पुस्तकातल्या 'परस्त्री, परदेश आणि पुनःप्रत्यय' या लेखात त्याचं उत्तर सापडतं.

त्या लेखात एका ठिकाणी चित्रे म्हणतात, 'मी बाराव्या वर्षी प्रथम बडोद्याहून मुंबईला आलो. त्यानंतर मुंबईतच वाढलो. हे माझं आवडतं शहर. याचा कानाकोपरा मी हिंडलोय. ज्या वस्त्यांमधे मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय मुलं कधीच फिरली नसतील अशाही वस्त्यात. शहराची भौगोलिक आणि सामाजिक माहिती मला दारूच्या आणि चरसाच्या अड्ड्यात झाली. तशीच नातेवाईक आणि मित्रांमधेही कामगार कार्यकर्त्यांबरोबर इकडे तिकडे फिरून आपोआप झाली.'

'माझे मित्र समाजातल्या नाना घरातले. कोणी पारशी, कोणी मुस्लिम, कोणी गोव्याचे किंवा ईस्टइंडियन. शाळेत माझ्या वर्गातली मुलं धारावीची आणि दलित जमातीतली. कॉलेजात इंग्रजी विषयामुळे कोणी तामिळ, कोणी बंगाली, कोणी मल्याळी, कोणी पंजाबी. वाटेल ते खाण्यापिण्याचा नुसता सरावच नाही तर आवडच. शहरातलं हे सांस्कृतिक अक्करमासेपण मला पुढे जगभर उपयोगी पडलं. मुंबईत वाढलो नसतो तर मला न्यूयॉर्क, लंडन, फ्रेंकफूट, म्युनिक, पॅरिस, बुडापेस्ट लॉसएंजेलिस सारख्या शहरात पाय ठेवताच बिनधास्त सराईतासारखं फिरता येणं अशक्य होतं.'

नव्या पुस्तकाची उत्कृष्ट बांधणी

'शिबा राणीच्या शोधात' हे चित्रे यांचं प्रवास वर्णनही आता कुणीतरी पुन्हा प्रकाशित करायला हवं. पूर्वी ते मॅजेस्टिक प्रकाशनानं प्रकाशित केलेलं होतं. ते आता लोक विसरत चाललेत. तेही असंच विलक्षण वेगळं प्रवास वर्णन आहे. तेही सुमतीबाईंनी आम्हाला उपलब्ध करून दिलं तर त्यांचे खूप खूप उपकार होतील.

चित्रे यांच्या समग्र कवितांचं एकत्रित संपादन प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी केलेलं आहे. त्याची आता नवी आवृत्तीही पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेली आहे. या श्रेयस आवृत्तीलाही खूप प्रतिसाद मिळाला. मृत्यूनंतर चित्रे यांची कविता जास्त वाचल्या गेली.

पानांच्या आजूबाजूला ऐसपैस जागा सोडून आणि मोठ्या आकारातला विरळ मजकूर छापूनही हे पुस्तक केवळ ११२ पानांचं झालय. तरी सुमतीबाईंनी ते हार्ड बाउंड केलय. नॅचरल शेडचा जाड कागद वापरल्यामुळे इतक्या कमी पानालाही हार्डबाउंड शोभून दिसतं.

संदीप सोनवणे या नव्या चित्रकारानं केवळ अक्षर लेखनातून अत्यंत सूचक आणि कलात्मक मुखपृष्ट साकारलय. मजकूरातल्या वैचारिक श्रीमंतीला शोभावी अशीच श्रीमंत निर्मिती भौतिक स्वरूपातही सुमती बाईंनी केलेली आहे.

