सामान्य माणसांमधे शरद पवारांच्याविरोधात असंतोष असल्याचं चित्र उभं रहावं यासाठी त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. काल कोर्टाच्या निकालानंतर जल्लोष करणाऱ्या, गुलाल उधळून नाचगाणी करणाऱ्या लोकांनी आज आक्रोश करत पवारांच्या घरावर चाल करून जावं, असं अचानक काय घडलं हा प्रश्नही उरतोच. या सगळ्या प्रकरणावर भाष्य करणारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची फेसबुक पोस्ट.
शरद पवार यांच्या घराच्या दिशेने जमाव निघाला तेव्हा त्या जमावासोबत साधा कॉन्स्टेबलसुद्धा नव्हता. जमावातले लोक रस्त्यावरचे दगड उचलून भिरकावत, पायातली चप्पल फेकत सिल्वर ओकच्या दिशेने निघाल्याचं दृश्य टीवीच्या पडद्यावर दिसू लागलं, तेव्हा एकही पोलिस नव्हता.
जिथं टीवीचे कॅमेरामन, रिपोर्टर पोचले होते त्या घटनेची मुंबई पोलिसांना कानोकानी खबर नव्हती. स्कॉटलंड यार्ड पोलिसांच्या आठवणी इतिहासजमा होऊन आता मुंबई पोलिसांसाठी फक्त परमवीर सिंग आणि सचिन वाझेच्या आठवणी उरल्या आहेत.
हेही वाचाः मोदींचा नवा भारत आणि आमचा नवा भारत वेगळा, कारण
बराच काळ हुल्लडबाजी, घोषणाबाजी, शिविगाळ सुरू होती. नीटपणे पढवल्यासारखे सगळे एकाच भाषेत, एकाच सुरात बोलत होते. एकसारख्याच शिव्या देत होते. आणि मोठमोठ्याने शिव्या देणाऱ्या व्यक्तिसमोर बूम धरून टीवीचे रिपोर्टर त्यांचा लाईव प्रसार करत होते.
पवारांच्या घरावर चाल करून जायचं, त्याचं व्यवस्थित मीडिया कवरेज करायचं आणि तिथून पवारांना घाणेरड्या शिव्या देऊन त्याचं थेट प्रसारण करायचं इतकं सगळं नियोजनबद्ध दिसत होतं. त्यामुळे हा विषय फक्त पवारांच्या घरावर चाल करून जाण्यासाठी उचकावण्यापुरता मर्यादित नाही, हे लक्षात घ्यावं लागतं.
एवढ्यावर टीवीवाल्यांची हौस भागली नाही, त्यामुळे संध्याकाळी गुणरत्न सदावर्तेला लाईव कवरेज देऊन त्याच्यामार्फत शरद पवारांची शक्य तेवढी बदनामी करण्यात आली. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एवढं नीच राजकारण बघायला मिळालं नव्हतं.
शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला पाळीव आमदारांमार्फत शिविगाळ करण्याचा उपक्रम आधीपासून राबवण्यात येत आहे. तेवढं पुरेसं होत नाही म्हणून मग गुणरत्न सदावर्तेसारख्याला दलित व्यक्तिला फूस लावण्यात येते. त्यातूनही पवारांच्या प्रतिमेवर काहीही परिणाम होत नाही म्हटल्यावर बिनचेहऱ्यांच्या माणसांना पुढे करून त्यांच्यामार्फत जाहीरपणे शिविगाळ करण्याचा कार्यक्रम आखला जातो.
सामान्य माणसांमधे शरद पवारांच्याविरोधात असंतोष असल्याचं चित्र उभं रहावं यासाठी हे करण्यात आलं. काल कोर्टाच्या निकालानंतर जल्लोष करणाऱ्या, गुलाल उधळून नाचगाणी करणाऱ्या लोकांनी आज आक्रोश करत पवारांच्या घरावर चाल करून जावं, असं अचानक काय घडलं हा प्रश्नही उरतोच.
हे षड्यंत्र एवढ्यापुरतं नसावं. आणखी काही भयानक घडवण्याचा त्यामागे डाव असू शकतो. हल्लेखोर पवारांच्या घरांवर चाल करून गेल्यानंतर जर त्यांना अडवलं नसतं तर त्यांनी पवाराच्या घरात घूसून धुडगूस घातला असता. काही लोक दरवाजापर्यंत गेल्याचं दिसत होतंच. नाहीतर त्यांना अडवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला असता तर त्यातूनही काही अघटित घडू शकलं असतं.
