ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक, संपादक दत्ता गायकवाड यांचं ‘चैतन्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हे पुस्तक. १९२४ ते १९५४ या काळातल्या सोलापूरच्या संदर्भात बाबासाहेबांच्या भेटींची, परिषदांची, निवेदनांची, ठरावांची, वृत्तपत्रांतल्या वृत्तांकनांची, लोकांच्या प्रतिसादाची नोंद या पुस्तकात आहे. सोलापुरातल्या बाबासाहेबांच्या चळवळीचे तपशीलात वर्णन करणारं हे पुस्तक एक मौलिक दस्तावेज झाला आहे.
गूगलच्या नकाशात एका मोठ्या भूभागातलं छोटं ठिकाण आकार वाढवून आपण पाहतो तेव्हा त्यातले अनेक बारीक तपशील आपल्यासमोर येतात. थोरांच्या चरित्राचंही तसंच असतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं समग्र चरित्र आपण वाचलेलं असतं. त्यात चळवळीच्या निमित्ताने भेटी दिलेल्या, काही कार्यक्रम घेतलेल्या शहरांचे, गावांचे उल्लेख येतात. पण त्यांचं विस्तृत किंवा सखोल विवेचन, वर्णन तिथं नसतं. ते शक्यही नसतं.
असे तपशील कळले तर बाबासाहेबांसारख्या महामानवाच्या भूमिकांविषयी, आंदोलनाविषयी, संघटनेच्या आणि कार्यकर्त्यांच्या ताकदीविषयी अधिक जाणता येऊ शकतं. ही उणीव भरुन काढण्याचे प्रयत्न अभ्यासकांनी, त्या त्या भागातल्या कार्यकर्त्यांनी करायचे असतात. पण तसं होतंच असं नाही.
हेही वाचा: मुक्काम चैत्यभूमीः ‘जय भीम’ जागवणारी रात्र
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाच्या महाराष्ट्रातल्या विविध भागांतल्या संचाराविषयी तिथल्या मंडळींनी तपशील गोळा करुन काही लिहिल्यास बाबासाहेबांच्या व्यक्तित्वाविषयी, त्यांच्या सहकाऱ्यांविषयी, तिथल्या जनतेच्या प्रेरणा आणि स्पंदनांविषयी बऱ्याच गोष्टी उजेडात येऊ शकतील, अधिक ठळक होतील.
हे घडू शकतं, अगदी प्रभावीपणे घडू शकतं, याचा नमुना म्हणजे ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक, संपादक दत्ता गायकवाड यांचं ‘चैतन्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हे पुस्तक. पुस्तकाच्या शीर्षकाखाली अधिक स्पष्टतेसाठी ते नोंदवतात – ‘रमाई आणि बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झाले सोलापूर.’
सोलापुरातल्या बाबासाहेबांच्या चळवळीचे तपशीलात वर्णन करणारं हे पुस्तक एक मौलिक दस्तावेज झाला आहे. वयाच्या ८० व्या वर्षी कोरोनाच्या काळात दत्ता गायकवाड हा प्रकल्प हाती घेतात आणि वेगवेगळे संदर्भ शोधत, अभ्यासत तडफेने पूर्ण करतात, हे विशेषच म्हणावं लागेल.
१९२४ ते १९५४ या कालखंडातल्या सोलापूरच्या संदर्भात बाबासाहेबांच्या भेटींची, परिषदांची, निवेदनांची, ठरावांची, वृत्तपत्रांतल्या वृत्तांकनांची, लोकांच्या प्रतिसादाची नोंद या पुस्तकात आहे. सोलापुरातल्या विविध भागांतल्या या नोंदी आहेत. पहिल्या प्रकरणात बार्शीच्या भेटींविषयी लिहिताना १९२४, १९३७ आणि १९४१ अशा तीन भेटी बाबासाहेबांनी बार्शीला दिल्याचं ते सांगतात.
