मराठी माणसांच्या रोमा रोमात रुजलेला वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचं अंग आहे. भागवत धर्म आणि समतेच्या विचारानं विठ्ठलमय होऊन अवघा सोहळा शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. हा प्रयत्न 'वारीच्या वाटेवर'च्या रुपानं समोर आलाय. वारकरी संप्रदायाच्या इतिहासातली ही पहिलीच महाकांदबरी आहे.
वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि ऐतिहासिक जडणघडणीतला महत्वाचा टप्पा आहे. समाजाला समतेचा संदेश देत मानवता धर्माचं पालन करायला लावणारा, जातीधर्मापासून समाजाला समतेच्या मार्गावर नेणारा एक परिवर्तनशील संप्रदाय आहे. हिंदूधर्माच्या जंजाळात अडकलेल्या समाजाला खऱ्या अर्थानं दिशा दाखवली ती भागवत धर्मानं.
‘वारीच्या वाटेवर’ ही संत साहित्याचे अभ्यासक दशरथ यादव यांची ऐतिहासिक महाकांदबरी म्हणजे वारकरी संप्रदायाची बखर आहे. यादव यांनी तब्बल पंधरा वर्ष संशोधन करुन या महाकांदबरीची निर्मिती केलीय. यामुळे पुन्हा एकदा वारकरी संप्रदायाचं मूळरुप समाजासमोर आलंय. लेखनातली संशोधकवृत्ती, सहजता, लालित्य, लोकदेव विठोबाचा लडिवाळपणा, संताचा संघर्ष, वारकऱ्यांची श्रद्धा, मूळ इतिहास या कादंबरीतून उलगडत जातो.
।विठ्ठलाने मला। आहे सांगतले। सत्य वारीतले। लिहायला।। हा त्यांचा अभंग वारीच्या मूळरुपाकडे आपल्याला घेऊन जातो. हिंदूधर्माच्या अडगळीतून बाहेर पडण्यासाठी अनेक संत आणि महापुरुषांनी बंड केले. त्यातूनच देशात अनेक धर्मपंथ उदयाला आले. महानुभाव, शीख, लिंगायत, आणि भागवत हे संप्रदाय होत. या सगळ्या संप्रदायात भरभराट झाली ती भागवत धर्माची. समाजातली जातीव्यवस्था संपवण्यासाठी संतानी बंड केलं. त्यातूनच भागवत धर्माची स्थापना झाली. बंडखोर संतांचा संप्रदाय म्हणजेच वारकरी संप्रदाय.
भले देवू कासेची लंगोटी.. नाठाळाच्या माथी हाणू काठी जगविख्यात तत्वज्ञानी विचारवतांना संत तुकाराम महाराजांच्या गाथेनं विचार करायला लावला. संत ज्ञानेश्वराच्या ज्ञानेश्वरीनं क्षमाशीलता शिकवली. संत नामदेवरायांनी भारतभर नेलेल्या वारकरी संप्रदायाची इमारत उभी राहिली ती, ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, तुकाराम, विसोबा खेचर, सावतामाळी, चोखामेळा, संत जनाबाई, नरहरी, एकनाथ, गोरा कुंभार, सेना न्हावी आदी संतप्रभावळीमुळेच.
अलीकडच्या काळात संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, संत कैकाडी महाराज, प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांनी वारकरी परंपरेचा प्रबोधनाचा वारसा चालवला.
पंढरीची वारी आहे ज्याचे घरी आणिक न करी तीर्थव्रत असा संदेश देऊन देवाधर्माच्या जंजाळात अडकलेल्या समाजाला मानवतेचा मार्ग दाखवण्याचं काम वारकरी संप्रदायानं केलं. हिंदू धर्माच्या अडगळीतून बाहेर काढून नवा धर्म संतांनी निर्माण केला. तो म्हणजे भागवत. वारकरी संप्रदाय म्हणजे हिंदूधर्माचं शुद्धीकरण. वारकरी संप्रदायाचा एकच देव म्हणजे लोकदेव विठोबा.
