पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आज जन्मदिन. त्यांच्यासारखा एक अद्वितीय नेता आणि अत्यंत त्यागी स्वातंत्र्यसैनिक भारताचा नेता होता, हे जेव्हा आठवतं तेव्हा अभिमानाने ऊर भरून येतो. आंतरराष्ट्रीय राजकारणामधे जवाहरलाल नेहरू यांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं होतं. त्यामुळेच आजच्या काळात नेहरूंसारख्या सौंदर्यवादी, विद्वान आणि विज्ञाननिष्ठ नेत्याची उणीव भासतेय.
१४ नोव्हेंबर हा स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन देशभर बालदिन म्हणून साजरा होतो. आजच्या पिढीला जवाहरलाल नेहरू बालदिनाच्या निमित्तानेसुद्धा माहीत नाहीत. कारण जो पक्ष नेहरूंना एवढा मोठा करून गेला, तो पक्षच जवाहरलालजींच्या ध्येयधोरणापासून दूर गेला आहे. म्हणूनच जवाहरलालजी यांच्या स्मृतिदिनाला पन्नास वर्ष झाली तरी तरुण पिढीला साधी दखल घ्यावी असंही वाटलं नाही. तसं पाहिलं तर स्वातंत्र्यसंग्रामाचे नेते म्हणून नेहरू भारतभर सर्वांचेच हिरो होते.
जितके गांधीजी नव्हते तितके नेहरू सर्वांचे लाडके होते. त्याची प्रचिती हिंदी सिनेमांनी नेहमीच जाणवून दिली. राज कपूर, दिलीप कुमार, कधी कधी देव आनंद हे अभिनेते, दिग्दर्शक आणि नंतर बी. आर. चोप्रा, के. असिफ, गुरुदत्त या दिग्दर्शकांनी जवळपास सर्वच सिनेमातून नेहरूंचा अनुयायीच नायक म्हणून उभा केला होता. हा नायक देखणा असायचा. तो शिकलेला होता. त्याला लहान मुलांचा लळा होता. तो सौंदर्यवादी आणि समाजवादी असा एकाच वेळी असायचा.
गरिबांना मदत करणं किंवा स्वतः गरिबांपैकी एक असणं, त्यागी असणं, साधी राहणी जगणं अशा नेहरूंच्या सर्व वृत्ती हिंदी सिनेमांच्या नायकांमधे बघायला मिळत असत. हिंदू-मुस्लिम ऐक्य, स्त्री पुरुषांची समता आणि गरीब विरुद्ध श्रीमंत या संघर्षामधे गरिबांची बाजू घेण्याची धमक या सर्व गोष्टी भारताला हिंदी सिनेमामधून नेहरूंमुळे शिकायला मिळाल्या. थोडासा धर्मनिष्ठ, ईश्वरनिष्ठ; पण बराचसा विज्ञाननिष्ठ, शिवाय लोकशाहीवादी असा चेहराही या सिनेमांच्या नायकांना नेहरूंमुळे मिळाला.
हेही वाचा: र धों. कर्वेंचा बुद्धिवाद अस्सल आणि आरपार होता
नेहरूंनी उच्च शिक्षणावर जो भर दिला, त्यामुळे भारतभरच एक उदारमतवादी, प्रगतिशील, लोकशाहीनिष्ठ आणि समतावादी दृष्टिकोनाचा विद्यार्थी आकार घेऊ लागला. महाराष्ट्रामधे या विचारांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. कारण महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशा विचारांचा पाया आधीच घालून ठेवला होता. म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर जीवापाड प्रेम करणारा महाराष्ट्र अशीही त्याची ओळख राहिली.
नेहरूंच्या उच्च शिक्षणाच्या आग्रहाचा पुरेपूर फायदा महाराष्ट्राने घेतल्याचं आढळतं. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र पुरोगामी आणि उच्चशिक्षित दिसतो, त्याचं कारण नेहरूंनी रचलेला पायाच होय. नेहरू यांचं नेतृत्व थोडंसं एकखांबी असलं तरी त्यांनी सर्व राज्यांचे मोठे पुढारी काँग्रेसमधे आपल्या बरोबरीने आणून ठेवले. त्यामुळे संघराज्यात्मक चौकट असूनही राज्यांना विघटनाचा किंवा वेगळेपणाचा त्रास झाला नाही.
भारतीय राजकारणात गांधींच्या पाठोपाठ नेहरूच असे एक नेते होते, जे लेखक म्हणून आणि विचारक म्हणून विख्यात झाले. ज्या ज्या वेळी ते तुरुंगात असत त्या त्या वेळी नेहरूंनी भरपूर लिखाण केलं. इंदिरा गांधींना लिहिलेली पत्रं किंवा मुख्यमंत्र्यांना लिहिलेली पत्रं ही आजही या माणसाच्या उमद्या मनाची आणि विशाल दृष्टीची साक्ष देतात.