१९२४ला बाबासाहेब ३३ वर्षांचे युवक होते. त्याही वयात दलित जनतेने त्यांना आपल्या उद्धारकर्त्याचं स्थान दिलं होतं. ‘बाबासाहेब कोण हाय – दलितांचा राजा हाय’ ही घोषणा प्रत्येक भेटीवेळी लोक देताना दिसतात. आपल्या उद्धारकर्त्याला बघण्यासाठीची लोकांची आतुरता, त्यांच्या व्यवस्थेत कोणतीही उणीव राहू नये म्हणून लोकांची साधनांची कमतरता असलेल्या त्या काळातली धडपड यांचे चित्रदर्शी वर्णन या पुस्तकात आहे.
बाबासाहेब येणार आहेत हे कळल्यावर त्या गावातले लोक आपल्या इतर गावांतल्या सोयऱ्याधायऱ्यांना आमंत्रित करत असत. बाबासाहेब कितीही विरोध करत असले, तरी लोक पाया पडायला धडपडत असत. समता सैनिक दलाचा बंदोबस्त असतानाही एक बाई एका स्वयंसेवकाच्या पायातून शिरली आणि बाबासाहेबांच्या चरणांवर पडली. मरिआईच्या कट्ट्यावर बाबासाहेबांनी सभा घेतल्याची कोंडाबाई कांबळे या वयोवृद्ध बाईंची आठवण लेखक नोंदवतात.
एके ठिकाणी बाबासाहेबांना उतरण्यासाठी योग्य जागा नव्हती म्हणून शाळेतला एक वर्ग स्वच्छ केला जातो. तिथे गादी, पलंग घातला जातो. त्यांच्या सुरक्षेसाठी दलित समाजातले तरुण पहिलवान चहुबाजूंनी रात्रभर पहारा देतात. त्या काळात लोकांच्या बाबासाहेबांच्या प्रति काय भावना आहेत, याचा अंदाज आपल्याला असतो. पण त्याचे हे तपशील वाचल्यावर आपल्याला त्याची अचंबित करणारी प्रचिती येते.
हेही वाचा: भीमा कोरेगावमधे २०१ वर्षांपूर्वी नेमकं घडलं काय?
मोठ्या चरित्रात छोट्या घटना आणि त्यातले मानवी संबंध फारसे व्यक्त होत नाहीत. बाबासाहेबांच्या पत्नी रमाबाई गरोदर असताना त्यांची प्रकृती खालावली होती. हवापालटासाठी मुंबईच्या बाहेर नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यावेळी सोलापुरातल्या बावी इथं रमाई सहकुटुंब राहिल्या होत्या. सत्यशोधकी विचारांच्या वालचंद कोठारींनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरु केलं होतं. त्या वसतिगृहात रमाई उतरल्या होत्या.
निंगप्पा ऐदाळे हे आधी शाहू महाराजांकडे असलेले बाबासाहेबांचे सहकारी वसतिगृहाची व्यवस्था पाहत असत. त्यांची पुतणी गंगुबाई या रमाईंच्या सहवासात होत्या. त्यांनी आपल्या आत्मचरित्रात रमाईंविषयीच्या या काळातल्या आठवणी लिहिल्या आहेत. त्यातलं एक अवतरण लेखकांनी या पुस्तकात दिलंय. इतिहास लेखनाचे हे स्रोत गायकवाडांनी उजेडात आणले आहेत. अन्यथा ते अंधारातच गुडूप झाले असते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्य चळवळीचे विरोधक आणि निजामाचे हस्तक होते, हे दोन आरोप आजही हितसंबंधी मंडळी करत असतात. हे दोन्ही आरोप बिनबुडाचे आहेत, हे बाबासाहेबांच्या भूमिकांचं वस्तुनिष्ठ परिशीलन करणाऱ्यांना लक्षात येतं.