सुप्रिया सुळे यांनी अडवलं नसतं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला असता आणि त्यातून दोन गटांमधे धुमश्चक्री होऊ शकली असती. सुदैव एवढंच की, असं काही घडलं नाही. पण ज्यांनी कारस्थान रचलं असेल त्यांचा असंच काही घडवण्याचा डाव असावा.
हेही वाचाः दोनच कायद्यांचे अधिकार असूनही ईडी पॉवरफुल कशी?
शरद पवार हे महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत. पण सत्तेत असलेली काम करणारी माणसं वेगळी आहेत. ती जबाबदार आहेत म्हणून त्या त्या पदावर नेमली आहेत. तरीसुद्धा सरकारच्या प्रत्येक गोष्टीसाठी शरद पवार यांना जबाबदार धरून त्यांना लक्ष्य केलं जातं.
शरद पवार विषय छोटा, मोठा न पाहता शक्य तिथं सूचना देऊन लोकांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करत असतात. एसटीचा संप लांबल्यानंतर त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन एकदा त्याच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न केले होते. सर्वसंबंधितांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. पण संघटनेतल्या मतभेदांमुळे तो तोडगा सर्वमान्य होऊ शकला नाही. त्यानंतर तर विषय उच्च न्यायालयातच आहे आणि उच्च न्यायालयाने त्यासंदर्भातला आपला निकाल दिलाय.
संपकाळात अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करून जीवन संपवलं, ही वस्तुस्थिती आहे. पण त्यासाठी शरद पवार यांना जबाबदार धरण्याचं कारण काय? जबाबदार धरायचंच झालं तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांना जबाबदार धरायला पाहिजे. पण या सगळ्या प्रकाराला ज्यांची फूस आहे, त्यांचा उद्देश त्यामुळे साध्य होत नाही. शरद पवार हाच या सरकारचा प्रमुख आधार आहे आणि त्याच्यावर घाव घातला की आवश्यक ते साध्य होतं, असा संबंधितांचा समज आहे.
या हल्ल्यानंतर पंकजा मुंडे यांनी दिलेली प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला साजेशी होती. पण विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया ऐकताना एकूण घटनेमुळे त्यांना झालेला आनंदच अप्रत्यक्षरित्या व्यक्त होत होता.
ही घटना का घडली असावी याची कारणमीमांसा करताना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा वाराही त्यांना शिवला नसल्याचं दिसून आलं. अर्थात राज ठाकरे यांच्या सावलीत कारकीर्द सुरू करून देवेंद्र फडणवीस यांच्या आश्रयाखाली स्थिरावलेल्या दरेकरांकडून यापेक्षा वेगळी अपेक्षाही करता येत नाही.
हेही वाचाः मी देशभक्त का नाही?
खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले हा त्यांच्या मनाचा मोठेपणा. पण मुंबई पोलिसांच्या अब्रूची लक्तरं आजच्या घटनेमुळे वेशीवर टांगली गेली ही वस्तुस्थिती. अर्थात महाराष्ट्राच्या गृहखात्याचं जे शैथिल्य आहे, तेच एकूण पोलिसांच्या कार्यपद्धतीतून दिसून येतंय.
गृहखात्यासंदर्भात गेल्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या पातळ्यांवर चर्चा सुरू आहे. गृहमंत्र्याने नुसतं असून चालत नाही, तर त्याने दिसावंही लागतं आणि त्या दिसण्यात आश्वासकता असावी लागते. जेणेकरून महाराष्ट्रातल्या जनतेला दिलासा वाटावा!
महाराष्ट्राच्या दुर्दैवाने महाराष्ट्राचे मारून मुटकून गृहमंत्री केलेले दिलीप वळसे-पाटील असले तरी दिसत नाहीत, दिसले तरी त्यांच्याकडे बघून कुणालाही आश्वासकता वाटत नाही आणि ते बोलले तर सामान्य माणसाचा उरला सुरला आत्मविश्वास डळमळीत होऊन जातो.
केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया सुरू झाल्यानंतर सरकारमधल्या सगळ्या मंत्र्यांची एकमेकांच्या आडोशाला लपण्याची ईर्षा लागलीय. असल्या भेदरट आणि आत्मलंपट लोकांच्या हाती सत्ता सोपवून त्यांच्या निष्क्रियतेचं ओझं शरद पवार कशाला वागवताहेत, असा प्रश्नही सामान्य माणसाच्या मनात निर्माण झाल्यावाचून राहात नाही. वर्षानुवर्ष सत्ता उपभोगलेली ही मंडळी केंद्रीय यंत्रणांच्यासमोर उभीही राहू शकत नाहीत, लढण्याची गोष्ट लांबच!