समतेच्या तत्वावर आधारलेल्या भागवत धर्मात आता अनेकांनी शिरकाव करुन भोळ्या भाबड्या वारकऱ्यांची दिशाभूल करण्याचं काम सुरु केलंय. वारकरी चळवळ आता धोक्याच्या वळणावर उभी आहे. हजारो वर्षापासून समाज जीवनाचा अंग बनलेली वारकरी चळवळ हा समाजाच्या उद्धाराचा एकमेव मार्ग आहे. त्याची वाढ निकोप झाली पाहिजे.
हेही वाचाः बुद्ध विचारात सर्वसामान्यांना आपलसं वाटणारं लोकशाहीवादी तत्त्वज्ञान
भारतीय वाङ्मयात वेदग्रंथाचं आक्रमण होण्यापूर्वी सूतसंस्कृती पुर्वेस बिहार, दक्षिणेत दंडकारण्यापर्यंत पसरली होती. सिंहलद्वीपातही हीच संस्कृती होती. शिव, विष्णू ही संस्कृतीची दैवतं. यांचा विद्याधर, गंधर्व, अप्सरा, यक्ष, राक्षस, किन्नर, पिशाच्च आणि देवयोनींवर विश्वास होता. यात मुनि आणि यति हे दोन वर्ग परमार्थाला वाहिलेले होते. वीरकथा, उपदेशपरकथा, दृष्टांतदाखले हे या काळातलं साहित्य होतं. दाशरथी रामाच्या काळात मातृ आणि सूतसंस्कृतीच्या लोकांचा संबध येऊन गंगेच्याकाठी एक संस्कृती निर्माण झाली.
सुतांशी संबंध जोडण्यासाठी पौराणिक ग्रंथातल्या राजांची नावं यज्ञविधीशी जोडली. शिव, विष्णूची अर्वाचीन रुपं यज्ञ आणि वेदमंत्रात शिरली. यामुळे यज्ञकर्म तात्पुरतं विस्तीर्ण झालं. पण एकरुप होऊ शकलं नाही. पुढे काही काळानं यज्ञकर्म संपुष्टात येऊन पुन्हा सुतसंस्कृती बहरली. वैदिक संस्कृती अंगास चाटून गेल्यासारखी झाली. पुढे स्थानिक संस्कृती जशीच्या तशी घेऊन वैदिकांनी विधिनिषिधे, उत्सव, सणावर व्यवस्थितपणा आणण्यास सुरवात केली, त्यामुळे सूतसंस्कृतीचं स्वरुप बदललं नाही तरी तिच्यावर वेदाला मानणाऱ्यांचं दडपण आलं.
या संस्कृतीला लोक वैदिक संस्कृती म्हणू लागले. सूतसंस्कृतीचे वाङ्मय ब्राम्हण, बौद्ध आणि जैन आवृतिकारांनी विकृत केलेलं मिळालंय. महाभारत ही सूतकथा या प्रकारच्या कथांचं मुख्य संग्रहस्थान आहे. शिव, विष्णू या पौराणिक देवांच्या कथांची जोपासना त्यांनीच केली. ब्राम्हणांशिवाय देशात धर्मपारायण करणाऱ्या लोकांचा एक वर्ग होता. ते हिरीरीने वाङ्मयाचा प्रसार करत. हे संन्यासी, वानप्रस्थाश्रमी आणि भिक्षू होते. बुद्धांच्यावेळी प्रचलित असलेले पंथ याच लोकांनी काढले. यतिचे तत्वज्ञान आणि नीतीशास्त्र याचाही महाभारतात पुढे समावेश झाला. महाभारत वीरचरित्र होतं. ग्रंथकार त्याला महाकाव्य समजतात. या ग्रंथाचे अठरा भाग करुन त्याला पर्व असं नाव दिलं.