या पुस्तकात २२-२३ फेब्रुवारी १९४१ च्या सोलापुरातल्या कसबे तडवळे इथं झालेल्या महार मांग परिषदेत बाबासाहेबांनी केलेल्या भाषणातले काही उतारे आहेत. त्यातला एक खाली देत आहे. त्यावरुन या आरोपांचा फोलपणा आपल्याला सहज लक्षात येतो. या परिषदेत बाबासाहेब म्हणतात -
'निजाम हा आपल्या मातृभूमीचा शत्रू आहे. ही गोष्ट अस्पृश्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. हिंदी संघराज्यात सामील होण्याला निजामाचा विरोध आहे. ...त्याबद्दल त्याची गय करता कामा नये. तसेच निजाम हा अस्पृश्यांचा आणि अस्पृश्यांच्या मातृभूमतीचा शत्रू आहे. म्हणून हैद्राबाद संस्थानातील स्वातंत्र्यप्रिय दलितांनी हैद्राबाद संस्थान हिंदी संघराज्यात सामील करण्यासाठी झटावे.'
हेही वाचा: धम्मदीक्षा घेताना बाबासाहेबांनी केलेलं ऐतिहासिक भाषण
अशा परिषदांमधे व्यापक धोरणासंबंधी तसंच स्थानिक प्रश्नासंबंधीचे ठराव होत असत. बाबासाहेब अन्यायाविरुद्ध उभे राहण्याच्या प्रेरणेबरोबरच शिक्षण, संघटन आणि राजकारण यांची अपरिहार्यता समजून सांगत. त्या त्या वेळच्या ऐरणीवर आलेल्या मुद्द्यांविषयी सविस्तरपणे समजावत असत. वैज्ञानिक दृष्टी असलेला नवा माणूस घडवण्यासाठी जुनाट अंधरुढींवर ते प्रहार आणि त्याचं प्रात्यक्षिक करत असत.
या परिषदांच्या वेळी गोसावी, पोतराज, माळकरी, जटाधारी यांनी आपापल्या अंगावरच्या माळा, आभरान, भगव्या कफन्या स्टेजजवळच्या खड्ड्यात टाकून त्यावर रॉकेल ओतून त्यांचं दहन केल्याचे प्रसंग लेखकाने चितारले आहेत. देवदासींनी आपल्या जटा कापून त्यांना जाळल्याचेही प्रसंग यात आहेत. या परिषदांवेळी प्रबोधनात्मक जलसे होत. या जलशांत काही ठिकाणी स्टेजवर महिला सहभागी झाल्याचीही नोंद या पुस्तकात आहे.
पाण्यासाठी अस्पृश्यांची स्वतंत्र विहीर बांधली जाते. तिला ‘आंबेडकर बावडी’ नाव पडतं. या विहिरीचं उद्घाटन बाबासाहेब करतात. त्यांच्या हातून पाणी पिण्यासाठी लोकांची तुफान गर्दी होते. हाही प्रसंग लेखकाने नोंदवला आहे. बाबासाहेबांच्या विचार-प्रेरणेची ऊर्जा माणसाचं माणूसपण कसं जागं करते त्याची कैक उदाहरणं सोलापुरातल्या या हकिगतींत आढळतात.
येवल्याला १९३५ला धर्मांतराची घोषणा होण्यापूर्वी त्याबाबतचं सूतोवाच कितीतरी आधी सोलापुरात बाबासाहेब करतात. सोलापूरची मिल मालकाने बंद केल्याने खाजगी संपत्तीच्या अधिकारासंबंधीची पहिली घटना दुरुस्ती होते. गाडगे महाराज आजारी असताना भेटायला आलेल्या बाबासाहेबांना आपली पंढरपूरची चोखामेळा धर्मशाळा शैक्षणिक कामासाठी दान करतात. अशा अनेक घटनांची नोंद या पुस्तकात आहे.
बाबासाहेबांसाठी सर्वस्व अर्पण करणारे, चळवळीसाठी विविध मार्गांनी सहकार्य करणारे दलित आणि सवर्ण सहकारी हे आंबेडकरी चळवळीचं वैशिष्ट्य राहिलं आहे. सोलापुरातल्या अशा सहकाऱ्यांचे पुस्तकात प्रसंगाप्रसंगाने उल्लेख, वर्णनं येतातच. त्याचबरोबर लेखकांनी शेवटी त्यावर खास प्रकरणच लिहिलंय. अशा सहकाऱ्यांची सविस्तर माहिती त्यात आहे. मोठ्या चरित्रात ठळक नावं येतात. बाकी असंख्य कार्यकर्ते विस्मृतीत जातात. स्थानिक चळवळीच्या इतिहासाची नोंद करणाऱ्या अशा पुस्तकांतून त्यांचा यथोचित परिचय देणं ही त्यांच्याप्रतिची कृतज्ञता व्यक्त करणेच आहे.