भारतीय जनता पक्ष विरोधात असूनही अनेक मित्रपक्षांना, बाहेरून आलेल्या नेत्यांना सांभाळताना दिसतो. आणि सत्तेत असतानाही राष्ट्रवादीला राजू शेट्टी यांच्यासारखा एक मित्र सांभाळता येत नाही, इतकी ही मंडळी आत्मकेंद्री झाली आहेत. उलट त्यांच्याच पक्षाच्या आमदाराला नादी लावून फडणवीसांसारख्या कपटी राजकारणाचं दर्शन घडवत आहेत. असे मित्रपक्षांचे आमदार फोडून पक्षाची ताकद वाढत नाही, उलट तिचा ऱ्हास होत जाईल आणि २०१४ पेक्षा वाईट अवस्था येईल.
शरद पवार यांचा पिक्चर २०१९च्या निवडणुकीत सुपरहिट झाला. तो पुन्हा तसा चालण्याची सुतराम शक्यता नाही. एका दिग्दर्शकाची एखादीच अशी अविस्मरणीय कलाकृती असते. तशी पुन्हा साकारत नाही. त्यामुळे कसाही कारभार केला तरी शरद पवार पिक्चर हिट करून दाखवतील, या अपेक्षेवर कुणी असेल तर त्यांचा अपेक्षाभंग झाल्याशिवाय राहणार नाही.
हेही वाचाः खुळी न जनता फसेल आता, पुरे करा हे ढोंग!
महाविकास आघाडीच्या राज्यात शरद पवार यांच्या घरावर हल्ला होतो, याची जबाबदारी सरकारमधलं कुणी स्वीकारणार आहे की नाही, हा खरा प्रश्न आहे. हल्ला झाल्यानंतर सिल्वर ओकवर जाऊन विचारपूस केली की, जबाबदारी संपली. दुसऱ्या दिवसापासून आपले उद्योग करायला मोकळे असाच बहुधा सगळ्यांचा समज दिसतो. विरोधक आक्रमक होऊन सरकारला घाम फोडताहेत आणि सरकारमधले लोक घाबरून बसले आहेत, असं उलटं चित्र महाराष्ट्रात बघायला मिळतंय.
शरद पवार यांच्यासारख्या नेत्याबाबत घडलेल्या या प्रकाराबदद्ल महाराष्ट्रातल्या सामान्य माणसांच्या तीव्र भावना आहेत. पण ही वेळ सत्तेत बसलेल्या लोकांच्या नेभळटपणामुळे आली आहे याबदद्लही लोकांच्या मनात तीव्र संताप आहे. शरद पवार असल्या शेंदाड शिपायांचं नेतृत्व कशाला करतात, असाही प्रश्न लोक विचारू लागले आहेत.
शरद पवार यांचा दिलीप वळसे-पाटील यांच्यावर विशेष लोभ आहे, हे महाराष्ट्र जाणतो. पवारांची मोदींशीही चांगली जानपछान आहे, तेव्हा वळसे-पाटलांची कुठेतरी राज्यपाल म्हणून नियुक्ती करता आली तर ती त्यांच्या योग्यतेला साजेशी ठरेल.
वळसे-पाटील यांना गृहमंत्रिपदावर ठेवण्यात त्यांचंही हित नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचंही नाही, महाविकास आघाडीचंही नाही आणि महाराष्ट्राचं तर नाहीच नाही. समोरून देवेंद्र फडणवीस आणि कंपनी अत्यंत क्रूरपणे चाली रचत असताना इकडून फक्त चौकशी करून कठोर कारवाई करण्याची आश्वासनं दिली जात असतील तर या सरकारला ब्रह्मदेवसुद्धा वाचवू शकणार नाही.
या सगळ्यामध्ये एका गोष्टीची आवर्जून नोंद घ्यावी लागेल, ती म्हणजे सुप्रिया सुळे यांनी दाखवलेलं धाडस! समोर प्रक्षुब्ध जमाव असताना त्या त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी तयार होत्या. जमावाला हात जोडून पुन्हा पुन्हा विनंती करत होत्या. आताच्या काळातल्या राजकीय नेत्यांकडे एवढं धाडस अपवादानेच आढळतं. सुप्रिया सुळे यांनी आजच्या अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक परिस्थितीत दाखवलेला धीरोदात्तपणा आजच्या एकूण वाईट दिवसामधला संस्मरणीय प्रसंग होता!
हेही वाचाः
अरुण जेटलींना पत्रकार ब्यूरो चीफ म्हणायचे!
'फँड्री'च्या दानपेटीने गणपती बाप्पा होतो प्रसन्न
मोहन भागवत आरक्षणावर बोलल्यावर वाद का होतो?