भागवत धर्म हा हिंदू धर्माचा गाभा असून, एकेश्वर भक्तीला प्राधान्य देणारा आहे. भगवत या संस्कृत शब्दाचा अर्थ ईश्वर असा होतो. भागवत हे त्या शब्दापासून बनलेलं विशेषण आहे. भागवत म्हणजे भगवंताने सांगितलेले विचार आणि त्यापासून बनलेला धर्म. भागवत आणि वारकरी हा एकच पंथ आहे. महाभारतात श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता हा भागवत संप्रदायाचं द्योतक आहे. त्यातूनच भागवत संप्रदायाला वैष्णव संप्रदाय ही बिरुदावलीही लावली जाते. वेदपूर्व काळात निर्माण झालेल्या भागवत संप्रदायाबाबत संशोधकामधे मतभिन्नता आहे.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या मते, भागवत धर्म वेदकाळापूर्वी निर्माण झालेला आहे. ब्युलरच्या मते इ.स.पू. नवव्या दहाव्या शतकात हा धर्म रुढ होता. पाणिनीच्या अष्टाध्यायात वासुदेव हे नाव आलं असून, त्याकाळी वासुदेवाची भक्ती करणारा हा भागवत धर्म अस्तित्वात होता, असं रा. गो. भांडारकर सांगतात. इ. स. पू २०० मधे वासुदेवाच्या स्मरणार्थ बेसनगर इथं हिलिओडोरस या स्वतःला भागवत समजणाऱ्या वकिलाने गरुडस्तंभ उभारला होता.
समुद्रगुप्तानंतरचे राजे स्वतःला परम भागवत म्हणून घेत असत. उत्तर भारतात पाचव्या शतकापासून भागवत धर्म लोकप्रिय आहे. तामिळनाडूत आळवार संतानी इ. स. चवथ्या शतकापासून नवव्या शतकापर्यंत वैष्णवभक्तीचं महत्व वाढवलं.
भागवत धर्म सूर्य उपासनेतून निर्माण झाला असाही प्रवाह आहे. शिव भागवत, देवी भागवत हे संप्रदाय अस्तित्वाद असले तरी भागवत संप्रदाय हा वैष्णव संप्रदाय म्हणूनच विख्यात आहे. नारायणीय, एकांतिक, पांचरात्र, सात्वत या नावानेही हा संप्रदाय होता असंही मत नोंदवलं गेलंय. वासुदेव कृष्णाने या धर्माची स्थापना केली की पुनर्जीवन यात मतभेद असले तरी उत्तर काळात कृष्ण हाच उपास्य देव बनला. दक्षिणेत रामानुज आणि उत्तरेत रामानंद यांनी कृष्णाऐवजी रामाला उपास्य बनवून धर्माचं पुनरुजीवन केलं.
वल्लभाचार्य, चैतन्य महाप्रभू, हितहरिवंश हरिदास आदींनी कृष्णभक्तीचा प्रभाव वाढवला. अहिंसेला प्राधान्य असून, भुतदया, परोपकार, आई वडिलांची सेवा या नैतिक मुल्यांना महत्व देण्यात आलंय. संत आणि गुरु बद्दल आदर बाळगावा, तसंच भक्तीतून ज्ञान मिळवणं हा उद्देश आहे. महाराष्ट्रात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आदी संतांनी भागवत धर्माचं पुनरुज्जीवन केलं.
हेही वाचाः गांधीजींना तुकोबा भेटले होते
भागवत पुराण आणि भगवतगीता हे संप्रदायाचे प्रमुख आधारग्रंथ आहेत. नारायणीय उपाख्यान, हरिवंश, पंचरात्रसंहिता, सात्वत संहिता आणि विष्णूपुराण हे गंथ, भक्तीसुत्रे, रामानुज वगैरे आचार्यांचे ग्रंथ आधारभूत मानले जातात. भागवत धर्म हा लोकधर्म असून सामाजिकदृष्ट्या हीन मानलेल्या जातीतही साधू जन्माला येतात, केवळ स्त्री शूद्रांनाच नाही तर पशुंनाही मोक्षाचा अधिकार असतो. भक्तीच्या क्षेत्रात कुळ, वंश, देश भेद मानू नयेत. रुढ, कर्मकांड, संकुचित आचारधर्म, अंधश्रद्धा यांच्या पेक्षा नैतिक कर्तव्य श्रेष्ठ आहे, असं हा धर्म सांगतो. परमार्थिक क्षेत्रात सामाजिक समता आणून नितिनिष्ठेला स्वयंश्रेष्ठता दिली.
भारतात आर्य आणि अनार्य असा संघर्ष हजारो वर्ष सुरु आहे. आर्यांचे देव वेगळे, अनार्य जे मूळनिवासी आहेत त्यांचे देव वेगळे होते. वैदिक धर्माचं अस्तित्व ठळकपणे न टिकल्यानं अनार्यांच्या परंपरेचा स्वीकार करुन त्यांनी अनार्यांच्या देव आणि धर्मात शिरकाव करुन दंतकथा निर्माण केल्या. पण जीवनशैली वेगळी असल्यानं ते कधीच हिंदूसंस्कृतीत मिसळले नाहीत. मानवी समाजावर कायमचा प्रभाव निर्माण करण्यासाठी वैदिकांनी जाती संस्था निर्माण केल्या.