मस्तक उघडणाऱ्या चाव्या

चाव्या हे पुस्तक आपली झापडं उघडून घेण्यासाठी आणि डोळस होण्यासाठी प्रत्येक मराठी माणसानं वाचायलाच हवं. हे छोटेखानी पुस्तक प्रचंड शक्तिशाली आहे. आपल्या डोक्याला अज्ञान आणि परंपरेने अनेक कुल्पे लावलेली असतात. त्यांना खाडखाड उघडणाऱ्या २१ चाव्यांचा जुडगा म्हणजे हे पुस्तक.अत्यंत छोटेखानी असलेले हे लेख म्हणजे प्रचंड ज्ञानाची अवतरणंच आहेत. यातलं प्रत्येक वाक्य उद्धृत करण्यासारखं आहे. तरी काही निवडक उतारे मी खाली देत आहे.

।। एक ।।

व्यासपीठावरिल भाषण आणि कविता, नाटकी स्वगत आणि कविता यातले फरक ढोबळ असले तरी ते मराठीत सहज कळून यायला सभोवार विविधपणं विकसित झालेलं गद्य हवं. ते आज उपलब्ध नाही. त्यामुळं आमच्या वाङ्मयप्रकारांच्या संकल्पनाच गढूळ, भोंगळ आणि पसरट झालेल्या आहेत. एवढ्या खोल आणि व्यापक काव्यपरंपरेत सुद्धा कविता आज पूर्णपणे विकसित होऊ नये आणि गद्यही जेमतेम वाढावं याचा विचार करणं भाग आहे.

।। दोन ।।

ज्ञानदेव संस्कृत विद्या वाङ्मयाच्या बाबतीत जे करू शकले ते एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातल्या सर्व मराठी लेखकांना मिळून सुद्धा करता आलेलं नाही. इंग्रजीच्या व पाश्चिमात्य विद्या वाङ्मयाच्या बाबतीत हेच करणं आवश्यक होतं. इंग्रजी विचाराच्या, विकाराच्या, कल्पनेच्या, संवेदनेच्या स्पर्शानं मराठी भाषेत नवा उन्मेष दिसण्याऐवजी आम्ही इंग्रजीद्वारा संस्कृतकडे वळलो आणि त्या मृत भाषेच्या शवपेटीकेचे शब्दकोश बनवू लागलो. प्लेगची लागण झाल्यागत मराठीत परीभाषेचे उंदीर पटापटा निपचित पडू लागले. इंग्रजीने मराठीत फक्त नवे शास्त्री पंडित निर्माण केले. आणि सांस्कृतिक कार्य त्यांच्या पौरोहित्याशिवाय होईनाशी झाली.

।। तीन ।।

मराठी साहित्य संमेलन तरी काय असतं? या संमेलनाच्या अध्यक्षांची यादी काढून त्यांची नेमकी कामगिरी काय हे काढून अध्यक्ष न झालेल्या पण अत्यंत भरीव कामगिरी केलेल्या लोकांशी तिची तुलना करा. वाईट वाटायला नको. साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळालेल्या बहुतेक लेखकापेक्षा न मिळालेले लेखक थोर आहेत हे आत्ता वही पुस्तक घेऊन बसलात तर सिद्ध करून दाखवता येईल.

।। चार ।।

बहुतेक बायांचं कुंकू जेवढं मोठं तेवढी गुलामी ठळक असाच नियम दिसतो. शिवाय यांना शरीर सुख आणि समाधान कितपत मिळतं याची चौकशी करायची सोय हिंदू, मुस्लीम, कॅथलिक, बौद्ध कोणातच नाही. आपल्या देशात बायांना पुजलं वगैरे जातं ते त्यांना नैतिक, वैचारिक आणि भावनात्मक गुंगीत सतत ठेवण्यासाठीच. लग्न, कुटुंब या संस्था वंशसातत्याला आणि समाज संवर्धनाला आवश्यक आहेतच. पण त्यात समता आढळत नाही.