स्वतंत्र मजूर पक्षाचे आमदार म्हणून निवडून आलेले बाबासाहेबांचे जवळचे सहकारी जिवप्पा ऐदाळे अखेरपर्यंत निष्कांचन होते, हे इथं आपल्याला कळतं. सोलापुरातल्या बाबासाहेबांच्या समकालीनांमधे वालचंद कोठारी, निंपप्पा ऐदाळे, हरिभाऊ तोरणे, उद्धव शिवशरण, जनार्दन सोनकांबळे, जी. आर. देशपांडे, दादासाहेब व भालचंद्र मुळे, एन. टी. बनसोडे, जी. डी. जाधव, हणमंतू सायन्ना यांची विस्तृत नोंद लेखकांनी केली आहे.
जी. डी. जाधवांची एक हकिगत इथं कळते. महाडच्या संग्रामातले एक प्रमुख नेते अनंतराव चित्रे यांच्या घरी जेवणाच्या पंगतीत त्यांची कन्या जाधवांच्या नजरेस पडते. ते तिला मागणी घालतात. सगळ्यांना आनंद होतो. त्यांचा विवाह चळवळीतून झालेला आंतरजातीय विवाह होता.
हेही वाचा: नव्या पिढीनं गांधी-आंबेडकर मतभेदांकडे कसं बघावं?
पुस्तकाच्या परिचयाच्या शेवटी येताना बाबासाहेबांचं एक महत्वाचं वैशिष्ट्य सोलापुरातातल्या भेटींतही कसं दिसतं, हे लक्षात घेणं उद्बोधक ठरेल. बाबासाहेब कमालीचे लोकशाहीवादी, विचार स्वातंत्र्यवादी होते. मतभिन्नता असलेल्यांचा दुस्वास नाही, तर त्यांचा आदर करणं, मात्र त्याचवेळी आपली मतं पातळ न करता रोखठोक मांडणं हे बाबासाहेबांचं खास वैशिष्ट्य होतं. बाबासाहेबांच्या या गुणामुळेच तर त्यांना त्यांच्याशी अनेक बाबतींत असहमती असणारेही भेटीचं निमंत्रण आग्रहाने देत असत. सोलापुरातल्या अशा तीन भेटी लेखकांनी नोंदवल्या आहेत.
त्यातल्या एक, बार्शीच्या महात्मा गांधी छात्रालयाचे अ. दा. सहस्रबुद्धे यांच्या निमंत्रणावरुन त्यांच्या बोर्डिंगला बाबासाहेबांची भेट. ही आठवण सहस्रबुद्धे यांनी लिहून ठेवली आहे. ते लिहितात – 'बाबासाहेबांनी प्रथम मला माझे नाव विचारले. मी सहस्रबुद्धे असे सांगितले.'
त्यावर बाबासाहेब काय म्हणाले त्याची नोंद ते करतात – 'म्हणजे तुम्ही ब्राम्हण आहात तर! ब्राम्हण लोकांत माझ्याबद्दल फार गैरसमज आहेत. ब्राम्हण लोक काही आमचे वैरी नाहीत. माझ्या चळवळीत अनेक ब्राम्हण्यरहित ब्राम्हण आहेत. ब्राम्हण्यवृत्ती असलेल्या सनातनी ब्राम्हणांबद्दल मात्र मला मनस्वी चीड आहे.'
