सत्य घटनेवर आधारित ‘द ब्रिजेस ऑफ मेडिसन काउंटी’ हा सिनेमा १९९५ ला प्रदर्शित झाला. रूढार्थाने म्हणावं असं प्रेम यात नाही. आताच्या घडीला प्रेम, लग्न, रोमान्स म्हणून जे जे दाखवलं जातं, दिसतं यातलं काही एक यात नाही. तरी माझ्या वयाचा असणारा हा सिनेमा जगभरातले सिनेमे पाहत असताना मला नेहमीच आत्यंतिक जवळचा वाटतो. त्याला कारणही तशीच आहेत.
नवरा, दोन मुलं चार दिवस बाहेरगावी गेलेले असताना घरात एकटी असलेली ४५ वर्षांची गृहिणी. एका ब्रिजचे फोटो काढण्याच्या असाईनमेंटसाठी त्या ब्रिजचा पत्ता विचारत तिच्या अंगणात येऊन थांबलेला सुप्रसिद्ध फोटोग्राफर. त्याला ते ठिकाण दाखवावं म्हणून जरा संकोचानेच पण मदतीच्या शुद्ध हेतूने त्याच्या सोबत प्रवासाला तयार होते. संकोच गळून पडतो, नाव नसलेल्या नात्यात दोघे मनोमन बांधले जातात.
चार दिवस होतात. आपल्या जबाबदारीचं भान, नितीमत्ता याचा विचार करत पुन्हा कधीच समोरा- समोर न येण्यासाठी दोघं मार्गस्थ होतात. ही गोष्ट आहे १९९५ ला प्रदर्शित झालेल्या ‘द ब्रिजेस ऑफ मेडिसन काउंटी’ सिनेमाची. ‘द ब्रिजेस ऑफ मेडिसन काउंटी’ सत्य घटनेवर आधारित कादंबरीचा पुढे झालेला हा सिनेमा असा या एकूण गोष्टीचा प्रवास.
रूढार्थाने म्हणावं असं प्रेम इथं नाही, आजच्या आत्ताच्या घडीला प्रेम, लग्न, रोमान्स म्हणून जे जे दाखवलं जातं, दिसतं यातलं काही एक यात नाही. तरी माझ्या वयाचा असणारा हा सिनेमा जगभरातले सिनेमे पाहत असताना मला नेहमीच आत्यंतिक जवळचा वाटतो.
हेही वाचा: ‘थप्पड’च्या आरशात दिसणारा पुरुष आपण पाहिलाय का?
जिथं तुटणं, जोडलं जाण यातलं काही एक नाही. सहवासाचा हट्ट नाही. आहे तो प्रत्यक्ष एकत्र नसण्याचा अलिखित करार. माया दाटून आली म्हणून, आपलेपण वाटलं म्हणून, सूर जुळले म्हणून एकमेकांना सोबत करणं आणि पुन्हा मार्गस्थ होणं हा एवढा वास्तवदर्शी विचार. वयाच्या कुठल्याही टप्प्यावर हे वळण कुणाच्याही वाट्याला येउच शकतं.
ते वळण सावध पचवावं किंवा ते येतं हे मान्यच न करणाऱ्या एका समाजव्यवस्थेचा आपण भाग आहोत हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. प्रेम, अफेअर, लफडं, रिलेशनशिप, लिवइन, प्रकरण यातलं तुम्ही काहीही केलत आणि नातिचरामी म्हणत लग्नाच्या सोनेरी फ्रेममधे मढवलं की तुम्ही समाजाने घेतलेली नैतिकतेची परीक्षा पास होता.
सामोपचाराने एकत्र राहिलात वेगळे झालात तर याला प्रेम म्हणत नाहीत, आकर्षण असावं म्हणून तुमच्या भावना निकालात काढल्या जातात. किंवा या कुठल्याच मार्गावर न चालता एकटं राहणं पसंत केलत की वेडे ठरता. आणि कुठल्याही एका टोकाचा निर्णय न घेता सुवर्णमध्य गाठू पाहत असाल तर मूर्ख.
एकूण काय प्रेम आहे न मग लग्न करणं मस्ट आहे हे एकूण गणित लव्ह मॅरेजला लावलं जातं. तिथे विरोध, जातीचं कारण, वेळ प्रसंगी धर्माचे बुरखे, प्रत्यक्ष हेतू नसतानाही किंवा हेतुपूर्वक आलेले जिहाद अजूनही आहेत.