सण उत्सव आणि मनुस्मृतीनुसार बंधनं घालून समाजाला कायम गुलामीत ठेवण्याच्या उपाययोजना केल्या. त्याकाळातही बंड झाले. संघर्ष केला. मानवीप्रवृतीच्या संशोधनातून माणूस गुलामीत राहणं पसंत करतो, हे सिद्ध झालं. त्यासाठी स्वातंत्र्य नाकारली. रंगव्यवस्था निर्माण करुन ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र अशी व्यवस्था निर्माण केली. समाजाच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन वैदिक तत्वज्ञान मूळनिवासींवर बिंबवण्याचा प्रयत्न केला. त्यातून समाजमनाची दिशाभूल करत आपलं ध्येय साधण्याचा प्रयत्न केला.
हा सांस्कृतिक संघर्ष हजारो वर्ष सुरु आहे. यातूनच समाजातून अनेक धर्म आणि पंथ निर्माण करुन मानवतेच्या कल्याणासाठी विद्रोह करणारे संत आणि महापुरुष समाजमनावर राज्य करु लागले. त्यांनाच देवत्व प्राप्त झाले. वारकरी संप्रदायाने पिढ्यान पिढ्याची ही बंधनं आणि जातीयता मोडून काढण्याचा शेकडो वर्ष प्रयत्न केला. त्यामुळेच त्याग आणि शौर्याचं प्रतिक असलेला भगवा ध्वज खांद्यावर घेऊन नामदेवांनी भागवत धर्म भारतभर पोचवला. समाजमनाची मशागत केली.
हेही वाचाः महात्मा बसवण्णाः ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारणारा महापुरूष
मराठी मुलूखावर वेगळी छाप निर्माण करुन वारकरी संप्रदायानं जगाचंही लक्ष वेधून घेतलंय. रुढी परंपरा मोडायला निघालेला वारकरी संप्रदाय रुढीच्या परंपरेत अडकवण्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न चालू आहेत. पण हे प्रयत्न यशस्वी होताना दिसत नाहीत. वारकरी संप्रदायाचा पायाच मूळी प्रबोधनावर आधारलेला असल्यानं मानवमुक्तीचा हा संघर्ष अखंड चालूच राहिला.
देवगिरी ही यादव राजांची राजधानी. याच काळात भागवत धर्म, महानुभाव पंथाची भरभराट झाली. पंढरपूरच्या मंदिराला यादवराजांनी देणग्या दिल्याचं शिलालेखातून स्पष्ट होतं. महाराष्ट्रात शिवमंदिराची शिल्पसौंदर्य याच काळात उभारली गेली. भागवत संप्रदायानं हजारो वर्षापासून निर्माण केलेली वारीची वाट काळानुसार वेगवेगळ्या वाटेनं समाज जागृती करताना दिसते. वारीच्या वाटेचे मूळ शोधताना मन काळामागे धावते.
कधी भगवान गौतम बुद्धांच्या काळात बौद्ध तत्वज्ञान घेऊन सम्राट अशोकाच्या राज्यात आनंद निर्माण करते. गुप्त काळात पुश्यमित्र शुंगाने बौद्ध भिकूंच्या हत्या केल्याने तात्पुरती लुप्त होऊन, दत्तसंप्रदायाच्या माध्यमातूनही हा विचार ही वाट वर डोकावते. नवनाथ संप्रदायाच्या नऊ नाथांनी समाजाच्या मनातील भीती काढण्यासाठी याच वाटेने प्रवास केला. काळानुरुप वारीच्या वाटेने वेगवेगळे रुप धारण केले असले तरी मूळ भारतीय विचार कधी मरु दिला नाही. विसाव्या शतकात स्थापन झालेला शिवधर्म वारीच्या वाटेवरुनच प्रवास करीत आहे.
हजारो वर्षापासूनची मानवता धर्माची बदललेली रुपं अनुभवनारी वारीची वाट ही एकमेव साक्षीदार आहे. याच वाटेनं रामकृष्ण गेले. बळी गौतमानेही ही वाट उजळून काढली.