इतिहासाचं नेहरूंचं ज्ञान प्रचंड होतं. त्यामुळे सगळ्या निर्णयांमागे त्यांनी ऐतिहासिक आढावा घेऊन विचार केल्याचं आढळतं. त्यांचं मन चिंतनशील आणि सौंदर्यवादी असल्यामुळे बरेचदा माणसाच्या चांगुलपणावर त्यांचा भरवसा असायचा. भ्रष्ट मंत्र्यांना नेहरूंनी बाहेरचा रस्ता दाखवला. शिवाय संसदेतही भ्रष्टाचाराच्या विरोधात ते नेहमी भूमिका घेत; पण देशाच्या उभारणीचा काळ असल्यामुळे त्यांनी भ्रष्टाचाराकडे डोळेझाकसुद्धा केली.
माणसाच्या चांगुलपणावर त्यांचा भरवसा असल्यामुळेच चीनने भारतावर आक्रमण करावं हे त्यांना सहन झालं नाही. राजकारणामधले डावपेच त्यांना कळत होते; मात्र इतका घोर फसगतीचा प्रकार ते पहिल्यांदाच अनुभवत होते. त्यामुळे त्यांना व त्यांच्या प्रतिमेला जबर धक्का बसला. तब्बल १७ वर्ष पंतप्रधानपद सांभाळणारा हा माणूस चीनच्या आक्रमणामुळे हादरून गेला आणि त्यातच त्यांचं निधन झालं.
हेही वाचा: रानडे-फुले यांच्यात मतभेद असूनही दोघांची समाजसुधारणा तत्त्वं एक होती!
आंतरराष्ट्रीय राजकारणामधे नेहरू यांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं होतं. अब्दुल लासेल, मार्शल टीटो यांसारख्या नेत्यांना सोबत घेऊन त्यांनी अलिप्तता जोपासण्याचं राजकारण केलं. त्यामुळे एक वेगळं वलय निर्माण झालं.
विचाराने समाजवादी असल्यामुळे त्यावेळच्या सोव्हिएत रशियाकडे नेहरूंचा ओढा होता; पण अमेरिकेचाही तेवढाच दबाव असल्यामुळे नेहरूंनी भांडवलशाही आणि साम्यवाद यांना सारखी वागणूक देण्यासाठी अलिप्ततेचा पवित्रा आंतरराष्ट्रीय राजकारणात स्वीकारला.
जवाहरलाल नेहरूंचं त्यागी व्यक्तिमत्त्व आणि प्रचंड बुद्धिमत्ता यामुळे ते त्या काळात एक आंतरराष्ट्रीय शांततेचे दूत म्हणूनही ओळखले जायचे. त्या काळी नेहरू जागतिक नेत्यांपैकी एक मानले जायचे. असा तो काळ होता.
उत्तुंग व्यक्तिमत्त्व असूनही नेहरू घराणेशाहीच्या आहारी गेल्याचं आपण पाहतो. आपली कन्या इंदिरा हिला त्यांनी आपला वारस म्हणून नियुक्त केलं नसलं तरी सूचकपणे त्यांनी इंदिरा गांधी यांना काँग्रेसमधे वाट मोकळी करून दिली आणि नंतरचा राजकीय इतिहास आपण सारे जाणतोच. एक अद्वितीय नेता आणि त्यागी स्वातंत्र्यसैनिक होते, हे जेव्हा आठवतं तेव्हा अभिमानाने ऊर भरून येतो.
आज नेमकी नेहरूंसारख्या नेत्याची उणीव भासते. त्यांच्याप्रमाणे कोणताही नेता आज लेखन करत नाही. त्याचं वाचनही अत्यल्प असतं. तो आबालवृद्धांमधे लोकप्रिय नसतो. कलांचा आस्वाद घेण्यात त्याला रस नसतो. विद्वान म्हणून त्याची इतरांशी मैत्री नसते. शास्त्रज्ञ, साहित्यिक आणि कलावंत त्याच्या जवळच्या वर्तुळात नसतात.
आजच्या बहुतेक राजकीय नेतृत्वाकडे नेहरूंची विज्ञाननिष्ठा आणि धाडसीपणा यांचा अभाव दिसतो. नेहरूंनी समाजातल्या चांगुलपणाला नेहमीच पुढे आणलं. कटकारस्थानात, डावपेचात नेहरू अग्रेसर नव्हते. आजचे राजकीय पुढारी कारस्थानी आणि कपटी वाटतात, तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासारखा सौंदर्यवादी, विद्वान आणि विज्ञाननिष्ठ नेता आपला पंतप्रधान होता याचं आश्चर्यही वाटते.
हेही वाचा:
सुवार्ता दिब्रिटोंची अन् पत्थरांचा मारा सनातन
आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणारा १९४२ चा लढा नेमका होता कसा?
खरंच, भगतसिंगांची फाशी रोखण्याचा गांधींजींनी प्रयत्नच केला नाही?
लग्नासाठी जातधर्माचा विचार न करणाऱ्या तरुणांच्या शोधात गणेश देवी
भारत माता की जय म्हणणं हा माझा अधिकार, जावेद अख्तर यांचं वायरल भाषण