बाबासाहेब सहस्रबुद्धेंना विद्यार्थ्यांविषयी, त्यांच्या वागणुकीविषयी विचारतात. त्यावर सहस्रबुद्धे सांगतात – 'बोर्डिंगमधील महार विद्यार्थ्यांवर आपल्या विचारांचा अत्यंत प्रभाव आहे. हिंदू धर्माचे सण, उपवास, प्रार्थना या बाबी त्यांना अजिबात पसंत नाहीत. आषाढी, कार्तिकी या एकादशीच्या दिवशी त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे भाजीभाकरीचे जेवण आम्ही देतो व मांग, चांभार विद्यार्थ्यांना फराळाचे साहित्य देतो.
'आश्रमीय प्रार्थना महार विद्यार्थ्यांना पसंत नसते म्हणून सर्वांच्या संमतीने वंदे मातरम ही प्रार्थना बोर्डिंगमध्ये होते. सूतकताई मुलांच्या इच्छेवर ठेवली आहे. विद्यार्थ्यांवर बळजबरीने कोणतीही गोष्ट लादली जात नाही. अभ्यासात प्रगती व्हावी म्हणून मी जास्त काळजी घेतो. विद्यार्थी शिकावेत, शहाणे व्हावेत आणि शिक्षणानंतर त्यांनी योग्य वाटेल तो सामाजिक, राजकीय विचार स्वीकारावा हे येथील बोर्डिंगचे वैशिष्ट्य आहे.'
सध्याचं हिजाब प्रकरण आठवून पहा. सर्वसमावेशी सेक्युलर धोरण काय असावं याची १९३४ची ही नोंद आहे. ती मुद्दाम सविस्तर दिली. आंबेडकर आणि गांधीवादी या दोहोंतल्या संवादातलं हे मूल्य आपण आज गमावत आहोत. धूसर करत आहोत.
हेही वाचा: माझ्या अस्मितेच्या आणि असहिष्णुतेच्या नायकाला अखेरचा जयभीम!
दुसरी भेट आहे, १४ जानेवारी १९४६ची. बाबासाहेबांच्या आगमनाप्रीत्यर्थ मकर संक्रांतीच्या निमित्ताने सोलापुरातल्या सावरकर मंडळाने तिळगूळ समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमात बाबासाहेब सहभागी झाले. तिसरी भेट एम. एन. रॉय यांच्या रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टीच्या सोलापुरातल्या कार्यालयाला भेट.
गांधीवादी, हिंदुत्ववादी आणि कम्युनिस्ट या तिन्हींशी बाबासाहेबांचे मतभेद किती तीव्र होते हे जगजाहीर आहे. अशावेळी या कोणालाही अस्पृश्य न मानता त्यांच्याशी माणूस म्हणून संवादी राहण्याची बाबासाहेबांसारख्या महामानवाची ही भूमिका आजच्या परमत असहिष्णुतेच्या वास्तवात खास अधोरेखित करण्याची गरज आहे.
बाबासाहेबांच्या चळवळीचा आपापल्या जिल्ह्यातला मागोवा घेण्याची प्रेरणा या पुस्तकाने नक्कीच संबंधितांना मिळेल आणि त्या योगे दत्ता गायकवाडांचे ८०व्या वर्षी असं पुस्तक लिहिण्याचे श्रम अधिकाधिक सार्थकी लागतील असं मला वाटतं.
पुस्तक: चैतन्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर
लेखक: दत्ता गायकवाड
प्रकाशन: सुविद्या प्रकाशन
पानं: ३०३ किंमत: ३५० रु
संपर्क क्रमांक: ९९७५६२६७१०
हेही वाचा:
मी बंडखोर कसा झालो सांगतायत राजा ढाले
चळवळीच्या यशाचे मापदंड आज बदलतायत
ग्लोबल लोकल मेळ घालायचा, तर महात्मा फुले हवेतच
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंनी लोककलेला आधुनिक रुप दिलं
एन. डी. पाटील यांचं जीवन, सामाजिक संघर्षाचं एक धगधगतं अग्नीकुंडच
शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी भाषणातून दिला पुरोगामी राष्ट्रवादाचा धडा
(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असून त्यांचा लेख आंदोलन मासिकातल्या ताज्या अंकातला आहे)