अरेंज मॅरेजच्या रस्त्यात निवडीचं स्वातंत्र्य वयाच्या एका टप्प्यावर आणि एका विशिष्ट सामाजिक - आर्थिक स्थरातल्या मुला-मुलींना येतं हे कितीही खरं असलं तरी, बरेच होकार - नकार खेळत, मान-अपमानाचं नाट्य रंगवून शेवटी आता फार झालं, लग्न झालंच पाहिजे अशा दबावात इथली लग्न उरकली जातात.
कुठे चार- सहा महिन्यात कुरबुरी सुरु होतात, कुठे नात्यांचा प्रचंड शो ऑफ केला जातो आणि जे नातं रुजावं म्हणून मूठ मूठ माती कैकांनी आणून टाकलेली असते त्या नात्याचा बोन्साय होऊन राहतो. या अधेमधे लग्नाची एक भलीमोठी बाजारपेठ येते, डेटिंग अप्स ना असलेला लेफ्ट-राईट स्वाईप ऑप्शन इथे मिळतो.
आम्ही त्याची लाख–लाख घालून जाहिरात करतो आणि लग्न एक व्यवहार होऊन राहतं. अर्थात नवी पिढी म्हणून आम्ही हे सारं वापरतो, सोयीचं असेल तर स्वीकारण्याची तयारी ठेवतो नाहीतर कानाडोळा करतो.
हेही वाचा: बॉलिवूडच्या सिनेमात कधी आनंदी दलित पाहिलाय का?
लव किंवा अरेंज पासून लग्नापर्यंतच्या रस्त्यात मुलांच्या आणि मुलींच्या पुढची आव्हानं बदलत राहतात. सत्यवानाची हो नाहीतर जोतिबाची हो पण सावित्रीच हो हे मुलींच्या बाबतीत ठरवून टाकलेलं असतं. अनेकदा मुली ते मान्यही करतात. काही मुली या सगळ्यात तरंगत लोण्याच्या गोळ्यासारख्या वर आलेल्या असतात, त्यांच्या स्वीकाराचा संघर्ष अजुनच वेगळा असतो. अशांनी सरळ स्वतःच्या रिलेशनशिप मॉडेलवर काम करायला हवं.
उदाहरण म्हणून इथं चि. व चि.सौ.का सिनेमातली सावी घेता येईल. मुलांच्या बाबतीत बँक बँलन्स आणि कुटुंबाला सुरक्षित वातावरण द्यायचंय याचं नको तितकं दडपण येतं. सिनेमाची भाषा आणि नाट्य आपल्याला जास्त भावतं हा विचार करून ही गोष्ट सांगायचीच झाली तर आणि लव सेक्स धोका हे समीकरण हीट आहे.
हे खोटं ठरवायचं तर निर्णय घेण्याची, अपयशाची भीती वाटणारा मुरांबातला आलोक, लग्नाच्या आदल्या रात्री पर्यंत कन्फ्युज असणारी मुंबई-पणे-मुंबई २ मधली गौरी घराघरात आहे. हे एवढं जरी आपण माध्यमातून शिकू शकलो, डोळसपणे त्यातल्या जीवनमुल्यांकडे पाहू शकलो तरी कितीतरी गोंधळ कमी होतील.
प्रेम म्हणजे लग्न, लग्न म्हणजे तडजोड, लग्नाआधीचं प्रेम म्हणजे अफेअर, ही समीकरण बदलायची तर सगळ्यात आधी आपल्या सगळ्या भावनांना व्याख्येच्या चौकटीत बसवण थांबवलं पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या नात्यात तुम्ही एकत्र येत असाल तर त्या नात्यातल्या दुसऱ्या माणसाने आपल्या आनंदाची जबाबदारी उचलावी ही अपेक्षा ठेवण बंद करायला हवं.
जिथं तुम्ही आपणहून आनंदी राहू शकता त्या जागा शोधायला हव्यात. त्या सापडल्यावर समोरच्याला मोकळेपणाने दाखवता यायला हव्या. जोडीदार शोधत असाल तर बेस्टचा हेका सोडत पूरक आणि योग्य या पातळीवर विचार करता यायला हवा आणि त्यावर ठाम ही रहायला हवं.
प्रेमाचा असला काय किंवा वेडिंगचा असला काय आपल्या सिनेमाची स्टोरी आपल्याला हवी तशी लिहायची असेल तर मेंदूत असलेलं संकल्पनाचे अर्थ पुसून नदी सारखं प्रवाही राहत नात्याच्या स्वागताला तयार रहायला हवं.
हेही वाचा:
अजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी
सैरंध्री : पहिल्या मेड इन इंडिया सिनेमाची शंभरी