हेही वाचाः देहूत संत तुकारामांचा तारखेनुसार जन्मोत्सव
लक्ष लक्ष पावलांनी माझे भाग्य उजळले... मला भेटायला इथे ज्ञानदेव तुका आले संत नामदेव, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांनी किर्तन, प्रवचन, अंभगातून वारीची गोडी निर्माण केली. अवघा समाज आकर्षित करुन भगवा ध्वज वारकऱ्यांच्या खांद्यावर डौलानं फडकवत ठेवला. हाच भगवा ध्वज हाती घेत हर हर महादेव गर्जना करत छत्रपती शिवाजी महाराजांनी वारकऱ्यांना मावळे बनवून रयतेचं राज्य उभारलं. वारकरीच शिवाजी राजांचे मावळे बनून हातात ढाल तलवार घेऊन प्राणपणानं लढले.
छत्रपती संभाजी महाराजांनी वारकऱ्यांना वारीसाठी मदत केल्याच्या नोंदी आहेत. वारकरी संप्रदायाचा हा पुढारलेला पुरोगामी विचार याच वारीच्या वाटेनं लोकदेव विठोबाचं गुणगाण करत जागवला. वारकरी, दिंडी, पताका अन् टाळ वाजवत मोठ्या दिमाखात नटलेली वारीची वाट म्हणजे जुन्या पुर्वजांची वहिवाट आहे. मराठी माणसांच्या रोमा रोमात रुजलेला वारकरी संप्रदाय सांस्कृतिक जीवनाचे अंगही आहे. भारताला महासत्ता व्हायचं असेल तर याच वाटेनं जावं लागेल.
वारीच्या वाटेवर या ऐतिहासिक महाकांदबरीत संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा पायी प्रवासाचा सगळा इतिहास आहे. वाटचालीत होणारे विसावे, त्याठिकाणचं ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्व, संप्रदायाची परंपरा महत्वाच्या घडामोडी आहेत. वारीच्या वाटेवरचा चैतन्यदायी इतिहास, नीरास्नान, सासवड, जेजुरीचं ऐतिहासिक महत्व, तरगडावचं उभं रिंगण, सदाशिवनगरचं गोल रिंगण, वाखरीचं भव्य रिंगण, सोपानदेव आणि माऊलींची बंधूभेट.
तसंच खुडूस, ठाकूरबुवा समाधीजवळ शेतात रंगणारी गोल रिंगणं. भंडीशेगावचा मुक्काम आणि वाखरीचं गोल रिंगण आणि पंढरपूर पर्यंतचा प्रवास, पंढरपूरचं ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्व.
विठ्ठल मंदिर, चंद्रभागा, इथला मठ, संत नामदेव, जनाबाई, आणि सगळ्याच संताचा इतिहास कांदबरीत आहे. संत तुकाराम महाराज सोहळ्याची वाटचाल, मुक्कामी ठिकाणाचा इतिहास यात आहे. सोह्ळ्यातली एकूण दिंड्याची माहिती, देहू, आळंदी आणि पंढरपूरचा इतिहासही आहे. आषाढीची महापूजा, चंद्रभागेवरची गर्दी दिंड्याचा मुक्काम या सगळ्या गोष्टींचा उलगडा कांदबरीत होतो.
पंढरीची वारी पहिल्यांदाच शब्दबद्ध केली असून ही भागवत धर्माची बखर आहे. वारीचे अभंग, वारीचे खंडकाव्य, दिंडयाची एकत्रित माहिती, पालखी सोहळ्याची माहितीही यात आहे. यादव यांची महाकादंबरी म्हणजे वारकरी संप्रदायाचा ऐतिहासिक ऐवज आहे.
हेही वाचाः
वारकरी संप्रदायाची सहिष्णुता आजच्या काळात महत्त्वाची
परिवर्तनशील जगात धर्माची जागा सांगणारं सयाजीरावांचं भाषण
गुढीपाडव्याला गुढीपाडवाच राहू दे, त्याला हिंदू नववर्ष कशाला बनवताय?
आपली आजीही बावन्नला पन्नासवर दोन म्हणते, मग वादाचं कारण काय?
मोदी सरकारमधले बडे अधिकारी कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामे का देताहेत?