।। पाच ।।

दलितांमधले सगळे यशस्वी लेखक जसे मध्यमवर्गीयच झालेत तशा सर्व लेखिका सुद्धा मध्यमवर्गीयच आहेत. आणि मध्यमवर्गीय मुख्यतः क्रांतीसुद्धा करतील ती ही विरंगुळ्यासाठी, कंटाळा येऊ नये म्हणून किंवा पब्लिकची करमणूक करायला. मध्यमवर्गीय हे सहसा मध्यम भुकेचे लोक असतात. त्यांचं थोडक्यात भागतं आणि त्यामुळे त्यांना फावला वेळ भरपूर असतो.

।। सहा ।।

आपल्या कुटुंबाची पूर्वपीठिका शोधत तीनचारशे वर्ष मागे जायचं ठरवलं तर आपल्या एकूण सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासावर एवढा प्रकाश पडेल की आत्मचरित्राच्याही पलीकडे जाणारा बराचसा वस्तुस्थिती आणि इतिहासनिस्ट असा एक नवीन वाङ्मयप्रकार उदयाला येईल. निव्वळ बौद्धिक आणि नैतिक पातळीवर जातीपातीचं आणि धर्माचं अस्तित्व नाकारण्यापेक्षा आपले आई, बाबा, आजी, आजोबा पणजी, पणजोबा कोण होते, कोण झाले, कसे झाले हे बघत जाणं आपल्या सांप्रतच्या सांस्कृतिक परिस्थितीत आवश्यक आहे. कोणी तरी तशी सुरवात करीलच.

।। सात ।।

पुस्तकं कशी वाचावीत? त्यात काय व कसे शोधावे? याचं प्रात्यक्षिक देते ही समीक्षा. ह्या शोधातच संकल्पना आपोआप सापडतात, स्पष्ट होतात. स्वतःच्या संस्कारांच्या संदर्भात आपण समोरचं पुस्तक पारखतो. नंतर त्या पुस्तकाच्या संदर्भात आपण स्वतःचे संस्कार पारखतो. पुस्तकातली मूल्य आणि आपली मूल्य यांचा तुलनात्मक विचार करतो. या विचारात समाज आणि संस्कृतीची सगळी अंगं येतात. वांग्मयीन परंपरा आणि नवता यांचा विचार येतो. माणसाचा नैसर्गिक स्वभाव आणि स्वाभाविक व सुप्त गुण आणि समाजवेष्टित स्वभाव व व्यक्तीजीवन यांचाही विचार येतो. हे पुरेशा प्रमाणात झाल्यानंतरच तात्विक, तांत्रिक, सैद्धांतिक समीक्षेचा संदर्भ तयार होईल.

।। आठ ।।

म्हणूनच बरेच गुरु करावेत, बऱ्याच बायका कराव्यात, बऱ्याच देशात फिरावं, बरेच विषय शिकावेत, बरीच कामं करावीत वगैरे प्रबोधनोपयोगी गोष्टींना महत्त्व आहेच. आपलं आपल्याला जोवर आश्चर्य वाटतं तोवर जीवनात संस्कृतीत वगैरे रस असतो. एकदा कंटाळा येऊ लागला की मग काही उपाय नाही. जिथे लोकांना स्वतःचाच कंटाळा येऊ लागतो तिथं माणसाच्या आत्मच्युतीची सुरवात असते. मग व्यक्ती दिसेनाशा होऊन व्यवस्थाच भेडसावू लागते. किंवा कलाकृतीचे ज्ञान आणि अनुभव टाळून सौंदर्यशास्त्राच्या तात्वीक चर्चेत माणसं मरगळतात. कलेचे शिक्षण विविध संस्कारातून मिळतं. त्यातून संकल्पना निर्माण करणं हे तर माणसाच्या बुद्धीचं स्वाभाविकच काम आहे. आदिवासी सुद्धा बुद्धिकौशल्य वापरतात कदाचित ते मराठी मध्येमवर्गापेक्षा वेगळे असतात म्हणून देखील असेल.

पुस्तक: चाव्या
लेखक: दिलीप पुरुषोत्तम चित्रे
प्रकाशक: सुमती लांडे
प्रकाशन: शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर
संपर्क: ९८२२००८७९६, ९८२२५२५४४४